Shilpa Desai

Comedy Drama Fantasy

4.0  

Shilpa Desai

Comedy Drama Fantasy

पांडूचं भूत आलं रे आलं

पांडूचं भूत आलं रे आलं

11 mins
228


बाहेर पावसाची रिपरिप चालू होती. त्यामुळे हवेत गारवा होता. थंडीमुळे पांघरुणातून बाहेर पडू नये असं गोपाळाला मनोमन वाटलं. दुपारी जेवणात बहिणीने केलेली वडे-सागोती खाऊन पोट तुडुंब भरलं होतं. त्यामुळे आणखी थोडा वेळ मस्तपैकी झोपून द्यावं असा विचार आला आणि चटकन हातातल्या घड्याळाकडे लक्ष गेले. संध्याकाळचे पाच वाजले होते. अरे देवा! खूपच वेळ झाला, असं म्हणत गोपाळ पांघरुणातून खडबडून उठला. अंगात सदरा चढविला. खुंटीला लावलेली छत्री आणि पिशवी घेतली. मागल्यादारी काम करत असलेल्या बयोला हाक दिली. 'येतो ग बयोआक्का, सव्वा पाचची गाडी यायची वेळ झाली.'


तशी बयो बाहेर आली मागोमाग भावजीपण आले. " गोपाळ आताची वेळ राहा की इथेच निवांत. पाऊस पण खूप भरलाय . केव्हा आलास तर घटकावर राहत सुद्धा नाहीस तू. आजची रात्र थांब सकाळी उठ आणि पहिल्या गाडीला जा ". भावोजी राहायचा असा आग्रह करू लागले.


तसा गोपाळ म्हणाला, "भाऊजी खरंच थांबलो असतो,... पण उद्या लावणीच काम काढलं, गडीमाणसं बोलावली आहेत तेव्हा गेलेच पाहिजे." असं सांगून त्याने बयोचा आणि भावोजींचा निरोप घेतला.


आता तो लवकर लवकर चालू लागला. सव्वापाचची एसटी मिळणे आवश्यक होते. त्यानंतर सोनखेडला जायला गाडी नव्हती. एसटी थांब्याजवळ येऊन तो बस येण्याची वाट पाहू लागला. एक तास झाला तरी काही एसटी येईना. साडेसहा वाजले. घड्याळाचा काटा पुढे पुढे सरकत होता आणि पावसानेही जोर धरला होता तसा गोपाळ काळजीत पडला. बाजूच्या पानपट्टी वाल्याकडे त्याने जाणाऱ्या गाडीची चौकशी केली; तेव्हा त्याला समजले की पुलावरून पाणी जात असल्याने आज गाडी वाडीला आली नाही. त्यामुळे सोनखेडची गाडी बंद ठेवली आहे. हे ऐकून आता मात्र गोपाळची चांगलीच धांदल उडाली. त्याच्या मनात आलं की बयोआक्काच्या घरी परत जाऊ का. पण...उद्या गडीमाणसं बोलावली आहेत. लगेचच त्याचा विचार बदलला. चालत सोनखेडला गेल्यास नऊ वाजेपर्यंत पोहोचायला होईल. गोपाळने हातातलं घड्याळ पाहिले नुकतेच सात वाजले आहेत. तसा खूप उशीर झाला नाही. दोन अडीच तासात सहज घरी पोहोचेन. मनातल्या विचाराबरोबर तो चालत निघाला. अर्ध्या वाटेत आल्यावर लक्षात आलं की रात्र झाली नाही पण सभोवार गडद अंधार आहे. बहुतेक आज अमावस्या आहे. मग मात्र त्याच्या छातीत धडधडू लागले. आजची रात्र बयोआक्काकडे थांबलो असतो तर बरं झालं असतं. अमावास्येचं कस आपल्या लक्षात आलं नाही. त्याचं त्याला समजेना. भावोजी थांबण्यास सांगत असताना आपण थांबलो नाही याचा त्याला राग येऊन त्याने आपल्या तोंडावर दोन चापटया मारल्या. विचारांच्या तंद्रीतच असताना समोर हाकेच्या अंतरावर पांडू पवारचं घर दिसलं. घराच्या पडवीत कंदील मिणमिणत होता. त्याच्या प्रकाशाने गोपाळला उगाचच दिलासा वाटला. पण हे समाधान क्षणातच मावळले. कारण एक महिन्यापूर्वी पांडू पवार नदीत बुडून मेला होता. त्याची आठवण होताच गोपाळ घामाने भिजला. ' राम राम राम' म्हणत देवाचा धावा करू लागला. आता तर तो धावतच सुटला. नदीच्या उतरणीला येतात त्याच्या डोळ्यांना अंधारी येऊ लागली. चालता चालता होळकांड्याच्या नदीवर येताच रातकिड्यांच्या किर्र-किर्र आवाजाने पोटात भीतीचा गोळा येत होता. नदीकडच्या घनदाट झाडीत उगाच कसल्यातरी आकृत्या दिसत होत्या. जवळ टॉर्च पण नव्हती. नदीला चांगलाच पूर येऊ लागला होता. नाही म्हटलं तरी छाताड्यापर्यंत पाणी आलं होतं. गोपाळला चांगले पोहता येत असल्याने तो पुराला घाबरत नव्हता. भीती फक्त भुताची वाटत होती. नदीजवळ येताच त्याने आपले धोतर पटकन छत्रीला बांधले. दुसऱ्या हातात पायताण काढून घेतली व नदीत उतरला. तोंडाने मात्र श्रीरामाचा जप चालू होता.


