चारुलता राठी

Children

3  

चारुलता राठी

Children

हरवलेलं बालपण-शाळेतली गोड आठवण

हरवलेलं बालपण-शाळेतली गोड आठवण

2 mins
175


   गणेशदास राठी विद्यालय-अमरावती ...माझ्या शाळेचं नाव. आमच्या शाळेचा रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळ्या स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या.

प्रत्येकाला तसं अनिवार्यच केलं होतं. कारण त्यानिमित्ताने का होईना प्रत्येकातील सुप्त गुण प्रदर्शनास येतील. माझे बाबा सुद्धा हाडाचे शिक्षक होते. तशी मी खूप चुणचुणीत मुलगी होते. हजरजबाबीपणा ठरलेला, म्हणजे कुणीही प्रश्न विचारोत, माझं उत्तर तयार असायचं. (Confidence म्हणतात अश्यासारखं)

याचं गुणामुळे बहुदा माझं नाव वक्तृत्व स्पर्धेसाठी दिलं. त्यावेळी मी पाचव्या वर्गात शिकत होते. याआधी मी कधीही भाषण तयार केलेले नव्हते, आणि एवढ्या मोठ्या समुदायासमोर कधी बोलुनही दाखवलं नव्हतं. चार लोकांत मात्र मस्त बोलायची....माझा हाच आत्मविश्वास माझ्या बाबांनी, आणि आमचे वर्गशिक्षक श्री मेश्राम सर यांनी हेरला...आणि माझ्या चारचौघातल्या आत्मविश्वासाने आत्मविश्वासानं दांडग रुप धारण केलं. त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून मी लगेच होकारार्थी मान हलवली. आणि तयार झाले समोरच्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी.

मग काय झाली माझी तयारी सुरू. विषय ही खुप वेगळा..."सिनेमा पाहणे योग्य की अयोग्य" लहानसं आणि कोवळं वय ते...काय कळणार सिनेमाबद्दल.

पण माझे बाबा (माझे पाहिले गुरू) मला प्रत्येक मुद्दा छान समजावून सांगत होते. आरशासमोर उभी राहून रोज प्रॅक्टिस करायची. थोडक्यात सांगायचे तर

मीच माझी पाठ थोपटवायचे.

शेवटी तो दिवस उजाडला....आज माझं भाषण होतं. सकाळी 11 वाजता मी शाळेत पोहोचले....

शाळा तर नव्या नवरीसारखी सजलेली होती.

भव्य सभामंडप, त्याला रंगीबेरंगी झालर.

माझं नाव पुकारण्यात आलं, मी स्टेजवर गेले.....

समोर मोठा सभामंडप...निरनिराळे चेहरे...शिक्षक...मुलं-मुली...सगळेच मोठ्या उत्सुकतेने माझ्याकडे पहात होते....आणि मी त्यांना...

माझा परिचय झाला,मी बोलायला सुरुवात करावी अस सांगण्यात आलं.....

माझ्या काळजाचा ठोकाचं चुकला. समोरचं प्रचंड गर्दीने भरलेलं सभागृह, मला खाऊ की गिळू अश्या तऱ्हेने पहात होत. एवढी भयाण शांतता ..सुई पडली तरी आवाज होणार फ़क्त सात मिनिटांचा वेळ दिलेला. घड्याळाचा काटा पुढेपुढे सरकत होता ...त्या घड्याळाची टिकटिक मला प्रत्येक सेकंदाला जणू आठवण करून देत होती...बोल...चारू...बोल...काहीतरी...

पण माझे तोंड मात्र नुसतं उघड ते उघडचं, जीभ वळतच नव्हती, तोंडातून शब्दही फुटत नव्हता.. डिसेंबर महिन्याच्या कडाक्याच्या थंडीतही मला दरदरून घाम फुटला होता. हातपाय थरथर कापत होते. शेवटी मोठया हिमतीने नजर वर केली, माईक हातात धरला...समोर सभामंडपाच्या शेवटी बाबा उभे दिसले, त्यांनी हसून हात हलवला.

घरून निघतांना मी थोडे घाबरले होते म्हणून त्यांनी सांगितलेले शब्द आठवले"

 try...try.... never... cry...

आणि मी माझ्या भाषणाला सुरवात केली.

जेवढं आठवलं, सुचलं ते सारं बोलली.

वेळ संपली, आणि मी स्टेजवरून धावत जाऊन बाबांना बिलगली. पहिला नंबर जरी आला नाही तरी

बाबांच्या, चेहऱ्यावरच समाधान, हसू, आनंद, अभिमान मात्र ओसंडून वाहत होत.

त्यांची आणि गुरुजनांची शाबासकी हेच माझं पहिलवहिल बक्षीस होतं.

त्यानंतर अनेक व्यासपीठ उपलब्ध झाले.पण माझ्यातल्या सुप्त गुणांना ओळखून हक्काचं आणि पहिलं व्यासपीठ आणि भाषण म्हणजे शाळेतलंच हं...

तर मित्र- मैत्रिणींनो ही माझी माझ्या शाळेतल्या भाषणाची गोड आठवण. आजही आठवलं की हसायला येतं. खरंच किती निष्पाप असतं ना बालपण.....

फिरुनी एकदा यावे

परत ते दिवस...


Rate this content
Log in

Similar marathi story from Children