रुक्मिणी
रुक्मिणी
!!!रूख्मिणी भाग-३!!!
सुदेशकाकांनी दिलेल्या अभिवचनिने रुख्मिणीला धीर आला.जणूं त्यांच्या मुखातून नियतीच बोलली होती. स्वयंवराचा दिवस जसा जवळ येऊ लागला तसं सगळीकडे चैतन्यमय वातावरण निर्माण झाले.संपूर्ण कौंडण्यनगरी, राजवाडा सजू लागला. देशोदेशींच्या राजांकरितां नयनरम्य शिबिरे तयार करण्यात आली.रुख्मिणीला या सार्यात कांही गम्य नव्हते. तिचे सारे लक्ष श्रीकृष्ण आगमणाकडे लागले होते. तिला भेटायला मुद्दाम सुदामकाका श्रीकृष्ण आल्याचा निरोप घेऊन आले, हळूच म्हणाले,त्यांचे शिबिर नगरीच्या सीमे बाहेर दूर उभारले आहे. महाराज क्रथकौशिकांनी श्रीकृष्णाचा विधिवत राज्याभिषेक करुन आपले राज्य अर्पन करुन सिंहासनारुढ केले. त्यामुळे ते अभिषिक्त राजा नाही असे कोणी म्हणू शकणार नाही.ऐकून रुख्मीणीच्या नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले. तिला हा आनंद मातेच्या कुशीत शिरुन व्यक्त करायचा होता, पण स्वयंवरासाठी निकटचे आप्तांचे आगमन झाल्याने ती अतिथीसत्कारात व्यस्त होती. सगळं निरावल्यावर ती मातेच्या कुशीत शिरली.
प्रेमाने तिच्या पाठीवरुन हात फिरवित माता शुध्दमती म्हणाली, बाळे, श्रीकृष्णाचे पाय या भूमीस लागले हे आपले परम भाग्य. तुझ्या विरहाचा अंत करण्यास केवळ तुझ्यासाठी जरी आले असले तरी, तुझा मार्ग सोपा नाही. मार्गात अनेक संकटे,काटे पसरले आहेत.एखादी अप्रिय घटना घडली तरी हताश होऊ नकोस,धीर सोडू नकोस.अंती विजय तुझाच आहे.
श्रीकृष्णाच्या प्रथम पत्नीपदाचा मान तुझाच असेल, आमचे आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. आणि आनंदाच्या भरात कृष्णद्वेषी रुख्मीदादाचा विसर पडला. त्याची आठवण येताच मन आशंकित झाले.पण मनी ठाम निश्चय केला, कांहीही झाले या देहात प्राण असेपर्यत कायावाचा मनोभावे लढा देईन पण पती म्हणून कृष्णाशिवाय दुसर्या कुणालाच वरणार नाही, माळ घालणार नाही.जणूं तिच्या अंतरंगात आदीशक्ती संचारली आतां कोणत्याही संकटास सामना करण्यास रुख्मिणी सिध्द झाली.
तिच्या मनात विचार आला, कल्पांतापर्यत स्री ही, मग ती सामान्य कुळातील असो वा राजकुळातील असो, सदैव ती बंधनांच्या श्रुंखलेतच जखडलेली असते. बालपणापासून ते यौवनापर्यंत पिता, बंधु, नंतर पती व वृध्दत्वात पुत्र यांच्या अधिनच राहावे लागते. स्वातंत्र तिला कधीच नाही.अशाच विचारात ती मातेच्या शेजारी निद्राधीन झाली.
नेहमी प्रमाणेच तिला स्वप्नात गूढ, मधूर स्मीत मुखावर ठेवून श्रीकृष्ण अगदी तिच्या जवळ येऊन म्हणाले, बघ मी तुझ्यासाठी आलोय! जन्मोजन्मी भेटतो आहोच. या जन्मी तुंच माझी पट्टराणी होशील, पण अजून योग आला नाही. धीर सोडु नकोस.तुला मी वचन देतो. तूं माझा प्राण आहेस.आपला विवाह होणार हे नक्की, फक्त योग्य घडीची वाट पहा. कांही दिवसच! कोणाचे कितीही कटकारस्थान असले तरी ते हाणून पाडण्यास हा यादवकुळातील गवळ्याचा पोर सामना, संघर्ष करण्यास समर्थ आहे. येतो मी.आणि ते निघून गेले. रुख्मिणी दचकुन जागी झाली. कोवळे सूर्यकिरण गवाक्षातून येत होते. म्हणजे ते स्वप्न पहाटेचे होते तर? पहाटेची स्वप्ने खरी होतात ना?
म्हणजे श्रीकृष्णाच्या म्हणण्यानुसार स्वयंवर स्थगित झाले की काय? विचारायचे कुणाला? प्रिय सखी शिलवतीला नक्कीच माहित असेल. तिच्या उठण्याची वाट पाहत ती आधीच आलेली होती. ती उठल्याबरोबर चिंताग्रस्त चेहर्याने आंत आली. सखे, कांही विपरित घडले का? कां तुझे मुख असे चिंताग्रस्त? आधी तू सांग, तुझा चेहरा एवढा अलौकिक तेजाने झळकतोय? मग रुख्मिणीने तिला पहाटेचे स्वप्न सांगीतल्यावर, शिलवतीने तिला घट्ट मिठी मारली. डोळ्यातून अश्रूंचा पूर लोटला. भाववेगाने तीने मिठी सोडून तिचे पदस्पर्श करण्यासाठी खाली वाकली, तोच तिला वरचेवर उचलतच म्हणाली, अगऽ वेडी की काय? सखीला कुणी वाकून नमस्कार करतं का? रुख्मीणीऽऽ रुख्मिणीऽ खरं सांग तूं कोण आहेस? आदीमाया, आदीशक्ती की, साक्षात लक्ष्मी? आणि श्रीकृष्ण कोण आहे? साक्षात नारायण? सांग... सांगऽऽ ना गऽ!
रुख्मिणी तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, अशी वेड्यासारखी विचित्र काय बोलतेस? अंत नको बघू. काय घडले ते लवकर सांग. ती म्हणाली, श्रीकृष्णाने तुला आधीच सांगीतले आहे, आतां मी वेगळे तुला काय सांगणार?श्रीकृष्णा च्या पराभवाला भिऊन, या बलाढ्य राजांनी स्वयंवरातून माघार घेऊन सारे राजे आपलं वैभवी प्रदर्शन गुंडाळून निघून गेलेत. रात्रीतून शिबिर परिसर सुना झाला.त्या थोर योगेश्वराने क्रथकौशिकांनी दिलेलं राज्यपद त्यांचे त्यांना अर्पण करुन स्वतःच्या राज्याकडे प्रस्थान केले. तिचा नुकताच श्रीकृष्णाने निरोप घेतला व गेले. नकळत डोळ्यात अश्रू आले. विरहाचे की आनंदाचे? कळत नव्हते.मन मात्र शांत, निवांत, प्रसन्न झाले.
क्रमशः