मंगेश पाडगावकर - स्मृतीस्मरण
मंगेश पाडगावकर - स्मृतीस्मरण
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
सुकलेल्या चिखलाची
एक वाट दिसते ना ?
तिथून एक झरा जायचा ....
आता काही नाही !
मंगेश पाडगावकर,फक्त नावच पुरेसं आहे, आज मराठी साहित्य विश्ववातला निखळता झरा सुकला आहे.
सांग सांग भोलानाथसारख्या कवितांतून त्यांना बालपणात पाहिलं, प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं म्हणत पाडगावकरांनी आमच्या पिढीला प्रेमात पडायला, जगायला शिकवलं. खऱ्या देवाचे स्थान कुठे मी वाचलेल्या खुपश्या कविता या प्रेम, सखी, मन, हृदय या विषयांशी आहेत, अन त्या मला नेहमीच अतीव प्रिय असतील. मला पाडगावकर आवडतात ते त्यांच्या लिखाण मांडणीच्या शैलीत असलेला संवादी,ओघवतेपण, नादमाधुर्यता अन सोपे शब्द यामुळे, पाडगावकरांच्या प्रेम कविता या सगळ्याच मराठी जगताने खूप आपल्याश्या केल्या आहेत. माझ्या पिढीतल्या तरुण प्रेम कविता लिहिणाऱ्याकरीता पाडगावकर हे हृदयस्थ असलेले देवच आहेत, अनेकांच्या हृदयात त्यांच्या स्मृती, रोमीओ ज्युलियेट, नवा करार, बोलगाणी, तुझे गीत गाण्यासाठी या पुस्तकांच्या रुपाने, यांतील कवितांच्या रुपाने कायमसाठी राहणार आहेत.
कधीतरी मला एका व्यक्तीने हिणवले होते, की तू फक्त प्रेमकविताच लिहितो, मला मात्र या गोष्टीचं अजिबात वाईट वाटत नाही, मी मंगेश पाडगावकर यांच्या अनेक प्रेम कविता वाचल्या, ऐकल्या आहेत, त्यांच्यासारख्याच कविता माझ्याही असाव्यात यासाठी मी आयुष्यही वेचले तरी जमू शकणार नाही. मराठी गीतकाव्यातला तो एक सूर्यच होता. त्यांच्या कितीतरी कवितांना पंडित श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध करुन मराठी रसिकांच्या ओठी रुळवले आहे, जिप्सी हा त्यांचा एक वेगळा काव्यसंग्रह, आहे. यातील कविता जरा समजायला अवघड वळणाच्या, सहज अर्थ लागेल अशा, पण त्यांच्या कोणत्याही काव्यसंग्रहाला नेहमीच मराठी माणसाची भरभरून दाद होती. पाडगावकर जेव्हा जाहीर कार्यक्रमात कविता वाचून दाखवत, तेव्हा भान राहत तर नसेच मात्र रडायला यायचं
पाडगावकर यांच्या कवितांची शैली खूप निराळी होती, ते कविता अतिशय सुंदर म्हणून दाखवत असत, त्यांच्या आवाजातल्या गोडव्याने ती आणखीनच मंजुळ वाटत असे, प्रत्येक चरण झाल्यावर धृवपदही ते गात असत, र ला र,ट ला ट अशा प्रकारच्या यमकी नियमात ते फार नव्हते, मुक्तछंद, छंदबद्ध, गझल असे सगळेच काव्यप्रकार पाडगावकर यांच्या कवितांत दिसून येतात, पाडगावकर लहान मुले, तरुण कवी यांच्यावर खूप प्रेम करणारे होते, त्यांना भेटून गेलेला हरेक जीव सुदैवीच म्हणायचा.
आता पावसाळ्याची मी वाट बघणार नाही, कारण पाऊस पडून गेल्यावर पेपरात पहिल्या पानावर पाडगावकरांची नवीन कविता नसेल, दिवाळी अंकही घ्यायची ओढ कितपत लागेल माहीत नाही कारण, त्यातूनही मंगेश पाडगावकर भेटणार नाहीत. आज इथेच थांबतो पण जाताना
ना कुणी संगती, साथ ना सोबती
क्रूर काळोख हा, दीप ना भोवती
ही हवा वादळी
रात्र ही आंधळी
मेघ काळे वरी, भास वेडावती
क्रूर काळोख हा, दीप ना भोवती
मंगेश पाडगावकरांशिवाय ह्या जगात क्रूर काळोखच पसरल्यासारखे वाटू लागले आहे