नैराश्य आणि त्यावर केलेली मात
नैराश्य आणि त्यावर केलेली मात


जीवन जंगल का रास्ता हैं
बाधायें आये भिन्न भिन्न
कही खुशबू खुली हवाओ मे
कही जली हवाये भिन्न भिन्न
काटो मे कभी उलझना हैं
उलझे तो खुद ही सुलझना हैं
जीवन का मंत्र यही है
बस चलना हैं
बस चलना है।....
कवि "लोकेश मृदुल" यांचं गाणं सुरू झालं... आणि सुरेखा काकू ओरडल्या..
काय रे रिदान,"किती हा आवाज"...आणि हे कसलं गाणं लावलं रे...अरे सकाळची वेळ मस्त भजन-बिजन लाव की...
गेली कित्येक दिवस बघतेय मी, तू रोज हेच गाणं लावून दिवसाची सुरुवात करतो. दिवसातून आठ-दहा वेळा तू हे गाणं वाजवतो....आणि तेही जोरजोरात... अरे भिंतीला सुद्धा कान असतात बाबा!
म्हणे...नैराश्यावर गाजलेलं गाणं आहे मृदुल सरांचं..
ऐक बाबा ऐक,"पण कानात तुझे ते बोळे? काय म्हणतात त्याला..ह...ह...हेडफोन ...ते लावून ऐक रे बाबा..
सुरेखाबाईंची आरतीची वेळ आणि रिदान ची गाण्याची वेळ एकच...
सुरेखाबाईं-काय करावं या पोरांचं...
एक हा रिदान गाणं वाजवून डोकं फ़िरवतोय आणि ती रिद्धी किती चुपचाप बसलेली असते...बिचारी पोर ..अजून काय नशिबात वाढून ठेवलंय तिच्या काय माहीत...
"देवा तिला लवकर बरं कर रे बाबा"...म्हणतच सुरेखाबाईंनी देवापुढे साखर ठेवली.
सुरेखाताई, त्यांचा मुलगा सुजित, सून समीरा, नातू रिदान आणि नात रिद्धी. एकंदरीत खूप सुखी आणि समाधानी कुटुंब. सर्व कसं सुरळीत चालू होतं. याच वर्षी रिद्धीचं बीएससी फायनल झालं. दिसायला देखणी तर होतीच ती, त्याचबरोबर सर्वगुणसंपन्न, शालीनतेची मूर्तीच जणू. अश्या वयात आलेल्या मुलींवर तश्या वरमंडळीच्या नजरा असतातच, आणि तसंही नात्यातल्या नात्यात जुळत असेल तर फारच छान. झालंही तसंच... नात्यातलंच एक स्थळ सांगून आलं. मुलगा सुशांत चांगला एज्युकेटेड सायंटिस्ट म्हणून उच्च पदावर अमेरिकेत कार्यरत होता. घरचेसुद्धा सधन. म्हणून नकार देण्यासारखं काही कारण नव्हतंच. सुशांत एका महिन्याच्या सुटीवर आला होता, त्यातच हे स्थळ बघितलं, दोघांची पसंती झाली...आणि "झट मंगनी पट शादी" या तत्वावर लवकर लग्नही झालं.
रिद्धी लग्न होऊन सासरी सुशांतच्या घरी गेली. नातेवाईक, पाहुणे, यात पंधरा दिवस कसे निघून गेले कळलंच नाही. रत्नागिरीला तिच्या मामेबहिणीकडे लग्न होत, म्हणून दोघेही निघाले. तसेही लग्नानंतर कुठे फिरायला गेलो नाही म्हणून दोन दिवस आधीच जाऊन कोकण फिरण्याची त्यांची इच्छा होती. पावसाळ्याची नुकतीच चाहूल लागली होती. वेळ वाचावा म्हणून दोघेही स्वतःच्या गाडीने निघाले. रत्नागिरीला ते पोहोचणारच एवढ्यात पावसाचा जोर वाढला...घाटाचा रस्ता ...समोर काळाकुट्ट अंधार....कोसळणारा पाऊस...विजांचा चमचमाट... एक वळण घेताना सुशांतचा गाडीवरील ताबा सुटला... आणि गाडी सरळ दरीत कोसळली.😢
एका क्षणात काय झालं... मदतीला कुणी नाही.. अंधारी रात्र त्यामुळे रहदारीपण नव्हती. त्यामुळे मदतीची अपेक्षा तरी कशी? पहाट झाली...रहदारी सुरू झाली...मदत मिळाली पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. सुशांतचा जागीच मृत्यू झाला होता...पण रिद्धी बेशुद्धावस्थेत होती. तिला उपचारासाठी नेण्यात आलं. फोन करून घरी कळवण्यात आलं. हाताची मेहंदीसुद्धा निघाली नव्हती आणि रिद्धीचं आयुष्यच पार बदलून गेलं. सोनपावलांनी आलेली सून म्हणून केलेलं कौतुक लगेच द्वेषभरल्या नजरेत बदललं. पांढऱ्या पायाची म्हणून घरातल्या म्हाताऱ्या कजबुजू लागल्या. आधीच रिद्धीवर इतकं मोठं आभाळ कोसळलेलं... आणि त्यात हे असं बोलणं ऐकून ती पूर्ण दोष स्वतःलाच देऊ लागली.
