रक्तपिपासू - भाग ४
रक्तपिपासू - भाग ४
विक्रमला इतक्या वर्षांनी भेटून खूपच छान वाटत होतं..तो सध्या पुण्यात नोकरी करत होता..काही महिन्यांपूर्वीच त्याला नोकरी मिळालेली, त्यामुळे सध्या तरी अजून २ वर्ष तरी लग्न करण्याचा त्याचा विचार नव्हता. मला विक्रमशी बोलता बोलता कळले की, ह्या वाड्यात तो १-२ वेळा येऊन गेलेला पण वस्तीला काही तो थांबला नव्हता..तशी काकांची ताकीद होती त्याला..त्याने ही काकांना खूप वेळा विचारण्याचा प्रयत्न केला, पण काका नेहमी तू अजून लहान आहेस, योग्य वेळ आल्यावर मी नक्की सांगेन असे सांगून टाळत असत..काका मात्र गप्प राहून आमचं सगळं बोलणं ऐकत होते..पण काकीची नजर सुमनवर होती. ती सारखी मध्ये मध्ये सुमनला न्याहळत होती..
इतक्यात ती अचानक बोलली, "अभय, सुमनला दिवस गेले आहेत ना? मी तिला बघितल्यावरच ओळखलं होतं "
आणि तिचे डोळे भरून आले..
"अग, काकी मी तुला हे सांगणारच होतो" असे मी काकीला म्हणालो..
पण माझे बोलणे मधेच तोडत काकी म्हणाली, "तुला एकट्याला काकांनी बोलावलं होतं..तू हिला ह्या अवस्थेत इथे आणायला नको होतं" आणि तिचा चेहरा गंभीर झाला. अजून पुढे ती काही बोलणार होती,इतक्यात काका बोलले, "अरे, इथे गावात फारश्या सुविधा नाहीत ना म्हणून ती बोलतेय" असे बोलून त्यांनी काकीकडे एक कटाक्ष टाकला. मला आता काका-काकीचं गूढ वागणं असह्य होतं होते. त्यावेळेला खूप सारे प्रश्न माझ्या मनात होते आणि मला त्यांची उत्तरे हवी होती..विक्रमला ही खूप प्रश्न होते पण त्याला काय आणि कशी सुरुवात करावी हे कदाचित कळले नसावे किंवा काकांच्या भीतीमुळेही तो काही त्यांना विचारत नसावा..तसेही आम्हाला इथे राहायचे कुठे होते. एव्हाना संध्याकाळचे ६ वाजले होते..सुमनला थोडे अस्वस्थ वाटत होतं..कदाचित त्या वातावरणामुळे ही असेल की, अजून काही..त्यावेळेला तरी काही माहीत नव्हते.
मनात खूप शंका येत होत्या..मी सुमनला खोलीत आराम करायला सांगितले आणि तिच्या नकळत त्या म्हाताऱ्या बाबांनी दिलेली ती पुडी मी तिच्या उशीखाली ठेवली..बघता बघता काही वेळातच सुमनला झोप लागली..मी परत दिवाणखान्यात आलो. काका आणि काकीला ही सुमनच्या तब्बेतीबद्दल चिंता वाटू लागली..पण मी तिला ह्या गावच्या वातावरणाची सवय नसल्यामुळे असे झाले असे सांगितले..तसेच सुमन आता शांत झोपलीये हे देखील म्हणालो..तरी काका आणि काकी खूप चिंतेत दिसले.. विक्रमला हे त्या दोघांचे वागणे अपेक्षित असेल म्हणून तो त्याच्या खोलीत निघून गेला..जाता जाता "आई,मला जेवण झाल्यावर बोलावं" असेही तो म्हणाला. "आता बस्स!!" मी मनात पुटपुटलो.
मग मीच बोलायला सुरुवात केली, "काका इथे तर मला सगळे व्यवस्थित दिसतंय, मग तुम्ही तातडीने आम्हाला इथे का बोलाविले..असे काय घडलय इथे?"
