"मैत्री की प्रेम - भाग 2"
"मैत्री की प्रेम - भाग 2"
आज शनिवार, पण प्रतीकशी काही भेट झाली नाही म्हणून मी प्रतीकला 'hi' असा मेसेज केला अगदी दोन मिनिटाच्या आत रिप्लाय आला, " 'हॅलो', अरे मी तुला मेसेज करणारच होतो ! खरं तर उद्या मी जरा फ्री असणार आहे संध्याकाळी; जर तुला ही वेळ असेल आणि तुझ्या घरच्यांना चालणार असेल तर लंच करूयात सोबत"
"अरे मला विचारायला लागेल, मी विचारून सांगते तुला. "
प्रतीक ची अशी ऑफर ऐकून मी तर चक्रावूनच गेले पण तसंही उद्या सगळेजण पूजेसाठी जाणार होते आणि मला जायला जमणार नाही असा सगळा विचार करून मी संदेशला म्हणजेच माझ्या मिस्टरांना याबद्दल विचारलं. त्यांनी लगेच म्हटलं, "अरे वा छानच की! तशीही उद्या तू एकटीच घरी आहेस तुलाही सोबत होईल, बोलवून घे कोण मित्र आहे त्याला."
अशात संदेशच एवढं चांगलं बोलणं ऐकण्याची ही माझी पहिलीच वेळ पण तरीही जरा बरं वाटलं. प्रतीक ला कॉल करून सांगितलं "बाहेर जाण्यापेक्षा घरी बाळ आहे तेंव्हा तूच घरी येशील का लंच साठी?" "व्हाय नॉट!" म्हणत तोही तयार झाला.
लंचसाठी आज काय काय बनवायचं याची तयारी करत असताना अचानक संदेश तिथे आला आणि म्हणाला, "काय आज येणारी स्वारी जरा विशेष दिसते चांगलीच तयारी चालली आहे!"
"अहो तो माझा शाळेतला मित्र आहे ना म्हणून बाकी काही नाही."
"फक्त मित्रच ना? " संदेशने मला टोमणा मारला मलाहि कळला होता पण तरीही मी शांत राहणे पसंत केले. तसं "गंमत ग!" म्हणून तो तिथून निघून गेला.
संदेश हा देखील माझा प्रियकरच...आमचं लव्ह मॅरेज झालेल मी त्याची प्रेयसी पण फक्त लग्नापूर्वीची,
"एकदा का प्रेयसीची बायको झाली की सगळं संपलं म्हणून समजा माणूस आपल्याला गृहीत धरायला लागतो. आपण गृहीतक बनण्याइतकं वाईट दुःख जगात दुसरं काही असूच शकत नाही,"
असो! सासुबाई, बाबा आणि संदेश तिघेही पूजेसाठी निघणार होते आणि आम्ही दोघेच घरी होतो.
रविवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास दरवाजाची बेल वाजली मी लगबगीने दार उघडले. समोर अक्षरशः प्रतिकला बघून मिठीच मारावी असं वाटलं पण स्वतःला आवरत त्याला आत बोलावले आणि त्याला पाणी दिलं. प्रतीक ने विचारलं, "अरे घरचे सगळे गेले का पूजेला?"
मी उत्तर दिल "हो!" "अच्छा बाकी; मिस्टर काय करतात मग तुझे?"
"अरे! ते शाळेवर शिक्षक आहेत."
"अरे वा मस्तच की! आमच्या चांगल्या गप्पा रंगल्या असत्या मग ते असते तर!"
"हो ना! पण पुजा ही महत्त्वाची होती ना.
बरं ते सोड... आधी आपण जेवण करूया आणि मग गप्पा"मीच विषय बदलण्याच्या हेतूने बोलले.
"हो! हे बाकी बर आहे तुझं. माझ्या मनात आणि पोटात काय गडबड आहे तुला लगेच कळतं?"
