काळूची इमानदारी
काळूची इमानदारी


काळू हे नाव आपण शक्यतो माणसाचे ठेवतो; पण हे नाव आहे एका माणसाळलेल्या इमानदार कुत्र्याचे.
नावाप्रमाणेच तो काळ्या रंगाचा आहे; पण त्याचे जगणे स्वाभिमानाने जगण्याचे, इमानदारीने वागण्याचे. काळू हे एक छोटेसे पिल्लू होते. एका व्यक्तीने त्याला लहानपणी शाळेच्या हॉटेल कामगाराच्या ताब्यात दिले.
लहानपणी त्याची आई त्याला सोडून गेली होती. तो आईच्या प्रेमासाठी आसुसलेला होता. पण ते त्याच्या नशिबात नव्हते. कामगाराने त्या पिलाला आपल्याजवळ ठेवून त्याला दररोज वीस रूपयाचे दूध विकत आणून पाजत असे. काळू त्या जितू नावाच्या कामगाराशिवाय कुणाकडेही राहत नसे. तो जितूजवळच रात्रीच्या वेळी झोपायचा. त्यामुळे दोघेही जिवलग मित्र झाले होते. सकाळी उठल्यावर जितू सोबत काळूचाही नाश्ता व्हायचा. दुपारी दूध, चपाती मिळत असे. संध्याकाळी चपाती, डाळ, भात मिळत असे. आठवड्यातून दोन तीन दिवस मटण, मासे, अंडी खायला मिळत असे. बराचसा पगार काळूच्या देखभालीसाठी जात असे.
आता काळू मोठा झाला होता. जितूला घरातील एक जिव्हाळा असणारा काळू वाटू लागला. त्याच्याशिवाय जगणे त्याला अधूरे वाटू लागले. मोठा झाल्यावर काळू जितूबरोबर फिरू लागला. रात्री मात्र तो जितूच्या पायरीवर झोपत असत. त्याच्या भरवशावर संपूर्ण कुटुंब बिनधास्त झोपत असे. गल्लीत अनोळखी व्यक्तीला प्रवेश
नसायचा. चुकून कोणी आल्यास त्याला तो जखमी करायचा. त्यामुळे सराईत चोरांना त्याची दहशत होती.
जितूच्या घरी कधीच चोरी झाली नाही. गल्लीत सगळे ओळखीचे झाले होते. त्यांच्यावर तो भुंकायचा. पण काळू म्हणून ओळखीच्या माणसाने ओरडल्यावर त्याला वाईट वाटायचे. तो लगेच आपली शेपटी हलवून माफी मागायचा. गल्लीतील सर्वांचा तो लाडका झाला होता.
त्यामुळे गल्लीतही कधी चोरी झाली नाही. मालकाच्या घराजवळ कडक बंदोबस्त करण्याचे काम काळू करायचा. कोणताही फेरीवाला दिवसा गल्लीत येत नसे.
अचानक एक दिवस काळू दिसेनासा झाला. सर्व गल्लीतील लोक शोकाकूल झाले होते. दुःखाश्रू वाहत होते. जितू आजारी पडला होता. शोध घेऊनही काळू दिसत नव्हता. दोन दिवस गेले, तीन दिवस गेले तरी काळू घरी परत आला नाही. जितू वेड्यागत प्रत्येकाला विचारत होता. पण शेवटी अपयश वाट्याला आले. काळूचा चोरांनी काटा काढला. त्याला दूर नेऊन ठार मारले. काळू डोळ्यासमोर दिसल्याचा भास जितूला होऊ लागला. जितू सतत रडत होता. पण काय उपयोग ? काळूचे आयुष्यच तेवढे म्हणायचे!