मी पुढे बोलू लागलो, "मला आणि विक्रमला या वाड्यापासून का लांब ठेवलं जातंय? असं काय आहे ह्या वाड्यात..मी श्रीरंगपूरला आल्यापासून पाहतोय की, गावात वाड्याच नाव काढल्यावर भूत पाहावे तशी लोक लांब पळत होती..आल्यापासून मी बघतोय, तुम्ही आणि काकी दोघेही कसल्यातरी चिंतेत आहात..नेमकं काय घडलंय. सांगाल का? मला आता तुमचे हे गूढ वागणं असह्य होतंय..काय ते सांगा पटकन" माझा आवाज चढला होता..माझा आवाज ऐकून विक्रम ही धावत दिवाणखान्यात आला..
विक्रमला पाहून मला माझीच शरम वाटली..मी काका-काकीची माफी मागितली..कितीही झालं तरी माझ्याबाबतीत त्या दोघांनी आई-वडीलांची सगळी कर्तव्ये पार पाडली होती..भलेही मी मामाकडे राहत होतो..तरी माझा सगळा खर्च आणि मला जे लागेलं ते सर्व काही काका-काकी मला पुरवत होते..काका तर मी लहान असताना अधूनमधून मला भेटायला ही येत असतं..पण नंतर त्यांच्या कामाच्या व्यापामुळे असेल किंवा त्यांच्या वयामुळे असेल..त्यांचे येणे बंद झाले होते..पण तरीही पत्राद्वारे ते संपर्कात होते.. पण, माझ्या अश्या वागण्याचा त्यांना तिळमात्रही फरक पडला नव्हता.. हा पण माझ्या इतक्या सगळ्या प्रश्नामुळे काका आणि काकी थोडे गंभीर झाले होते हे नक्की..पण त्यांनी एकमेकांना सावरलं.
मग काका बोलू लागले, "अभय, विक्रम तुम्हा दोघांमध्ये आम्ही कधीही फरक केला नाही..मला माहितीये तुम्हा दोघांच्या मनाचा गोंधळ होतोय ते..पण बाळांनो, मी आणि रखमा दोघे जिवंत असेपर्यंत तरी तुम्हाला कसलाच धोका नाही..म्हणून आम्ही आजपर्यंत तुम्हाला ह्या सगळ्या सत्यापासून आजतागायत लांब ठेवलं..
काही दिवसांपूर्वी रखमा खूपच आजारी होती..होय, अभय, मला काही क्षणभर असे वाटलं मी रखमाला म्हणजे तुझ्या काकीला हरवून बसेन कायमचा आणि मग तिच्या पाठी माझं काय झालं तर ह्या वाड्याच गुपित कधीच कोणाला कळणार नाही..आणि काही विपरीत घडू नये म्हणून जेव्हा तुझी काकी थोडी स्थिरावली तेव्हा मी तुम्हा दोघांना तार पाठविली आणि तडक तुम्हा दोघांना बोलवून घेतलं.."
ते पुढे बोलू लागले,"आज मी सर्वकाही तुम्हाला सांगणार आहे..जे गुपित आजपर्यंत मी आणि रखमाने स्वतःजवळ ठेवली आहेत, ही सर्व गुपित उलगडण्याची वेळ आता आली आहे. बाळांनो, तुमचे आजोबा दिनकरराव हे खूप मोठे आसामी होते..त्यांच्या भरपूर ओळखी होत्या. त्यावेळेला ते गावचे पाटील होते म्हणून आपल्याकडे कधीही नोकर-चाकर आणि पैशाची काहीच कमी नव्हती. आपला हा वाडा पहिल्यापासूनच आडबाजूला होता..
तुमच्या आजोबांनी मुद्दामून त्यांची खोली वाड्यात एकाबाजूला बांधली होती..त्यांना म्हणे त्याकाळात कापालिकांचा आणि अघोरी विद्येचा खूप नाद लागला होता. त्यासाठी ते रात्रीचे लपून स्मशानात जात असतं.. एव्हाना त्यांची ओळख एका कापालिकाशी झाली होती आणि तो आजोबांवर भलताच खुश होता..