इतक्यात वरच्या बाजूने झाडीत काहीतरी खळबलण्याचा आवाज आला. काय सरसरते हे पाहण्यासाठी त्याने डोळे वटारले. तशी त्याची पूर्ती गाळण उडाली. नदीच्या वरच्या अंगाला कुणीतरी मासे पकडत होता. खांद्यावर घोंगडी आणि हातात कंदील होता. 'पांडू पवार.............!' त्याच्या मनाची खात्री पटली आणि दरदरून घाम आला. पुन्हा एकदा अमावस्येची आठवण झाली. म्हणजे पांडूचं भूत मासे धरायला आले तर. आठ दिवसापूर्वी धुणी धुण्यास येणाऱ्या दोन बायकांना पांडूचे भूत दिसले होते. असे दुपारी जेवताना बयोआक्का सांगत होती. रामग्याच्या पोरग्याला भूतबाधा झाली. नदीवर घाबरला होता तो. तापाने चार दिवस फणफ़नतोय. किती देव-धर्म केले तरी ताप कमी होत नाही.


बऱ्याच वेळा पांडूचे भूत मासे पकडताना अनेकांच्या नजरेस पडले होते. त्यामुळे भीतीने लोकांनी या रस्त्याला रहदारी कमी केली होती. गोपाळला आता भुतांच्या अनेक गोष्टींची आठवण व्हायला लागली. लहान असताना जाणत्या लोकांनी सांगितलेल्या गोष्टीचे चित्र प्रत्यक्ष डोळ्यासमोर दिसू लागले. तस तसं अंगात कापरं भरायला लागले. पायातले अवसान गळाले. पाण्यात असून अंगाला घाम फुटला होता.


कसली दुष्टबुद्धी झाली आणि बयो कडून बाहेर पडलो, असं गोपाळच्या मनात आलं. भूत आपल्या दिशेने येत आहे काय याचा अंदाज त्याने घेतला. आता भूत पकडणार आणि आपल्याला खाऊन टाकणार असं त्याला वाटलं. तरीदेखील तो प्राण कानात गोळा करून पळत सुटला. त्याने नदी कधीचीच पार केली होती. मधेच एकदा छत्रीचा दांडा ओढला गेल्याने दांड्याला बांधलेले धोतर सुटलं. पण ते सुटलेलं धोतर बांधण्याचे अवसान त्याच्याकडे नव्हते. सुटलेले धोतर गळ्यात अडकवून तो पळत सुटला. या साऱ्या गडबडीत जिवापाड जपुन ठेवलेली पायताण नदीच्या कडेला राहिले. पण त्याचं भान त्याला नव्हतं.