"खरंच मीच दोषी आहे, सुशांतच्या मृत्यूला"... फिरायला गेलोच नसतो तर कदाचित अशी वेळ आली नसती. खूप रडायची, ना जेवण ना झोप... तासनतास एकांतात बसून राहायची. हाडांचा तर नुसता सापळा झाला होता, चेहर पांढराफट्ट पडला होता. तिची ही अवस्था बघून तिचे आईबाबा तिला माहेरी घेऊन आले. कदाचित माहेरच्या वातावरणात तिला बरं वाटेल. आज सहा महिने झाले, सायक्याट्रिक्सकडे दाखवून झालं, औषधं सुरुच आहेत, पण आता तर रिद्धीचं मानसिक संतुलन अजूनच बिघडत चाललं होतं. वेदना, संवेदना जणू सर्व गोष्टींचा तिला विसरच पडला होता. तिच्या ठिकाणी कुणीही असतं तर अस घडू शकलं असतं... हे एक वास्तव आहे.
लग्नानंतरच्या भावी आयुष्याची स्वप्न न रंगताच क्षणात बेरंग झाली होती. तिचं एकांतात रडणं, झोपेतून उठून किंचाळणं हे वाढतच चाललंय. कुणी बोललं तरी फक्त चेहऱ्याकडे बघायची. फक्त सुशांतबद्दल बोलायची... माझा सुशांत कुठंय, तो बरा आहे ना... तो कधी येणार... आई, बाबा रिदान आजी खूप प्रयत्न करायच्या, तिला समजवायच्या. रिदान तिच्यापेक्षा वयाने बराच लहान पण ताईचे हे असे हाल बघून तो खूपच घाबरला होता. त्याला आपल्या बहिणीचे हाल बघवत नव्हते. त्याला आठवलं... मी मागच्या वर्षी दहावीत असताना किती घाबरलो होतो. बोर्डाची परीक्षा आणि त्यात हार्मोन्स चेंजेस... किती नर्व्हस झालो होतो. पण त्यावेळेस ताईने त्याला
"हम होंगे कामयाब....
हम होंगे कामयाब...एक दिन
मन मे हो विश्वास....
पुरा हो विश्वास...
हम होंगे कामयाब एक दिन.."
हे गाणं रोज ऐकवायची.
त्याचाच इतका सकारात्मक परिणाम झाला की तो चक्क जिल्ह्यातून पहिला आला.
त्यावेळेस त्याने ताईच्या मिठीत शिरून म्हटले, "खरंच गं ताई अशक्य असं काहीच नसतं." प्रयत्न केला की सगळं जमतं बघ...
ताईने त्यावेळी त्याला सावरलं...पण आता खरी वेळ होती रिदानची...आपल्या ताईला नैराश्यातून बाहेर काढण्याची. त्याच्यासाठी हे खूप कठीण होतं. पण प्रयत्न करणं गरजेचही होतंच, कारण डॉक्टरी उपाय सगळे संपले होते. तिला यातून बाहेर काढण्यासाठी सावरणं गरजेचं होतं.. रिदान रोज नैराश्यातून बाहेर पडण्याचे विविध व्हिडिओ लावायचा, गाणी लावायचा. गेल्या एक महिन्यापासून त्याचा हा प्रयोग सुरू होता. जेणेकरून चार वाक्य तरी रिद्धीच्या कानावर पडतील आणि तिच्यात काही बदल घडेल...
कधीकधी नैराश्यावर औषध काम नाही करत पण मनातल्या दबलेल्या भावना जर कुणाजवळ व्यक्त केल्या तर मन हलकं होतं. म्ह्णूनच मनाचा कोंडमारा केल्यापेक्षा बोला, रडा, व्यक्त व्हा...
आजसुद्धा त्याने
"जीवन जंगल का रास्ता हैं
बाधाये आये भिन्न भिन्न ..."
हे गाणं लावलं....
रिद्धी अचानक आपल्या रूममधून उठून आली तीसुद्धा गाणं म्हणू लागली. आई, बाबा, आजी, रिदान सगळे धावत आले. रिद्धीला असं गाणं म्हणताना बघून. रिदानने पटकन आपल्या ताईचे हात हातात घेतले, आई-बाबा, आजीसुद्धा त्या गाण्यात रममाण झाली... आणि सारे फेर धरून गोल गोल फिरून गाणं म्हणू लागले...
सगळ्यांच्या डोळ्यात आज आनंदाश्रू होते. का नाही येणार अश्रू... त्यांची लाडकी लेक कितीतरी दिवसांनंतर अशी हसत होती, गुणगुणत होती...
मित्र-मैत्रिणींनो जीवनात बरेचदा असे नैराश्याचे प्रसंग येतात... पण एक शिकायचं जीवन हे अनमोल आहे. त्याला आत्महत्येसारखा पर्याय निवडून संपवू नका. प्रत्येक गोष्टीला औषध असतं... बोला, व्यक्त व्हा... जवळच्या व्यक्तीला, मित्र-मैत्रिणीला सगळं सांगा... घडलेल्या गोष्टींचा बाऊ करत, त्यात स्वतःला दोषी न मानता ती एक नैसर्गिक घटना होती... असं स्वतःला सांगा. स्वतः स्वतःशी हितगुज करून मनाला निर्भय बनवा. नक्कीच नैराश्यातून बाहेर पडाल. 🙏