त्यानंतर आपल्या घराची खूप भरभराट झाली..मग आजोबांनी लग्न करून तुमच्या आजीला घरात आणली..पण आजोबांची एक अट होती की, त्यांच्या त्या आडबाजूच्या खोलीत कोणाला प्रवेश नव्हता, अगदी आजीला देखील नाही.. आजी वाड्यातल्या दुसऱ्या खोलीत राहायची..आजीला आजोबांच्या कोणत्याही कृत्याची तिळमात्रही माहिती नव्हती..ते कधी कधी अचानक रात्री घरातून गायब असत आणि भल्या पहाटे घरी परतत असत.
त्यावेळेला त्यांचा इतका दरारा होता की, त्याच्यापुढे बोलण्याची कोणाची बिशाद नसे.. त्यानंतर आम्हा दोघांचा जन्म झाला..त्यामुळे आईचा सगळा वेळ आमच्या दोघांचं करण्यात जात असे..आता तर माझे बाबा जास्त वेळ त्या खोलीत काढू लागले..
एकेदिवशी तर त्यांनी कहरच केला..ते २ दिवस झाले तरी खोलीतून बाहेर आले नाही..त्यांना खाण्यापिण्याची पण शुद्ध नव्हती..आणि त्यामध्ये मला खूप ताप आला होता आणि तो काही केल्या जाईना..मग आईने कशाची ही पर्वा न करता ती बाबांच्या खोलीत गेली..तिथे तिने काय बघितले कोणास ठाऊक!! पण त्यानंतर ती झोपूनच असायची आणि एकटक बघत राहायची..मग काही दिवसांनी ती वारली..पण बाबांना त्याचं कणभरही दुःख झालं नाही..कदाचित त्यांना हे दर्शवायचे होते की, चुकीला माफी नाही..मग तो कोणीही असो..त्यांना त्याचा फरक पडत नव्हता.. मग आम्ही दोघे भावंड गडी-माणसातच मोठे झालो.. पण कधीही त्या खोलीकडे डूमकूनही पाहिले नाही..कारण आता बाबा फक्त खण्यापिण्याकरताच खोलीबाहेर येत असत..त्या खोलीचं गूढ अजूनही आम्हा समोर उलगडले नव्हते. त्यानंतर बाबांनी आमच्या दोघांची एकापाठोपाठ लग्न लावून दिली आणि एक प्रकारची त्यांनी निवृत्ती घेतली.. त्यानंतर तुमचा जन्म झाला..एव्हाना वहिनी आणि रखमाला ही बाबांची सवय अंगवळणी पडली होती.. आणि त्यांचीही बिशाद नव्हती एक शब्द पण बाबांसमोर बोलण्याची..
असेच काही महिने गेले आणि मग अभय तुझा जन्म झाला..सगळे खूप आनंदी होते..पण काही केल्या रखमाची कूस काही उजवत नव्हती..आम्ही दोघांनी एक देव ठेवले नाहीत, खूप उपासतापास केले तरी काहीही उपयोग होत नव्हता..दादा आणि वहिनी नेहमी आम्हा दोघांना धीर देत असत..असेच २ वर्ष निघून गेली आणि एक दिवस बाबा आमच्या खोलीत आले..भलेही ते घरात जास्त लक्ष घालत नसले तरी त्यांना सगळी माहिती होती.. त्यांनी सुमनला कसलीतरी पुडी दिली आणि ती रोज मध्यरात्री थंड दुधातून घ्यायला सांगितली.. पहिल्यादा हे सगळं थोडे विचित्र वाटलं पण बाळासाठी आम्ही काहीही करायला तयार होतो म्हणून रखमाने ती पुडी घ्यायचं ठरवले आणि ते निघून गेले..
काही दिवसांतच रखमाने गोड बातमी दिली आणि मग आमच्या लग्नाच्या ३ ऱ्या वर्षी विक्रम तुझा जन्म झाला..
घर पुन्हा आनंदाने न्हाहून निघालं..
(क्रमश:)