मैत्री की प्रेम ? भाग 1
मैत्री की प्रेम ? भाग 1
आज कितीतरी वर्षानंतर प्रतीक ला भेटण्याची वेळ आली, छे भेटण्याची कसली! बघण्याचीच म्हणावी लागेल. पण सकाळी त्याने मला बघून न बघितल्यासारखं का केलं असेल? की मला बघितलंच नसेल असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात आले.
तो निघून गेल्यानंतरहि मी का कुणास ठाऊक त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कितीतरी वेळ बघत होते...
तेवढ्यात मनात आलं जीवनात जसा आला आणि गेला; अगदी आताही तसाच...
मला त्याला एकदा तरी बोलायचं होतं पण काय करणार तो त्याआधीच निघून गेला का कुणास ठाऊक त्या दिवशीपासून घड्याळीत सकाळी सात वाजले की माझी पावले लगेच डेअरीकडे वळायला लागायची. एक अनामिक ओढ असायची मागील आठ दिवसांपासून आज तरी तो भेटेल याच आशेने मी निघाली होती आणि घडले हि अगदी तसच!
मी डेअरीतून निघणार तेवढ्यात प्रतीक तिथे पोहोचला आणि त्याने मला आवाज दिला आणि म्हणाला अरे अनिका तू इकडे कुठे? तसं मला काही माहितीच नाही असं दाखवत मी बोलले "अरे! मी तर ईकडेच राहते मागच्या दहा वर्षांपासून..." "अरे हो विसरलोच मी! मीच आत्ता मागील महिन्यात इकडे शिफ्ट झालो."
"अच्छा! ये ना कधीतरी घरी."
"हो नक्की!" म्हणून तो निघाला सुद्धा!
मग न राहवून मीच त्याला आवाज तिला "प्रतिक अरे! नंबर तर दे तुझा तुला मी कॉन्टॅक्ट कसा करू?"
"अरे सॉरी हा मी विसरलोच घे 980000... आणि व्हाट्सअप वरती मेसेज टाक आ नक्की" असं म्हणुन तो निघुनहि गेला कदाचित खूप घाईत असावा तो... पण असो आता नंबर मिळाला होता आता हवं तेवढं बोलता येणार होत मलाच कळत नव्हत मला असं काय होतंय ते? आता एवढ्या वर्षांनी...मला 16 वर्षाचे मुल आहे हे मी विसरले तर नाही ना! एवढं काय? आपण पहिल्यांदाच एवढ्या वर्षांनी भेटलो मग थोडं बोलायला हरकत काय आहे?अशी कितीतरी विचारांनी थैमान मांडलं पण सगळ्यांना विचारांना नंबर मिळाला या सुखानी सहज घालवून टाकलं कित्येक कल्पना, नीती- अनीती नैतिकता आणि अनैतिकता सगळं काही विसरून मी लहानपणात विरून गेली शाळेतला तो दहावीच्या निरोप समारंभाचा दिवस होता सगळेजण अगदी आनंदात असले तरी उद्यापासून आपण सगळे एकमेकांना सोडून जाणार याचं दुःख नक्कीच होतं. मित्र-मैत्रिणी परत भेट देतील की नाही माहिती नाही! हीच भीती जाणवून मला कदाचित प्रतीकला परत बोलता येणार नाही म्हणून मी क्लास संपल्यावर रस्त्यावर थांबून त्याला विचारलं होतं.
"प्रतीक मला तुला बोलायच होतं."
"बोल ना! उम्म्म..... खरं तर.... उम्म्म..."
"अरे! स्पष्ट बोल, काही नोट्स वगैरे हव्यात का तुला? हवं असेल तर बोल ना कोणत्या विषयाबद्दल हवे ते?"
"प्रतीक एवढे प्रश्न विचारू नकोस ऐकून घे आधी माझं आधीच मी खूप तयारी करून बोलण्याचा प्रयत्न करतेय त्यात तुझे प्रश्न..."
"अच्छा! बोल काय म्हणतेस? "
"मला ना तू खूप आवडतोस म्हणजे माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तांदूळ निवडताना पन मी तुझं नाव लिहून कित्येकदा मिटवल आहे, माझ्या वहिच्या शेवटच्या पानावरही माझ नाव मी "अनिका प्रतीक पाटील" असं लिहिलं आहे. माझं ठीक पण तू सांग ना तुला काय वाटतं ते?"
मी बोलून मोकळे झाले त्यावर तो शांत हसला आणि म्हणाला माझं तुझ्यावर नी साऱ्या वर्गावर, या प्राणिमात्रांवर खूप प्रेम आहे, त्या देवाने सृष्टी इतकी सुंदर बनवली की त्यात एखादी गोष्ट आवडत नाही असं होऊच शकत नही. एखादी गोष्ट आवडनं काही वाईट नाही पण हो 'ती गोष्ट फक्त माझीच आहे' हा अट्टाहास आजकालच्या प्रेमात दिसतो त्यामुळे मी तुझ्या प्रेमाचा आज स्वीकार नाही करू शकत. कारण आज आपलं वय नाही पण नंतर आपण याचा नक्की विचार करू... "
नेमकं हो म्हणाला की नाही? मुळी हे मला कळलच नाही तरी विचार करू म्हणजेच 'हो'च असेल नाहीतर स्पष्ट 'नाही' म्हणाला असताहाच विचार करून मी तिथून निघाले.