मागून पावलांचा आवाज येतो असा त्याला भास झाला तसं त्याला समजलं की भूत नक्कीच आपला पाठलाग करत आहे. या जाणिवेने त्याचे पाय लटपटू लागले. कानातून गरम वाफा येऊ लागल्या. तरीदेखील तो सारखा धावत होता. आता तर भूत हाका मारू लागले.''गोपाळा.......... रे.......... गोपाळा'' आता आपल्या जीवाचं काही खरं नाही. भुताच्या हाकेला प्रतिसाद देऊ नये. भुत बाधा करते. हे त्याला ऐकून माहीत असल्याने त्या हाकेला गोपाळने प्रतिसाद दिला नाही..मागे वळून बघण्याची तर त्याच्यात हिम्मत नव्हती. आणि वाट काही सरत नव्हती. तोंडाने 'राम राम' नामाचा जप चालला होता. पण तेही नीट उच्चारता येत नव्हतं. 'श्रीराम राम श्रीराम' ऐवजी '' राम नाम सत्य आहे" याची जाणीव त्याला जास्त होत होती. 'गोपाळ...' ही आरोळी पुन्हा कानावर आली. आता काही आपली धडगत नाही. आता कितीही धावत सुटलो तरी भूत हात लांब करून मानगुटी पकडण्याची शक्यता जास्त होती. लहानपणी आजोबा सांगायचे भुताचे हात खूप लांब होतात. त्याची आठवण होऊन आता त्याच्या अंगात ताप भरल्या सारखे वाटू लागले. त्याही स्थितीत गोपाळ धावत होता. मैलाच अंतर पार केल्यावर गावातले विजेचे दिवे दिसू लागले. तसं सोनखेड जवळ आलं हे त्याला समजलं. वडाच्या झाडाजवळ दोन फाटे होते डावीकडचा रस्ता शहरात जातो तर उजवीकडचा कच्च्या मातीचा रस्ता गावात जायचा. रस्ता कुठला गावात जाणार आहे हे ओळखण्याचे त्राण त्याच्या अंगात राहिले नव्हते. वाट फुटेल तिकडे तो पळत सुटला. पण नशीब बलवत्तर म्हणून गोपाळ दाजीबाच्या घरापर्यंत येऊन पोहोचला. दाजीबाचा दरवाजा उघडा असुदे म्हणजे घरात शिरता येईल. असा विचार त्याच्या मनात येत होता. पण छे दाजीबा घराचा दरवाजा बंद करून खुशाल टीव्ही सिरीयल बघत बसला होता. गोपाळने जिवाच्या आकांताने दार ठोठावलं पण दाजीबा काही दार उघडेना. मात्र दाजीबाचा बांधून ठेवलेला कुत्रा पडवीत भुंकत होता. भुत कधी येईल हे सांगता येत नव्हतं. गोपाळ खूपच घाबरला.


"दाजीबा दार उघड", गोपाळने आरोळी ठोकली. 'कोण बोलतोय..' असं म्हणत दाजीबाने अगोदर कानोसा घेतला व मग दार उघडले. दरवाजा उघडताच दाराला टेकून असलेला गोपाळ दाणकन घरात पडला. गोपाळची दातखडी बसली होती व तो बेशुद्ध झाला होता. हा सगळा प्रकार बघून दाजीबा खूप घाबरला दाजीबाच्या डोळ्यात चटकन पाणी आलं जिवाभावाच्या मित्राला अशा अवस्थेत बघून तो गहिवरला. 'शेवन्ते, एक कांदा ठेंचून आण लवकर'. लागलीच दाजीबाची बायको शेवंताने कांदा आणला गोपाळच्या नाकाला लावला पण काही उपयोग झाला नाही .आता मात्र दाजिबाला राहावेना त्याने आपली चामड्याची चप्पल आणून गोपाळच्या नाकावर टेकवले तसा गोपाळ शुद्धीवर आला व बोलायला लागला. पांडू भूत पांडू,....... भुं ....त एवढंच तो बोलला आणि पुन्हा निपचित पडला आता काय करावे म्हणजे त्याला बरं वाटेल हे दाजिबाला समजेना.


