कविता तुला सांगायचं
कविता तुला सांगायचं
कवितेस सांगायचयं
हे कविते,..किती ग तू लहरी आहेस. येतेस ती कधी इतकी अचानक नि घाईघाईने की नुसती तारांबळ उडवतेस..
कधी किती मिनतवारी केली तरी अजिबात वळूनही बघत नाहीस ती नाहीसच.. तुझं येणं सुखावह असलं तरी काय हे ..केव्हाही? कधी घाईत असताना , कधी पोळ्या करताना , कधी रस्त्यांत, कधी ऑफीसला जाताना,कधी गाडीत तर कधी चक्क नहायला बसल्यावर येतेस ..?
पण सखे केव्हाही आलीस तरी तुझं नेहमी स्वागतच असतं ग मनापासून...तू आलीस की मन बहरून येतं प्रसन्न वाटतं..मनातल्या भावना अशा तुझ्यावर उधळल्या की हलकं हलकं पिसासारखं तरंगतं मन.. आणि वाट पाहूनही आली नाहीस की काय वाटतं ते सांगू?
पण गद्यात कशाला तुझ्याच रूपांत तुला सांगते..ऐक...
कविता जेव्हा सुचत नाही..
कितीतरी दिवस झाले
महिन्यामागून गेला महिना
कविता करणे नाही जमले
म्हणून लागे हुरहुर मना..
अंतर दोन कवितांमध्ये
किती असावे याला काही
मिनिटे,तास, दिवस,आठवडे,
महिने यांचे बंधन नाही..
जेव्हा काही मनास भिडते
तेव्हा त्याला येते स्फुर्ती
काव्यकल्पना बहरून येते
ओळीमागून ओळी स्फुरती..
कोवळ्या वयांत तल्लख मन
कविता तेव्हा सुचली निरंतर
आता कवितांमध्ये दोन
थोडेफार पडते अंतर...
कविता जेव्हा सुचत नाही
वाटते गेले आपले कवित्व
पुन्हा मन धरते उभारी
देणे हे तर दैवदत्त..
जेव्हा कविता सुचत नाही
तेव्हा मनास वाटते खंत
पुढची कविता जमेल कां?
भीती मनी होते जिवंत..
आत्तासुद्धा 'रटफ'ने
जुळवून कविता केली तेव्हा
मनांत काळजी घर करते
हिच्यानंतर पुढची केव्हा...!!