जुळून येती रेशीमगाठी
जुळून येती रेशीमगाठी
मग त्या एका जन्मापुरत्या असतील अथवा अनंत जन्माच्या. रेशमासारख्या मृदू,मऊ धाग्याच्या. आणि नित नव्या तेजाने चमकणाऱ्या. आणि जिथे अद्वैताच्या रेशीमगाठी जुळून येतात, तो अलौकिक सोहळा ,त्याचा आनंद काय वर्णावा?
ती सुकुमारी ,कोमल ,सौंदर्यवती जनक कन्या सीता. जिच्या अनुपम सौंदर्या पुढे साक्षात दशरथपुत्र , इक्ष्वाकु घराण्याचे वंशज प्रभू श्री रामचंद्र मोहित झालेले. ही अनुपम सौंदर्यवती कोणाला अर्पण करायची ?असा प्रश्न जेव्हा राजा जनकापुढे पडला, तेव्हा अवजड असे शिवधनुष्य पेलून स्वयंवराचा पण जिंकणाऱ्यांनाच ही माझी पुत्री वरमाला अर्पण करेल असे स्वयंवर ठरवले. हा शिवधनुष्यचा टणत्कार कोण घडवून आणेल, याची चिंता सर्वांनाच होती.मोठ-मोठ्या घराण्याच्या पराक्रमी, शूरवीर राजांना निमंत्रणे धाडली गेली. तेव्हा कुलगुरू वसिष्ठांनी ही या अद्वैताच्या मिलनासाठी, या स्वयंवराला ,साक्षात श्री विष्णूचा अवतार ,श्रीरामचंद्रांना नेण्याचे ठरवले. तेव्हा गुरुकुल मध्ये सर्वांचे शिक्षण चालू होते. प्रत्येक अस्त्रविद्या, शस्त्रविद्या यामध्ये निपूण, मितभाषी ,सौंदर्यात मदनाचा अवतार आणि सर्व गुणांनी युक्त श्रीराम नक्कीच स्वयंवराचा पण जिंकणार याची खात्री कुलगुरूंना होती. अवघ्या सोळाव्या वर्षी, त्राटिका नावाच्या राक्षसीचा चा वध करून ती नगरी भय रहित केली. यामुळे तर ते अलौकिक तेज अजूनच बहरले होते.गुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानून श्री रामचंद्र लक्ष्मण सहीत जनकपुरीत पोहोचले. जिकडे तिकडे या राजबिंड्या , शरचापधारी तरुणांची चर्चा रंगली. आणि ही चर्चा सखीं कडून जनककन्या सीतेपर्यंतही पोहोचली. तो चालण्यातला रुबाब ,साक्षात मदनाचे सौंदर्य ,रंगवून-रंगवून सखी सीतेला सांगू लागल्या. आणि सीतेची हृदयाची तार छेडली गेली. तिलाही त्या राजबिंड्या तरूणाचे दर्शन घेण्याची अनावर ओढ लागली. तो अंतर्मनाचा संकेत, एक वेगळीच चाहूल देत होता. एक अनामिक हुरहुर लावत होता. मनाची ही अवस्था तिच्याही कल्पनेपलीकडची होती.
पुष्प वाटिका, जेथे अनेक रंगांच्या, अनेक प्रकारची सुमने ,लतावेली बहरल्या होत्या. ती पुष्करणी अनेक फुलांनी , सुवासिक सुगंधाने फुलून गेली होती. सर्व फुले ही जणूकाही अधीर झाली होती कधी ते श्रीरामचंद्रांचे पवित्र कर आपल्याला स्पर्श करतील आणि आपला ही हा क्षणभंगुर जन्म सार्थकी लागेल म्हणून अगदी तरारून उमलली होती आणि स्वतःचे सौंदर्य वाढवीत होती. जणूकाही आपसात स्पर्धा करत होती. प्रत्येक फूल सुखाच्या वर्षावात न्हाऊन निघाले होते. फुलांच्या रुपात घेतलेला जन्म सार्थकी लागणार होता.
नित्य नियमाप्रमाणे कुलदेवीच्या दर्शनासाठी जनक कन्या सीता सखीं सहित निघाली. तिचा शृंगार साक्षात डोळ्यांचे पारणे फेडणारा असाच होता. त्या राजबिंड्या राजकन्येचे सौंदर्य म्हणजे तो शुभ्रधवल रंग अनामिक तेजाने झळकणारा, हातातील कंकणांची नाजुक किणकिण, कपाळावर बिंदी, नाकात नथ, गळ्यामध्ये हिरे ,माणके ,पाचू यांचे अलंकार ,कोमल हास्य करताना, शुभ्र दंत कळ्या दिसणाऱ्या, नादमधुर करणारी पैंजणे, त्याला साजेसा पेहराव, आज तिला स्वतःलाही एक अनामिक ओढ लावणारा होता. मधुर गुंजारव करत सर्वजणी पुष्प वाटिकेत पोहोचल्या. तिकडे कुलगुरूंच्या पूजेसाठी म्हणून आज्ञा घेऊन प्रभू श्रीरामचंद्र ही पुष्करणीत पोहोचले. त्या प्रसन्न पुष्पवाटीकेच्या त्या सुगंधाने भारावून गेले. "कोणती फुले घ्यायची" याचा विचार करू लागले. अचानक हसण्या , खेळण्याचा आवाज आला. फुलं तोडता तोडता श्रीरामांनी मान वर करून पाहिले. आणि साक्षात रती आणि मदनाचा ही सौंदर्याचा आविष्कार फिका पडावा अशी पहिली नजरानजर झाली दोघांची. पुष्प वाटिका ही साक्षीदार होती त्या मंगल क्षणांची. तो पवन मंद स्मित करून हसत होता. मेदिनी ही कौतुकाने हा सोहळा साजरा करत होती. स्तब्ध झाले दोघेही. तो नजरेचा एक कटाक्ष , तो मदनबाण दोघांनाही घायाळ करत होता. जणू काही एकमेकांना डोळ्यात साठवून घेत होते. काही क्षणांसाठी दोघांचेही भान हरवले. ती नेत्रपल्लवी काही न बोलता बरच काही सांगून गेली. सखींनी सीतेला आणि लक्ष्मणाने श्रीरामांना हलवून जागे केले.आणि त्या जन्मा पुरतीच नव्हे तर अनंत जन्मांची, जन्मोजन्मीची रेशीमगाठ जुळून आली. त्याच अविरत वाहणाऱ्या तेजाने चमकण्यासाठी. अनादिकालापासून अनंताकडे वाटचाल करणारी. चिरंतन राहणारी.
आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे,
स्वयंवर झाले सीतेचे. !!
झुकले थोडे राम, जानकी घाली वरमाला,
गगनामाजी देव करांनी करिती करताला,
त्यांच्या कानी गजर पोचले मंगल वाद्यांचे. !!१
अंश विष्णुचा राम , धरेची दुहिता ती सीता,
गंधर्वाचे सूर लागले, जय गीता गाता,
आकाशाशी जडले नाते ऐसे धरणीचे. !!२
स्वयंवर झाले सीतेचे. !!