दाजीबाच्या लक्षात आले की गोपाळा जेव्हा दरवाजावर आला तेव्हा गोपाळच्या पायात पायताण नव्हती. धोतर गळ्यात अडकलेलं आणि निपचित पडला तसा तोंडावाटे फेस येऊ लागला. सगळं अंग घामाने भिजले होते. इतक्या रात्री गोपाळ कुठे गेलेला याचा पत्ता लागेना. शेवटी दाजीबाने गोपाळच्या हाताची नाडी व्यवस्थित चालू आहे म्हणून चाचपली ती जवळ जवळ बंदच होते कीं काय असं दाजीबाच्या लक्षात आलं. दाजीबाने त्याच्या डोळ्यावर पाणी मारले गोपाळ काही केल्या डोळे उघडेना.


"सकाळी भावोजी बयोआक्काकडे जातो असं म्हणत होते. रामा भाऊला सांगताना मी ऐकलं होतं बहुतेक वाडीतून चालत आले असावे" दाजीबाच्या बायकोने मध्येच येऊन सांगितले तसा दाजीबा चरकला.


रात्रीचे दहा वाजले आणि गोपाळ शुद्धीवर आला. आपण कुठे आहोत याची त्याला भ्रांत नव्हती दाजीबाने गोपाळच्या जवळ येत त्याला हळूच विचारले. "गोपाळा अरे तुला काय झालं रे? अशी तुझी कशी अवस्था झाली आहे. तुला भूतबीत दिसले की काय? तसं गोपाळने 'राम राम ' म्हणत सांगितलं "पांडू पवाराचा भूत पाठीमागे लागले आहे माझ्या." एवढं बोलून होत न होत तोच गोपाळ पुन्हा निपचित पडला.


दाजीबा समजून गेला पांडू पवार बुडून मेला. त्यांना एक महिना होऊन गेला होळकांड्याच्या नदीवर त्याच्या भुताने वस्ती केली आहे. त्याच्या भुताने कैक लोकांना बेजार केले आहे. भुताखेताच्या सिमेत गेलं की बाधा होणारच. दाजिबाला काही सुचेना रामा परबला तरी सांगून यावर उपाय विचारावा. म्हणून त्याने रामाला साद घातली.


दाजीबाच्या आवाजाने शेजारचा रामा धावतच बाहेर आला. दाजिबाला घाबराघुबरा झालेला बघून रामाला वाटलं वहिनीच्या पोटात दुखत असावे. वहिनीचे दिवस भरत आले होते. पहिलं बाळंतपण म्हटल्यावर दाजीबा घाबरणं सहाजिकच होत.


" वहिनींना जास्त कळा येतात काय रे." रामानेच चौकशी केली.' बायकोच बरं आहे रे, पण गोपाळ, देवळाकडचा गोपाळ रे. भूतबाधा झाल्यासारखा करतो. अंगात ताप भरला आहे. बयोकडे वाडीला गेलेला. पावसामुळे वाडीला गाडी केली नाही. त्यामुळे चालत आला गावापर्यंत. पवारवाडीत होळकांड्याच्या नदीवर पांडू पवाराच्या भुताने धरलं त्याला. वेळ बरा म्हणून माझ्या घरापर्यंत तरी येऊन पोहोचला. नाही तर काय झालं असतं देवास ठाऊक.

''चल जाऊन बघू या गोपाळला'', असं म्हणत रामा पुढे सरला दोघेजण दाजीबाच्या घरी परतले. गोपाळ झोपला होता त्या बाकावर जाऊन रामा बसला व गोपाळला चाचपु लागला. "अरे काय सांगू रामा मगासपासून 'पांडू आला पांडू आला' असंच सारखं विव्हळत आहे", दाजीबाने खुलासा केला.

गोपाळची की दशा बघून रामा बोलला,' त्याला पांडूच्या भूतान खूप झपाटलेला आहे बहुतेक.

''आता यावर उपाय काय'' दाजीबाच्या बायकोने कसंसच होऊन विचारलं.

भिवगो घाडी यावर उतारा सांगतो. अंगातलं भूतही काढतो. त्याला बोलावून आणलं पाहिजे. रामाने खुलासा केला. लागलीच रामा व दाजीबा भिवग्याला घेऊन आले. तेवढ्यात कोणीतरी गोपाळच्या आईला घराकडून घेऊन आले.

