रुक्मिणी
रुक्मिणी
!!!रूख्मिणी!!!
!!!प्रस्तावना!!!
नमस्कार!!
रुख्मिणी नीट समजण्यासाठी मी अनेक संदर्भग्रंथांचा अभ्यास केला. हे वाचन करीत असतांनाच योगेश्वर श्रीकृष्णाच्या जीवनातील अनेक घटनांमधून मानवता, समता, बंधुत्ल, अजोड बुध्दीमत्ता, निर्णायक क्षमता, संतुलीत वागणे अशा अनेक गुणांचा परीचय झाला, तो कोणतीही अंधश्रध्दा, चमत्कार वगैरे विचार मनांत न बाळगता! चरित्र लेखन अचुक होण्याच्या दृष्टीने मी "कृष्णायण", " युगंधर", "कौंतेय", "रुख्मिणि स्वयंवर", "रुख्मिणी हरण, "व्यासपर्व", "व्यासविचार" अशी कांही पूर्वी व कांही आतां ही वाचून "रुख्मीणी" लिहायला घेतली.
श्रीकृष्णाप्रमाणेच मला रुख्मिणीच्या व्यक्तिमत्वाचे आगळेवेगळे पैलू दिसून आले. तिचे अनुपम सौंदर्य, बालपणा पासूनच श्रीकृष्णाविषयीचे गाढ प्रेम, प्रखर निष्ठा, अतूट विश्वास, तीव्र बुध्दीमत्ता, योग्य निर्णारकशक्ती, कर्तव्यनिष्ठा, व्यापकता, कौशल्य, प्रेमधाग्यात लहान थोरांना एकत्र बांधून ठेवण्याची क्षमता या तिच्पा अगनित गुणांनी व लोभस व्यक्तिमत्वाने ती केवळ द्वारकाधीशाची जेष्ठ पत्नी नाही तर, द्वारकेचे महाराणीपद आपल्या स्वकर्तृत्वाने प्राप्त केले.
श्रीकृष्णावरचे अनेक साहित्य उपलब्ध असले तरी, रुख्मीणीवर फारसे लेखन आढळत नाही. रुख्मिणीने पत्र पाठवून आपले हरण करण्यास कळविले हे सर्वश्रृत आहे. दीर्घ काळ श्रीकृष्ण द्वारकेबाहेर असतांना, द्वारकेचा राज्यकारभार खंबीरपणे हाताळणारी,उत्तम निर्णय क्षमता असणारी राज्यकर्ती होती. अन्य सात राण्यांवर पट्टराणीपदाचा वचक ठेवूनही त्यांचेशी स्नेहाचे संबंध टिकवून ठेवून, राणीवशातील वातावरण शांत व स्थीर ठेवण्याचे अवघड कर्तव्य तिने समर्थपणे पार पाडले होते.
ज्या ज्या वेळी श्रीकृष्ण दुष्ट संहारणार्थ किंवा अन्य कारणाने द्वारकेबाहेर गेले त्यावेळी संपूर्ण द्वारका साम्राज्याची धूरा समर्थपणे व चतुराईने पेलली होती. राज्याची सुरक्षा व्यवस्था डोळ्यात तेल घालून जपली होती. प्रत्येक जेष्ठ व्यक्ती चा योग्य मान राखला. ऋषीमुनींची अत्यंत नम्रतेने सेवा केली. समवयस्कारांशी मैत्रीपूर्ण व लहानांवर अपार माया केली. अनेक आघाड्यांवर मानसिक संघर्ष सहन करुनही ती सदैव श्रीकृष्णाच्या पाठीशी समर्थपणे उभी राहिली. नेहमी द्वारका सम्राज्याच्या कल्याणाच्या हिताचाच विचार अहोरात्र बाळगला.
द्वारकेची भूमी, गर्जना करणारा सागर आणि द्वारकावासी यांना सोडून ती दुसरीकडे जास्तवेळ राहूच शकली नाही. या सर्व अभ्यासातून एक गोष्ट अगदी प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे, महाभारतातील रुख्मिणी ही व्यक्तिरेखा पूर्ण वास्तववादी असून, तिचा जन्म,
जीवनातील घटना ह्या संपूर्ण वास्तवांशी संबंधीत आहेत. महाराणी द्रोपदी किंवा राजमाता कुंती यांचे जीवनाला अनेक प्रसंग मंत्रतंत्र, चमत्काराचे वलय आहे तसे रुख्मिणीचे नाही.
तिचे प्रथम अपत्याचे अपहरण पांचव्याच दिवशी झाले, पण, तो जिथे आहे तिथे सुखरुप असून व योग्यवेळी तो परत येईल ह्या श्रीकृष्णाच्या आश्वासनावर, तिने पहाडाएवढे दुःख धीराने पचवले. श्रीकृष्णाने एक दोन नाही तर चक्क सात बायका तिच्या प्रेमात हिस्सेदार केल्यात पण तिने कधीही असूया दाखवली नाही, उलट त्यांच्याशी पट्टराणीचा आब राखून सलोख्याने वागली.
अशा या वास्तववादी, सामर्थ्यशाली, मनस्विनी, अनभिषिक्त महाराणी रुख्मिणीचे प्रलयकारी, मनाला भिडणारे स्पर्श करणार्या व्यक्तिमत्वाला कोटीकोटी नमन.
क्रमशः