"हा मग मैत्रीन कुणाची आहे!" तसं तो चटकन लहानपणी बोलायचं तसं ओठांवर बोट ठेऊन बोलून गेला "कुणाची हे गड्या?" आणि मग आम्ही दोघेही हसलो.
जेवणाला सुरुवात करताना प्रतीकने हात जोडले आणि "ओम शांती शांती शांती..." म्हणत ताटाला नमस्कार केला आणि पहिला घास घेतला
"वाह पोळी आणि भाजी दोन्हीहि अगदी चमचमीत झाल्या आहेत, तुझ्या हाताला तर चांगलीच चव आहे राव! "
कितीतरी वर्षानंतर कुणीतरी माझं कौतुक करत होत ऐकून माझ्या डोळ्यांतील दोन थेंब अचानक घरंगळायला लागले.
मी ते पुसणार तेवढ्यात त्याने ते बघितलं आणि विचारलं," का गं काय झालं रडतेस का? "
"नाही, मी नाही रडत" मी तुला आज नाही ओळखत अनिका खरं खरं सांग काय झालंय ते? तुला माझी शप्पत आहे. "
"अरे! एवढा काही नाही खूप दिवसांनी कुणीतरी असं कौतुक केलं ना म्हणून छान वाटलं!"
"म्हणजे... संदेश तुझं कौतुक करत नाही का?" "तसं काही नाही रे! तू जेवन कर बर आधी... बरं काय वाढू तुला गुलाब जामुन घेतोस का?" "नको; आधी तू काय झालंय ते सांग?" "अरे मी तुझं जेवण झालं की सांगते, आधी तू जेवून घे."
"अरे गुलाब जामुन कसे झाले ते नाही सांगितलंस?" प्रतीक उत्तरला "मस्त झालेत! अगदी लहानपणी तुझी आई बनवायची तसेच." असं म्हणत प्रतीकने लवकरच जेवण संपवले.
जेवण झालं चहा की कॉफी असं विचारल्यावर त्याच्या नेहमीच्या शायरी अंदाजात तो बोलला
"कॉफी तो बेवफा हैं वह मुंह बंद करवाती हैं,
हम तो आशिक हैं चाय के जो दिल खुलवाती हैं..."
त्याच्या बोलण्यातला ओघ समजून घेऊन मी किचनमध्ये गेले आणि मस्तपैकी आलं घातलेला चहा बनवायला घेतला....
तयार झालेल्या चहाचा ट्रे टीपॉयवर ठेवत प्रतीकला चहा घेण्यासाठी इशारा केला आणि सोफ्यावर बसले.
"बाकी सगळे सोड आधी नेमकं काय झाले ते सांग?"
"अरे हो सांगते एवढी काही विशेष नाही आधी चहा संपवू मग बोलू?" खरं तर विषय कसा सुरु करावा या विचारात मी होते. प्रतीकला मी का सांगाव हे ही वाटत होतं पण कुणासमोर तरी मोकळ व्हायला हवं म्हणून न राहून मी बोलायला सुरुवात केली...
"संदेश आणि मी एका कॉलेजमध्ये भेटलो तो खूपच भारी स्टाइलिश आणि मदमस्त राहायचा आणि त्याचं बोलणं अगदी गोड, मनमिळावू स्वभाव अगदी कोणीही प्रेमात पडाव असा...माझ्याच काही मैत्रिणींमध्ये आणि माझ्यात अक्षरशा त्याने बघावं म्हणून चुरस लागायची आणि मग त्याची हळूवार नजर माझ्यावर पडली की मी घायाळ व्हायची. असंच दीड वर्ष सगळं मस्त चालू असताना आम्ही लग्न करायचं ठरवलं. माझ्या घरचे तर तुला माहिती आहे त्यांनी या लग्नाला नकार दिला; तरीहि मी सगळ्यांना सोडून संदेश सोबत निघून आले आणि आता वाटतं तीच माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक झाली. "लाटांचा वेग वाढत चालला की त्यांना सावरणारा एक किनारा लागतोचतसं आपल्याला सावरणारं कोणीतरी असायला हवं होतं"
परंतु मी तर सर्वच सोडून आले त्यामुळे मला कुठलाही आधार नव्हता. दीड वर्षे इकडे आल्यावर सगळं सुरळीत चालू होतं संदेश शाळेवर जायचा, माझीही खूप काळजी घ्यायचा, शिवाय माझा जॉब हि मस्त चालू होता...
