रक्तपिपासू - भाग 2
रक्तपिपासू - भाग 2
त्या वाड्यातील शेवट शेवटचे दिवस आठवले तरी अभयच्या अंगावर सरसरून काटा जात असे. अभयला त्या वाड्याची आठवण ही ह्या घरात नको होती..रातभर असाच तळमळत अभय झोपी गेला. सकाळी नेहाने त्याला उठवले, तेव्हा त्याला जाग आली. अभयने मनाशी पक्के केले होते की, जे काही आहे ते सगळे आजच्या आजच नेहाला सांगून टाकावे. परंतू एका अटीवर, यानंतर तिने वाड्याचा नाद कायमचा सोडून द्यायचा आणि हा विषय ही कधीही ह्या घरात काढायचा नाही. कालच्या अनपेक्षित वागणुकीमुळे नेहा पूरती घाबरली होती. पण तिने ते अभयला न दाखवता झोपण्याचे नाटक केले. खरंतर रात्रभर ती जागीच होती. तिच्यासमोर सारखे ते वाड्याचे चित्र तरळत होते.
अभयने नेहाला जवळ घेतले आणि कालच्या प्रसंगाबद्दल तिच्याशी माफी मागितली. नेहा पण तिच्या बाबाला बिलगली आणि पुन्हा कधी त्या विषयावर बोलणार नाही की, विचारणार नाही ही शाश्वती तिने अभयला म्हणजे तिच्या बाबाला दिली. अभयला तिच्या समजूतदारपणाचे खूप कौतुक वाटले. पण तरीही आता वाड्याबद्दल सगळे नेहाला सांगायची वेळ आली होती! अभयने नेहाला समोर बसविले व खिशातून एक फोटो बाहेर काढला. हो, ट्रंकेतले सगळे फोटो जरी त्याने जाळून टाकले असले तरी वाड्याचा एक फोटो अजूनही त्याच्याजवळ होता. तो त्याने नेहाच्या समोर ठेवला. नेहा आश्चर्याने बघतचं राहिली.
अभय बोलू लागला, "हा आपला वाडा म्हणजेच श्रीरंगपूर मधले आपले घर..इथेच मी लहानाचा मोठा झालो. इथेच तुझा पण जन्म झाला..आपल्या गावच्या घरात त्यावेळेला माझे आजोबा-आजी, माझे वडील, माझे काका आणि गडी माणसे असे सर्वजण राहत होते..माझे आजोबा म्हणजेच तुझे पणजोबा दिनकर ठाकूर हे गावचे त्यावेळचे मोठे प्रशस्त व्यक्ती. सर्व गावावर त्यांचा फार मोठा दरारा होता. सगळे लोक त्यांना भरपूर मानसन्मान द्यायचे..पण हे बाहेरच्या लोकांसाठी पण घरामध्ये ते खूप गूढ वागायचे. माझ्या वडिलांचे म्हणजे तुझ्या आजोबांचे नाव सुधाकर आणि माझ्या काकांचे म्हणजे तुझ्या काका आजोबांचे नाव मधुकर होते..माझी आजी माझे बाबा आणि काका लहान असतानाच अल्पशा आजाराने वारली. त्यानंतर माझे बाबा आणि काका गडी माणसातच मोठे झाले. कारण आजोबांना त्या दोघांकडे बघायची सवडच कुठे होती.. आजोबा तासनतास त्यांचा वेळ त्यांच्या खोलीत घालवीत असत. त्या खोलीची साफसफाई ही ते स्वतः करत असत. अगदी कोणालाही त्यांच्या खोलीत जायची परवानगी नव्हती. असे त्या खोलीत काय होते हे कोणालाही माहीत नव्हते आणि आजोबांच्या भीतीमुळे कोणी ते जाणून घेण्याचा प्रयत्न ही केला नाही. काही वर्ष अशीच निघून गेली..माझे बाबा आणि काका आता मोठे झाले होते..त्यामुळे आजोबांनी त्या दोघांची एकापाठोपाठ अशी लग्न लावून दिली. त्यामुळे आता घरात दोन सूना आल्या होत्या. पुन्हा घर पहिल्या सारखे हसुखेळू लागलं. साऱ्या घराची जवाबदारी आजोबांनी आई आणि काकूच्या हातात सोपविली..एव्हाना त्यांनाही आजोबांची दिनचर्या व्यवस्थित कळली होती..तसेच हळूहळू आजोबांनी त्यांच्या व्यवसायाच्या पसाऱ्यातून ही काढता पाय घेतला आणि ती सगळी जवाबदारी बाबा आणि काकांच्या खांद्यावर सोपविली. त्यानंतर आजोबा फक्त न्याहरी आणि दोन वेळेच्या जेवणापुरते खोलीतून बाहेर येऊ लागले.
आपला वाडा दुमजली होता. घरात आत गेल्यावर समोर मोठा दिवाणखाना आणि बैठकीची खोली. मग डाव्या बाजूला देवघर. समोर स्वयंपाकघर. तसेच त्याच्या उजव्या बाजूला चार खोल्या व तशाच चार खोल्या वरच्या मजल्यावर सुद्धा होत्या. घराच्या मागच्या बाजूला न्हाणीघर. तसेच एक विहीर सुद्धा होती. खालच्या चार खोल्यांमध्ये ३ खोल्या ह्या बाजूबाजूला होत्या पण आजोबांची खोली जरा एका बाजूला होती. कदाचित कोणाचा हस्तक्षेप नको म्हणूनही त्यांची ती खोली एका बाजूला त्यावेळेला बांधली गेली असेल. माझ्या आई-बाबांच्या लग्नाला एक वर्ष होताहोता मी जन्मलो..आणि विक्रम म्हणजे माझा चुलत भाऊ माझ्यानंतर ३ वर्षांनी जन्माला आला.. आजोबांना आमच्या दोघांचे खूप कौतुक असे..आम्हाला खेळताना बघायला त्यांना फार आवडत असे..पण ते जास्त आमच्यात मिसळत नसतं..
मला अजूनही तो दिवस चांगला आठवतोय..मी चालायला लागल्यापासून घरभर फिरत असे..त्यामुळे मला आजोबांची खोली ही माहीत झाली होती..पण मी तिकडे कधीही फिरकलो नव्हतो..एक दिवस आई आणि काकू कामात खूप व्यस्त होत्या..तेव्हा मला कसलातरी आवाज ऐकू आला..विक्रम खूप लहान होता त्यामुळे तो तिथेच खेळत राहिला..तो आवाज आजोबांच्या खोलीतून येत होता..मी आजोबांच्या खोलीजवळ गेलो तर खोलीचा दरवाजा किंचित उघडा होता.. मी त्या फटीतून आत गेलो आणि माझ्या आवाजात आजोबा आजोबा हाक मारायला लागलो..पण त्या खोलीत कोणीच नव्हते..पण कदाचित आईने मला त्या खोलीत जाताना बघितले होते..ती माझ्यापाठून मला हाका मारत आली..त्यानंतर काय झाले हे मला आठवत नाही..पण आई त्या दिवसापासून सारखी झोपूनच असायची..घरातली गडी माणसे ही त्यानंतर कधीच मला त्या घरात दिसली नाही..आई काहीच बोलत नसे..काही दिवसांनंतर ती घरात दिसेनाशी झाली..मी जेव्हा काकीला विचारले तर ती म्हणाली की, आई देवाघरी गेली म्हणून..त्यांनतर काही महिन्यांनी बाबापण वारले..त्यांना सतत कसली तरी काळजी असायची म्हणे..
मग काकीने मला माझ्या आजोळी आणि विक्रमला त्याच्या आजोळी पाठविले..मग मी माझ्या मामाकडे मोठा झालो आणि माझे लग्न ही मामानेच करून दिले..काका काकू तर लग्नालाही आले नव्हते..मामा कडून आजोबा वारल्याची वार्ता ही कळली होती..विक्रमशी माझा काहीच संपर्क नव्हता.
महिन्यातून एकदा काका खुशालीच पत्र पाठवीत असत..विक्रम ठीक आहे इतकाच मजकूर विक्रमबद्दल लिहिला जात असे. पण विक्रमची आणि माझी भेट काही झाली नव्हती..हळूहळू वाड्याच्या आठवणी धूसर होत चाललेल्या..
तुझ्या आईचं मी नाव बदलून सुमन ठेवलं..हे माझ्या आईचे नाव असूनही तिनेही ते प्रेमाने स्वीकारलं..आमचा संसार मजेत चालला होता. वर्षभरातच सुमनने आनंदाची बातमी दिली..ती गरोदर राहिली होती..तिला ४ महिना सुरू होता..तेव्हा अचानक काकांची मला तार आली की, ताबडतोब निघून ये. मला काहीच सुचत नव्हतं..पण इतक्या वर्षात पहिल्यांदा काकांनी मला वाड्यात बोलविले होते. मी निघायची तयारी केली..पण काही केल्या तुझी आई ऐकायला तयार नव्हती..तिनेही यायचा हट्ट केला..तिला असे एकटीला सोडून मला जाता ही येत नव्हतं..मग म्हटलं ४-५ तासांचा प्रवास आहे. काही दिवस तिथल्या वातावरणात तुझी आई चांगलीच रुळेल आणि काकी तर आहेच तिथे.. म्हणून आम्ही दोघे श्रीरंगपूरला जायला निघालो..पण मला काय माहीत होतं की, तिथे आमच्यापुढे काय वाढून ठेवलंय ते!!"
आणि अभय रडू लागला..
(क्रमश:)