मुलास पत्र
मुलास पत्र
प्रिय चिन्मय
तुला होस्टेलला ठेवून आज महिना झाला. या पूर्ण महिनाभरात एक दिवसदेखील असा गेला नाही, की जेव्हा मला तुझी आठवण आली नाही. जेवणाचा प्रत्येक घास तुझ्या आठवणीत गिळलेला आहे. प्रत्येक वेळी मनात येतं, माझ्या पोराने काय खाल्लं असेल? ,माझं पोरगं तिथे कसं राहत असेल? आजपर्यंत तो कधी आई बापाला सोडुन राहिलेला नाही आणि आज अचानक आपण त्याला होस्टेलला टाकून आलो. तुझ्या उज्वल भवितव्यासाठी ही पावले टाकलेली आहेत. जेव्हा तुला मी होस्टेलमध्ये सोडून आले, तो क्षण मी विसरू शकलेले नाही. आजही तो माझ्या डोळ्यापुढे तसाच आहे. खिडकीच्या
आतल्या बाजूने तू, आणि बाहेरच्या बाजूने मी, आपल्या दोघांच्या डोळ्यातून देखील गंगा-यमुना वाहत होत्या. तुला सोडताना अगदी माझे पाऊल तिथून निघतच नव्हते. परंतु तुझ्या या अजाणत्या वयात, म्हणजे धड लहान आहेस, ना तू मोठा आहेस, अशा वयात मी तुला मिलिटरी होस्टेलला टाकण्याचे एकमेव कारण म्हणजे, तू कणखर बनला पाहिजेस, देशप्रेमाने ओतप्रोत भरून गेला पाहिजेस. तिथे तुला शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारची तंदुरुस्ती मिळेल. तुझ्यावरती चांगले संस्कार होतील. तुला विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यास मिळेल. आणि मला खात्री आहे तू आपले आणि देशाचे दोन्ही नावे उज्वल करशील. आणि त्यावेळी तुला वाटेल आपल्या आईने केले ते बरोबर केले होते.
या समाजातील सुसंस्कृत नागरिक बनण्यासाठी, भारत देशाचा स्वाभिमानी नागरिक बनण्यासाठी, तू शारीरिक आणि मानसिक रित्या मजबूत कणखर बनण्यासाठी, मी तुला आज माझ्यापासून दूर केले आहे. माझ्या मातृ प्रेमाला आवर घातलेला आहे .आता शिक्षण संपवून जेव्हा तू माझ्या समोर येशील तेव्हा तू एक संस्कारशील संवेदनशील मजबूत असा युवा असशील. आपल्या शिक्षकांचा मान ठेव, त्यांना गुरुस्थानी मान. ते निव्वळ शिक्षक नसून ,गुरु आहेत. जीवनात जगण्याचे, राहण्याचे सगळे व्यवहार ते शिकवणार आहेत .आपल्या बरोबरच्या सहोद्याना मोठ्या मुलांना मोठ्या भावाचा मान दे. लहान मुलांना छोट्या भावाप्रमाणे सांभाळून घे, आणि तेथे छान रहा. अरे बघता बघता आत्ता दिवाळीची सुट्टी येईल आणि मग तुला चांगलं महिनाभर घरी येता येईल. मात्र तत्पूर्वी छान व्यवस्थित अभ्यास कर.
तुझीच आई