#अपेक्षित स्वातंत्र्य
#अपेक्षित स्वातंत्र्य
भारताला स्वातंत्र्य मिळून आता 73 वर्षे पूर्ण झालीत. आपण आता "अमृत महोत्सवाच्या" अगदी जवळ आहोत....
पण....
इंग्रजांच्या तावडीतून जरी आपली सुटका झाली असली तरी, त्यांच्या सवयी, त्यांची पाश्चात्य शैली आपण विसरलो नाहीतच, उलट जास्तच अंगिकारायला लागलो आपण...कारण ते एक उत्तम शिष्टाचार आहे...असं बिचाऱ्या भारतीय लोकांचं मत... असो... "शेवटी व्यक्ती तीतक्या प्रकृती"
खरच आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत का?
खरी स्वातंत्र्याची व्याख्या काय?
जिथे स्त्री-पुरुष समानता भेदभाव नाही,
सर्वांना समान शिक्षण संधी, स्त्री-भ्रूण हत्या,बालमजुरी असे कितीतरी प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. आजही समाजात एकटी स्त्री मुक्तपणे वावरू शकत नाही, वासनेने बरबटलेले श्वापद, आणि त्यांच्या भेसूर नजरा.... भयानक वास्तव आहे हे..
स्वातंत्र्य विषय वाचला...आणि आठवलं ते
"श्री ग. दि. माडगुळकर" यांचं गीत.
"हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
आ-चंद्र-सूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे
कर्तव्यदक्ष भूमी सीता-रघूत्तमाची
रामायने घडावी येथे पराक्रमाची"
किती सुंदर वर्णन केलंय कविराजांनी आपल्या भारत देशाचं, मन भरून येतं वाचतांना.
पण तरीही....
मनात कुठेतरी खंत आहेच..
आजही "सीता", "द्रौपदी" सुरक्षित आहेत का..
पुरुष प्रधान परंपरेतून त्यांची सुटका झालीय का..
अश्याच एका विषयावर माझी कथा आहे.
अग... शालू !
आज तुझं लक्ष कुठंय गं!
कधीपासून चहा ठेवलाय बघ...
नुसता गार झाला असेल.
दे आण इकडे, मी परत गरम करून देते.असं म्हणतच मोनिकाने तिचा चहाचा कप उचलला,आणि चहा परत गरम करायला ठेवला सुद्धा .
शालू....अग शालू....मी काय म्हणतेय?
लक्ष कुठंय ग तुझं आज?
केव्हाची मी बडबडतेय...तू मात्र काहीच बोलत नाहीस. आणि आज अनु, रेणू पण तुझ्या सोबत...आज शाळेत नाही जायचं का ग दोघींना...
डोळे पण बघ किती सूजलेत तुझे.....
हं....आलं लक्षात...
काल परत नवऱ्याच्या हातचा मार खाल्लास ना!
किती मार खातेस ग रोज-रोज..
मोनिका पोळ्या करता करता तिची भांडे धुणारी बाई शालू सोबत बोलत होती.
मोनिका- शालू, घे गं बाई चहा...आज अंमळ उशीरच झालाय बघ...आटोप लवकर लवकर...
शालू आतमध्ये येऊन बसली," बाई, लई तरास होतो बगा"!
काल परत नवऱ्यानं पूर्ण पैसे मागून घेतले...नाहीं म्हटलं तर खूप मारलं बघा...
मी मार खायला नाही भीत बाई. पण माया दोन पोरी लै भितात बापाले. लै रडतात. म्हणून आज सोबत आणलं दोघीले.
मोनिका जिल्हा परिषदेच्या शाळेत मुख्याध्यापिका होती. तिच्याच शाळेत शालूच्या दोन्ही मुली अनु आणि रेणू शिकत होत्या. खूपच चुणचुणीत आणि हुशार होत्या दोघीही. शाळेतली कुठलीही स्पर्धा असो... रांगोळी पासून ते वक्तृत्व स्पर्धेपर्यंत दोघींचा सहभाग हा ठरलेलाच.
