रक्तपिपासू - भाग ५
रक्तपिपासू - भाग ५
विक्रमच्या जन्मानंतर तर घर अजून खुलून गेलं. मी पुन्हा दादाबरोबर जोमाने कामाला लागलो. बाबा पण खूप खुश होते. कधी कधी ते लांबूनच तुम्हा दोघांना तासनतास न्याहाळत असतं. पण कधीही तुम्हाला स्वतःचा लळा लागू दिला नाही. पण तरीही अभय जर तू पहिला शब्द उच्चारला असशील तर तो “आजोबा” होता.
वहिनी आणि रखमाचे खास लक्ष असायचे तुमच्या दोघांवर..पण इतके लक्ष असूनही एक दिवस घात झाला..जे नाही व्हायला हवे होते ते झाले..त्या दिवशी मी आणि दादा दोघेही घरात नव्हतो आणि बाबाही नव्हते..पण कसं कोणास ठाऊक त्या खोलीचं दार किंचित उघडं होतं.
मग रखमा काकी बोलू लागली, “हो, मला अजूनही तो दिवस चांगला आठवतोय. हे आणि भावोजी दोघेही घरात नव्हते. त्यामुळे आम्हा दोघींना निवांत वेळ मिळाला होता. वहिनी त्यांच्या खोलीत त्यांचं कपाट लावत होत्या आणि मी दिवाणखान्यात बसून पुस्तक वाचत होते. तेवढ्यात वहिनींनी मला हाक मारली आणि मी त्यांच्या खोलीत गेले त्या मला त्यांच्या आईने दिलेली साडी दाखवत होत्या. इतक्यात त्यांची नजर खोलीच्या बाहेर गेली..त्या माझ्याशी बोलता बोलता मधेच "अभय, अभय बाळा" अशी हाक मारत बाहेर गेल्या..तोपर्यंत तू बाबांच्या खोलीपर्यंत पोहोचला होतास आणि वहिनी तुझ्याजवळ पोहोचेपर्यंत तू खोलीच्या आत गेलास पण..
मी ही वहिनींच्या पाठी गेले व मी खोलीजवळ जाईपर्यंत वहिनी पण तुझ्या मागोमाग खोलीच्या आत गेल्या. मी वहिनींना हाक मारत होते पण त्यांनी बहुदा ती ऐकली नाही व त्याचवेळेला विक्रम तू रडायला लागलास. मग मी तुझ्याजवळ गेले आणि तुला जवळ घेतले..पण तुला घेईपर्यंत खोलीचा दरवाजा बंद झाला होता. मला काहीच सुचत नव्हते काय करावे. त्यादिवशी बाबा ही घरी नव्हते. मी तुला घेऊन दरवाजाजवळ गेले आणि जोरजोरात दरवाजा वाजवू लागले..पण आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता..दरवाजा ही उघडत नव्हता..मी सारखी वहिनींना हाका मारत होते..सगळी गडी-माणसं माझ्या आवाजाने दिवाणखान्यात जमली पण बाबांच्या भीतीने कोणीही पुढे येईना. त्यानंतर अचानक घराचे दिवे गेले आणि वहिनींची जोरात किंकाळी ऐकू आली आणि त्यानंतर क्षणात सर्व काही शांत झालं..दिवे ही आले.
तेव्हा आम्ही पाहतो तर काय! वहिनी खोलीबाहेर बेशुद्ध पडल्या होत्या आणि अभय तुझी पण तशीच अवस्था होती आणि खोलीचा दरवाजा बंद झाला होता. मग आम्ही लगेच वहिनींना त्यांच्या खोलीत झोपवले आणि एकजण डॉक्टरांना बोलाविण्यासाठी गेला. डॉक्टरांनी दोघांनाही तपासून औषध दिलं आणि काही वेळात दोघेही शुद्धीवर येतील हे ही सांगितले. काही वेळानंतर दोघेही शुद्धीवर आले. पण त्यादिवशी त्या खोलीत काय झाले हे कोणालाही कळले नाही. त्यानंतर वहिनी फार बदलल्या..त्या रात्री-अपरात्री किंचाळत उठत..सारखं बाबांच्या खोलीकडे एकटक बघत असतं..भावोजी खूप चिंतेत असायचे. गडीमाणसांमध्येही त्याबाबत चर्चा होत असे..वहिनी दिवसेंदिवस सुकत चालल्या होत्या..कसलंच औषध काम करत नव्हतं.. त्यानंतर काही महिन्यातच त्या आपल्याला कायमच्या सोडून देवाघरी गेल्या. वहिनींचे मरण दादा पचवू शकले नाही. म्हणून तेही त्यांनंतर काही महिन्यातच देवाघरी गेले. पण जाता जाता दादांनी ह्यांना तुला ह्या वाड्यात न ठेवता, आम्ही तुला या घरापासून लांब तुझ्या मामाकडे ठेवावे असे सांगितले. दादांचा अखेरचा शब्द पाळणे हे जरुरी होतं त्यामुळे ह्यांनी तुला मुंबईला शिकण्यासाठी तुझ्या मामाकडे पाठवला आणि त्यानंतर एकेक अशा गोष्टी या वाड्यात घडत गेल्या की, नाईलाजाने आम्हाला विक्रमलाही ह्या वाड्यापासून दूर ठेवावे लागले.