दीड वर्षानंतर मात्र सासुबाई इकडे आल्या आणि मग हळूहळू सगळं संपायला लागलं त्या माझ्यावर नको नको ते आरोप करायला लागल्या, मी काही भाजीपाला आणायला जरी बाहेर पडले तरी त्या भाजीवाल्या सोबत तासनतास बोलत उभी राहिली असं काही सांगून संदेश च्या मनात माझ्या बद्दल काही नको नको ते भरवलं तोही मला आईंच्याच चष्म्यातून बघायला लागला. असंच एक दिवस आपली मैत्रीण मयुरीला बोलले काय होतंय ते सांगितलं तिने मलाच समाजावल अरे एक बाळ घरात आलं ना की सगळं व्यवस्थित होईल. असलेली नोकरी सोडून बाळा बद्दल विचार करायला सुरुवात केली, कसतरी घरच्यांना तयार करून मी माझी मनाची तयारी केली आणि लग्नानंतर तिसऱ्या वर्षात घरी एक छोटा पाहुणा आला.आमच्या दोघांच्या नावावरून त्याचं नाव अनिश ठेवण्यात आलं. घरात सगळे आनंदी बघून मला तर खूप छान वाटत होतं, वर्षभर सगळं एकदम छान चाललं सासुबाई पण खूष वाटत होत्या अनिशला सांभाळण्यातच गुंग असायच्या. खरंतर डॉक्टरांनी आमच खूप छान समुपदेशन केलं होतं तेव्हापासून सासुबाईमध्ये बराच बदल झाला होता. मला तर सगळेच एकदम नवीन आणि आनंदी वाटत होत पण जसं मर्फी म्हणतो, "सर्व काही सुरळीत चालू असताना काही तरी विपरीत घडण्याची तयारी सुरू असते."
माझ्यासोबत अगदी तसंच झालं. अचानक संदेश घरात चिडचिड करायला लागला अणिश थोडा मोठा झाल्यापासून माझ्या जवळ मन मोकळ बोलत सुद्धा नाही नी माझ्या जवळ पण येतं नाही. तुला विश्वास बसणार नाही पण मागच्या दोन वर्षांपासून त्यांनी मला कधी मिठी मारलेली सुद्धा मला आठवत नाही. काही महिन्याअगोदर त्यांच्या एका मित्रांकडून मला कळलं की इयत्ता 12 वी मध्ये शिकणार्या एका मुलीसोबत सध्या तर हे खूपच क्लोज आहेत. माझा संदेशवर तसा पूर्ण विश्वास आहे पण सध्या घरातले वातावरण बघता मला संशय आला मी त्यांच्या मोबाईल मधील मॅसेजेस त्यांना समजू देता वाचायला लागले आणि मग ज्याची भीती होती तेच झालं. अचानक मोबाईल मध्ये प्रमोद नावाचे कुणाचातरी व्हाट्सअप मेसेज आला "Miss You" ते वाचल्यावर मी पूर्ण चॅट ओपन केली तर त्यात अजून बरंच काही भेटलं ते बघत होते तेवढ्यात संदेश आला "माझ्या मोबाईल ला हात का लावला? म्हणून मोठ्याने ओरडायला लागला" मी त्याला कारण सांगितलं पण तो ऐकायला तयार नव्हता शेवटी मीच माघार घेतली आणि नंतर बोलू असं ठरवलं.
अनिका संदेशला बोलू शकेल का? नेमका प्रतीक यात तिची काही मदत करेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया पुढील भागात - "मैत्री की प्रेम भाग 3 मध्ये"