म्हातारी अगदी कावरीबावरी झाली पोराला अचानक काय झालं म्हणून व्याकुळ झाली.सकाळी बयोकडे जाताना व्यवस्थित तर होता. आता आक्रीत काय झालं. गोपाळच डोकं आपल्या मांडीवर घेत ती गोपाळला विचारू लागली माझ्या झिला, तुला काय होतं रे भूत बीत लागलं काय रे तुला. आईच्या आवाजाने गोपाळला रडू फुटलं, पुन्हा अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. त्या अवस्थेत गोधडीतून डोकं बाहेर काढत गोपाळ म्हणायला. "आये पांडू तिकडे होता"

हे ऐकताच म्हातारीचे काळीज चरचरले. ती जोरजोराने रडू लागली.

म्हातारीचा रडगाणं संपेना त्यामुळे कंटाळून गेलेल्या भिवग्या घाडीच्या अंगात आलं, हुश,...... हम्म्म हम्म्म... असा आवाज काढत भिवा थरथरू लागला. मग भिवग्या घाडीने गोपाळला विचारलं, " बोल तू भूत आहेस की संमंध."

"भूत", गोपाळने अंगाचा थरकाप करीत उत्तर दिले.

'कोणाचे भूत आहेस.'

'पांडूचा', गोपाळ म्हणाला.


बघणाऱ्या लोकांना वाटलं की या भिवग्या घाडीला सगळं कळतं आणि तो भूता बरोबर बोलत आहे. हे भिवग्या घाडयाच्या लक्षांत येताच त्याला आणखीनच चेव चढला. अंग थरथरल्यागत करीत तो पुन्हा म्हणाला,"बर्‍या बोलान सांग तुला काय हवे."


ह्या प्रश्नाला गोपाळ काहीच बोलला नाही हे पाहून भिवग्या घाडी म्हणाला, पांडूच्या भुतान माझ्या कानात येऊन सांगितलं की त्याला उलट्या पाकाचा कोंबडा, पायलीभर तांदुळ, एक नारळ, शेरभर तूप आणि ५०१ रुपये हवेत .


"भुताचं काय म्हणणं असेल तर त्याच देणे देतो. पण माझ्या लेखाचा काही चुकलं असेल तर त्यांला माफ कर असं पुन्हा होणार नाही", म्हातारी आई मध्येच बोलली. "ठीक आहे" मग तोंडाने काहीतरी पुटपुटत भिवग्याने गोपाळाला अंगारा लावला. आणि आपल्या अंगात आलेल्या संचाराला सोडत इतरांना उद्देशून म्हणाला, "हे बघा गोपाळच्या अंगात शिरलेलं भूत आता गेलं. पण भुताने जे मागितले आहे ते रात्री बाराच्या अगोदर नेऊन पिंपळाकडे ठेवा.


मग लागलीच सर्वांनी मिळून लवकर लवकर सामानाची जमवाजमव केली. रामाने पाचशे रुपये किंमत सांगून आपल्या घुडातला उलट्या पाकाचा कोंबडा आणला. सगळं सामान घेऊन दाजीबा, रामा आणि भीवा घाडी पिंपळाकडे निघाले. तिथेच कोंबड्याला कापला गेला. मग सीमेवर कोंबड्याचं रक्त टाकुन राहिलेलं सामान भुताच्या नावाखाली भिवा घाडी आपण घेऊन गेला. दाजिबा व रामा मात्र रिकाम्या हाताने परत आले.

सगळ्यांच्या चेहऱ्यावर मात्र आता समाधान होते कारण भूत निघून गेलं असं सगळ्यांना वाटत होतं. भिवग्या घाड्याचा उतारा मात्र चांगलाच आहे. असे प्रत्येकाला वाटू लागले.

रात्र बरीच झाल्याने जमलेली मंडळी आता पांगू लागली. मात्र गोपाळ व त्याची आई त्या रात्री दाजीबा कडेच राहीली. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघे उठून आपल्या घरी गेले. घरी जाऊन गोपाळने आंघोळ केली. थोडा थकवा जाणवत होता म्हणून तो अंथरुणात पुन्हा येऊन लवंडला. तोच शेजाऱ्यापाजाऱ्यांना गोपाळ आल्याची बातमी लागली. झाडून सर्व शेजारी त्याला बघायला आले. सगळेजण रात्रीच्या घटनेला पुन्हा पुन्हा चघळवू लागले. गोपाळ सर्वांना पांडूच्या भुताने आपला पाठलाग कसा केला. भूत हाका कस मारत होते. याचे इत्थंभूत वर्णन सांगितले.