आपल्या घराला खूप मोठा शाप आहे अभय..तुम्हा दोघांवर ह्या घराची काळी सावली पडू नये म्हणून आम्ही इतके वर्ष तुम्हाला आमच्यापासून लांब ठेवलं. विक्रम घरी यायला खूप आग्रह करायचा. मग हे त्याला इथे घेऊन यायचे. पण एक ही रात्र त्यांनी त्याला इथे राहू दिले नाही..पोरांनो, आपलं घराणं एक शापित घराणं आहे..हे मला कधीच कळलं होतं..वहिनी खूप धार्मिक होत्या म्हणून ह्या घराची झळ त्यांना उशिरा लागली.” असे बोलून काकी रडू लागली.
मग काका बोलू लागल्या, “अगदी त्याच दिवशी या सगळ्या गोष्टींना सुरुवात झाली. बाबा हे सर्व काही बघत होते पण त्यांनी हयाबद्दल एक चकार शब्द ही काढला नव्हता. पण दादा-वाहिनी गेल्यावर ते आतमधून पूर्णपणे तुटले होते आणि आश्चर्य म्हणजे तुला आणि विक्रमला तुमच्या आजोळी पाठवण्याच्या निर्णयावरून ही त्यांनी कोणताच आक्षेप घेतला नाही. मला आठवतंय.. त्यादिवशी सगळी कामे आटपून मी लवकर घरी आलेलो आणि निवांत दिवाणखान्यात बसलेलो. बघता बघता मला कधी झोप लागली काय माहीत!
पण कसल्यातरी आवाजाने मी दचकून उठलो. तो आवाज बाबांच्या खोलीतून येत होता. वाहिनीच्या प्रसंगानंतर ह्या वाड्याबद्दल बर्याच अफवा गावभर पसरलेल्या म्हणून त्या दिवसापासून एक ही गडी माणूस वाड्यात राहिला नाही. कोणती ना कोणती कारणे देत सगळे गडी एक एक करून वाडा सोडून गेले. आता वाड्यात फक्त मी, रखमा आणि बाबा इतकेच उरले होतो.
मी आवाजाचा कानोसा घेत होतो. बाबा जोरजोराने कोणाशी तरी बोलत होते. पण स्पष्ट काहीच ऐकू येत नव्हते. काही वेळाने अचानक तो आवाज यायचा बंद झाला. मग मी थोडावेळ वाट पाहिली. पण कोणीही बाहेर आले नाही. मग मी माझ्या खोलीत निघून गेलो. रखमा घाबरेल म्हणून मी तिला काहीच सांगितले नाही. पण नंतर रखमानेच विषय काढला आणि तिला आता ह्या घरात राहणे शक्य नाही असे ती म्हणाली. मग मी तात्पुरता तो विषय टाळला आणि आता काहीही झाले तरी मला हिम्मत करून बाबांशी बोलावच लागेल असे मी मनोमनी ठरविले. त्यानंतर दोन दिवस बाबा त्यांच्या खोलीतून बाहेर आलेच नाहीत. मग मला आणि रखमाला फार काळजी वाटायला लागली. मग मी धीर करून बाबांच्या खोलीचा दरवाजा वाजवायचा ठरविला. पण त्याची गरज पडली नाही. कारण तिसऱ्या दिवशी सकाळीच बाबा स्वत:च त्या खोलीतून बाहेर आले. ते खूपच अशक्त आणि थकलेले दिसत होते. त्यांनी रखमाकडे चहा मागितला आणि जेवणासाठी फक्कड बेत कर असेही ते म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी मला आज कुठे जाऊ नकोस घरातच रहा. मला काहीतरी महत्वाचे बोलायचे आहे असेही ते म्हणाले.
मग आम्ही जेवण उरकले आणि मग बाबांनी रखमा आणि मला समोर बसायला सांगितले व ते बोलू लागले, “मधुकर मला माहीत आहे. आजवर मी तुमच्या सर्वांवर खूप अन्याय केला आहे. तुम्हा पोरांना हवे तसे प्रेम मी देऊ नाही शकलो. आजपर्यंत माझ आयुष्य मी गूढ आणि एकाकी काढले. तुम्हाला नेहमी भरपूर प्रश्न पडले असतील. पण माझ्या स्वभावामुळे तुम्ही त्यांची उत्तरे कधीही जाणण्याचा प्रयत्न केला नाही. असो, पण आज ह्या सगळ्या रहस्यावरुन पडदा उठविण्याची वेळ आली आहे. मला लहानपणापासूनच गूढ आणि रहस्यमय गोष्टींमध्ये रस होता. त्या शिकण्याच्या नादात मी खूप मोठी चूक करून बसलो. मी रात्री-अपरात्री स्मशानात जात असे. तिथे माझी ओळख एका कापालिकाशी झाली. त्याने मला असे काही भुलविले की मी त्याचा आज्ञाधारक शिष्य बनलो आणि मग तो बोलेल अगदी तसंच मी वागत गेलो. अर्थात, त्यामध्ये माझाही फायदा झाला. आपल्या घराची भरभराट झाली. पण ह्या सर्वाची खूप मोठी किंमत मला मोजावी लागली."
(क्रमश:)