पण आता कोरोनाच आगमन झालं, आणि सुरू असलेल्या शाळा बंद झाल्या. म्हणजेच अभ्यास सुरू आहे...पण सगळं कसं ऑनलाइन..आणि ऑनलाइन अभ्यास म्हटला की अँड्रॉईड मोबाईल आवश्यकच. तसा तर शालूजवळ मोबाइल होता पण साधा. मग त्यात कसा जमणार अभ्यास. पण शालून पै पै जमवून आपल्या मुलींसाठी मोबाईल घ्यावा म्हणून काही पैसे साठवून ठेवले होते. मुली पण खूप खुश होत्या, आता आपल्याला अभ्यास करायला मिळणार म्हणून.
पण.....
शालुच्या नवऱ्यानं सारं पाणी फेरलं बघा मुलींच्या स्वप्नांवर. आज तो घरी आला आणि दारुसाठी पैसे मागू लागला, शालूने नकार दिला....पण तो कुठे ऐकणार होता, त्याने मारझोड करून तिच्या कडून पैसे काढून घेतले..."
बिचारी अबला नारी काय करणार. पुरुषांच्या सामर्थ्यापुढे तीच काय टिकाव लागणार.
त्याला पोरींच्या शिक्षणाच कौतुक नव्हतंच. तो तर शालूच्या मागे लागला होता ," कशाला खर्च करतेस पोरींवर ...लग्न करून टाकू पोरीचं , खर्च वाचेल.
पण शालू मात्र ठाम होती. तिला आपल्या पोरींची लग्न कोवळ्या वयात करायची नव्हतीच. त्यांना चांगलं शिक्षण देऊन कर्तृत्ववान बनवायच होत. खूप स्वप्न होती तिची..
पण आज...,तिचं स्वप्नं धुळीला मिळालं होतं, खूप रडत होती ती.
मोनिका-शालू...!रडतेस काय?
मी आहे ना! मी देईन अनु आणि रेणुला मोबाईल घेऊन देईन.
पण....तुला असं नवऱ्याच्या हातचा मार खातांना खूप वाईट वाटत ग...
आणि तुझ्या मुली , त्यांच्याबद्दल तुला नुसती दया वाटते ....उद्या जर त्यांच्यावर अशीच वेळ आली तर काय करशील तु...
तू सहन करतेस , मुली तेच बघतायत....मग त्या पण सहन करतील... हो ना,
अग नवरा हात उचलतो, मारतो, दारू पितो तर त्याला विरोध कर, पोलिसात तक्रार कर.
एकदा जेलची हवा खाऊन येईल,पोलिसांच्या दंडुका खाईल तेव्हा कळेल त्याला बायको, मुलांवर अत्याचार करणं हा गुन्हा आहे.
अग स्वातंत्र्य मिळून कितीतरी वर्ष झालीत, पण अजूनही समाजात स्त्रियांना, मुलींना पूर्ण स्वातंत्र्य मिळालेलं नाही. वंशाला दिवा हवाच म्हणून "स्त्री-भ्रूण हत्या" केली जाते, जोपर्यंत मुलगा होत नाही तोपर्यंत मुलींची रांग, किंवा गर्भ लिंग परीक्षण करून जन्म घ्यायच्या आतच तिला संपवलं जात.
आणि जन्म देणारी आई....तीचा काय दोष...तिला तर मुलं जन्माला घालणारी मशिनच समजल्या जात, तिच्या आरोग्याचा का कुणीच विचार न करावा....
शालु-बाई , चुकले मी...
मी माझ्या पोरीसनी चांगलं शिक्षण देईन.
अन आता मी नवऱ्याचा अत्याचार बी सहन करणार नाही...सरळ पोलिसात जाईन मी...
अनु आणि रेणू मघापासून बाईंचं बोलणं ऐकत होत्या.
अनु म्हणाली, मॅडम मी डॉक्टर होणार.
रेणुही लगेच म्हणाली, मॅडम मी आय पी एस ऑफिसर बनून , समाजकार्य करीन, स्त्रीयांवरचे अत्याचार बंद करीन.
शालूने दोघींना कवेत घेतलं, हो ग पोरीनो, खुप शिका, मोठ्या व्हा....