'उलट्या पाकाचा कोंबडा भुताला दिला तेव्हाच भुताने सोडलं याचा वेळ बरा म्हणून झालं नाही तर माझा पोरगा हातचा गेला असता', आई डोळ्याला पाणी आणून बोलली. तिकडे सदू मुंजेला देखील समजलं की गोपाळ रात्रीपासून खुप आजारी आहे. म्हणून तोही गोपाळच्या घरी गोपाळला पाहण्यासाठी आला. अंगणातच उभे राहून त्यांने साद घातली,. '' गोपाळा..... रे ....गोपाळा "

गोपाळच्या कानावर हे शब्द पडतात त्याच्या पोटात भितीचा गोळा आला. तोंडातून शब्द फुटेना हात पाय पुन्हा लटपटायला लागले. पुन्हा अंगात हुडहुडी भरली. " आये भूत..... " असे म्हणत गोपाळने अंगावर गोधडी पांघरून घेतली. आणि अंथरुणात कलंडला. गोपाळचं मध्येच काय झालं, आता तर बरा होता. सदू आला, त्याला पाहिलं आणि गोपाळ पुन्हा घाबरला अशी कुजबूज चालू झाली. सदूला ही समजेनासे झाले, की हा प्रकार काय आहे."गोपाळ तुला काय होत आहे." म्हणून सदूने विचारताच गोपाळच्या आईने रात्रीची कहाणी सांगायला सुरुवात केली, "सदू' अरे त्याला पांडू पवाराच्या भुताने झपाटलेला. काल वाडीला गेला होता. पावसाने हा झपाटा लावलेला. नदीच्या पुलावरून पाणी जायला लागलं तेव्हा एसटी वाडीला गेलीच नाही बघ. म्हणताक्षणी हा आपला सुटला चालत. अमावस्येचपण त्याच्या ध्यानात राहिले नाही. होळकांड्याच्या नदीवर भुताने धरलं त्याला. फाट्याजवळ आणून सोडलं बघ. माझ्या लेकाचे नशीब बलवत्तर म्हणून हाताला गावला. बयोकडे रात्रीचाला स्थिरावला असता तर बरे झाले असते; असे आक्रीत तरी घडले नसते.

"आक्रीत !' वगैरे काही नाही बघ काकी. काल मी आमच्या म्हशीला दुखनं झालं म्हणून वाडीला गुरांच्या दवाखान्यात औषध आणायला गेलो होतो. एसटीची गाडी नाही म्हटल्यावर चालत सुटलो. अर्ध्या वाटेत येईपर्यंत काळोख झाला. म्हणून वस्ती वरच्या जन्या पवारांकडून कंदील पेटवून घेतला. नदीजवळ येताच गोपाळ दिसला. म्हटलं बरं झालं बोलत जायला सोबत भेटला. म्हणून हाक मारली, तर गोपाळ काही ओ देईना. उलट पळत सुटला. अगदी मॅरेथॉनच्या स्पर्धेत भाग घेतला की काय याने??? असच मला वाटू लागलं. इतका वेगाने धावत सुटलेला. पुन्हा हाक मारली तर हा आणखीनच पळायला लागला. मलापण समजेना हा एवढा कशापाई पळतो. मग मी सरळ घरी आलो. आज सकाळीच अनंता गुराखी मला म्हणाला, गोपाळला रात्रीपासून खूप बरं नाही आहे. तब्येत बिघडली आहे त्याची. म्हणून लगेच याला बघायला आलो. तेव्हा समजलं गोपाळ मलाच भूत समजून आजारी पडला."

सदूचे हे बोलणे ऐकून गोपाळाला हायसं वाटलं. अंथरुणातून लगेच उठून चक्क तो आनंदाने ओरडला,"पांडू गेला रे गोपाळा " आता त्याचा ताप कुठच्या कुठे पळाला होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy