निरोप...
निरोप...
परतीच्या वाटेवर मन नेहमीच वावटळी प्रमाणे त्याच त्याच वातावरणात घुटमळायला लागत, कळत नकळत पुन्हा पुन्हा त्याच आठवणीना कवटाळून बसत, फुलपाखरू बनुन नवनवीन फुलांवर बागडन्याऐवजी जुन्याच फुलावर गटांगळ्या खात राहतआणि मग वाटायला लागतं, "श्वास थांबण्यापेक्षा भावनांचा ओघ थांबला की कळतं खरं गुदमरने काय असतं तें?"
निरोप घेण खरंतर अत्यंत जिकिरीचं काम! निरोप!! मग तो व्यक्तीचा असो, वस्तुचा असो वा ठिकाणांचा! का कुणास ठाऊक! निरोप घेताना अचानक भावना डोळ्यांतून वहायला सुरुवात करतात आणि पूर येण्याऐवजी ऊर भरून आणतात, आपल्या ज्ञानेंद्रियांना देखील मागील घेतलेल्या सगळ्या ज्ञानाचं सिंहावलोकन व्हायला लागतं. नाकाला मातीचा गंध यायला सुरुवात होते, भावनांचा स्पर्श आठवतो, सहवासातील भावप्रसंग अचानक पणे डोळ्यांमध्ये तरळायला लागतात तर विरह संगीत कानात गुणगुणायला लागतं, एवढेच नाही तर कधीकधी तिखट गोड संवादाची चव जिभेवर घुटमळायला लागते.
तेंव्हा पुन्हा आपल्याच निर्णयाचा आपल्याला राग यायला लागतो निरोपाऐवजी जर इथेच थांबलो तर नाही चालणार का? असं वाटतं...
मन असो किंवा व्यक्ती आठवणींवर प्रेम आणि भविष्याची ओढ या कैचीत सापडला म्हणजे संभ्रम नक्कीच निर्माण होणार...
पण हाच विचार जर कृत्रिम उपग्रहाने केला असता तर आज त्याचा मुक्काम आकाशात नाही तर पृथ्वीवर राहिला असता, नाही का?