आज एस एस सी बोर्डाचा शेवटचा पेपर संपला. पेपर संपल्यावर अचानक प्रतीक समोर आला आणि म्हणाला "चल आपण बंटीच्या टपरीवर चहा घेऊया"
बंटी - आमच्यासोबतचाच म्हणावा लागेल चौथीच्या वर्गात असताना आई वडील एक्सीडेंट मध्ये गेले आणि मग शाळा सोडून अशी अचानक टपरी सांभाळण्याची वेळ त्याच्यावर आली.पण चहा बनवण्यात त्याचा हात कुणीच धरू शकत नव्हतं म्हणूनच तर सकाळी आणि संध्याकाळी स्पेशल चहा साठी त्याच्याकडे झुंबड पडलेली असायची.
प्रतीक ची ती ऑफर ऐकून मी मनातून भयानक खुश होते. आम्ही दोघेही टेबलावर बसलो. बंटीला दोन स्पेशल सांगून प्रतीक माझ्या शेजारीच बसला आणि बोलायला लागला, "तू खूप सुंदर आणि हुशार मुलगी आहे. एक्झाम होती म्हणून मी त्या दिवशी तुला बोललो नाही पण खरं तर मलाही तू तेवढीच आवडतेस पण तुझी न माझी जात वेगळी आणि आमच्या घरची मंडळी जरा कर्मठ ब्राह्मनी त्यामुळे पुढे या नात्याला काही अर्थ उरणार नाही उगाचच प्रेम बंधनात अडकून सुकणार फुल बनण्यापेक्षा मैत्रीच्या नात्यात जर आपण याला आणखी फुलवलं तर चांगलं नाही का?"
हे ऐकून खरं तर मला खूप राग आला होता पण काय करणार? त्याच्या त्याच समजूतदारपणा वर तर मी मोहित झाले होते. आता आमच्या दोघांचाही हातात चहाचे कप आले एकदम स्वादिष्ट असणारा चहासुद्धा आज मला कडवट लागत होता. चहा च्या वाफामध्ये माझ्या जळणाऱ्या प्रेम भावनांच्या धुसर वाफा मला दिसत होत्या, तरीही त्याला काही समजून न देता मी मैत्रीला हो तर म्हटलं, पण आता याचं तोंडही पाहायचे नाही असं मनोमन ठरवलं होतं. मध्ये बरेच काही घडून गेल तरी त्याला मी कधी भेटले नाही आणि बोलली नाही.
आज मात्र अचानक सगळा भूतकाळ आत्ताच घडल्यासारखा समोरून गेला या सगळ्या विचारात घर कधी आलं कळलंच नाही.
घरात आले दूध तापायला ठेवलं आणि मोबाईल हातात घेऊन व्हाट्सअप वरती प्रतीकला 'हाय' असा मेसेज केला दोन तास झाले तरी रिप्लाय काही आला नाही...
मग माझा व्हाट्सऍप डीपी बघितल्यावर लक्षात आलं... "अरे! मी पन वेडीच हे! आता त्याला कसं कळणार की हा माझाच नंबर आहे म्हणून?"
म्हणूनच आज कितीतरी दिवसांनी जुनाच पण जरा चांगला वाटणारा फोटो डीपी म्हणून ठेवला.
"बघणार असेल कुणी तर डीपी बदलण्याला अर्थ आहे, नजरा वळणार नसतील तर स्टेटस हि व्यर्थ आहे..."
तेवढ्यात प्रतीक चा रिप्लाय आला " ओके अनिका वी विल मीट अगेन." वाचून मला जरा बरं वाटलं कारण अजूनही तो तसाच आहे पूर्वीसारखाच, इंग्लिशचा तर आधीपासूनच चाहता - लहानपणी शाळेत पण मस्त इंग्लिश बोलायचा. त्याने मला काही इंग्लिश मध्ये विचारलं की मी त्याला "अं" असं विचारायचे आणि मग तो सगळं शुद्ध मराठीत सांगणार. मग मी हसत हसत सांगणार "अभिमान आहे मला मराठी असण्याचा" आणि मग आम्ही दोघेही खूप हसायचो.
तो सोबत असला की मला कधीच काही कमी जाणवत नव्हती.
कधी कधी सगळं सुरळीत जीवनाला आपणच आपल्याच कर्मान अवघड करून घेतो आणि उगाचच माझ्यासोबतच का असं होतं म्हणून देवालाच शिव्या घालत बसतो.तेंव्हा थोडं थांबून स्वतःलाच विचारायला हवं याला जबाबदार मीच स्वतः तर नाही ना ?
नेमकं असं काय झालं असेल अनिका च्या आयुष्यात?की ती इतकी जास्त नकारात्मक विचारांमध्ये गुरफटली गेली या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी भेटुया "मैत्री की प्रेम ? भाग दोन" मध्ये...