चारुलता राठी

Inspirational

3.4  

चारुलता राठी

Inspirational

आईचं हृदय

आईचं हृदय

4 mins
322


   तो आजही अडखडत अडखडत घरात आला, आज रविवार सुट्टीचा दिवस म्हणून दोन्ही मुलं सुद्धा घरीच होती. तसं बाबांचं हे बदलतं रूप आताशा मुलांना परिचयाचं झालंच होतं. पण! आज मात्र दोघेही खूप घाबरलेली. आज परत त्यांचे बाबा दारू पिऊन आले होते, केस विस्कटलेले, शर्ट फाटलेला, आणि बहुदा दारूच्या नशेत एखाद्या गटाऱ्यातही पडलेले असावेत...खूप घाणेरडा वास येत होता. त्यात त्याची अखंड बडबड. दोन्ही मुलं घराच्या एका कोनाड्यात पाय दुमडून बसली होती. 

रविवारी सुटीचा दिवस तर पप्पांच्या आवडीचा ना!

मग! आज हे कस!


मुलांसाठी खाऊ, बायकोसाठी गजरा हे त्याचं नित्याचचं. पण! आता मात्र सार बदलत चाललेलं. दिवसेंदिवस हे 'वादळ' वाढतच चाललेलं. आज नाहीतर उद्या हे सारं संपेल आणि परत आपला संसार सुखाचा होईल ही वेडी आशा होती तिची. कितीतरी देवधर्म, पूजा-पाठ, औषधं सारं सारं केलं तिने. पण फायदा मात्र काहीच नाही. मोहन आणि मीरा एक आदर्श पती-पत्नी. गावाकडे चार एकर शेती होती. पिकवायचं आणि खायचं मस्त मजेत दिवस जात होते. पण आता मुलं सुनिता आणि सुबोध मोठी होत होती, गावात फक्त प्रायमरी पर्यंत शिक्षण होतं. मुलांच्या शिक्षणासाठी म्हणून गावातून शहरात जायचा त्यांनी निर्णय घेतला. पण त्यासाठी गावातील जमीन विकणं भाग होतं. जमिनीचा योग्य मोबदला मिळाला आणि चौघेही गावातून शहरात आले. आलेल्या पैशातून त्यांनी नागपूर सारख्या शहरात दोन खोल्यांचं स्वःताच घर घेतलं, मुलांची चांगल्या शाळेत नाव नोंदणी केली, उरलेल्या पैशातून एक तीन चाकी ऑटो घेऊन मोहनने आपलं काम सुरू केलं. मीनाने सुद्धा शिलाई मशीन खरेदी करून फावल्या वेळात शिलाईचे काम करून वरवरचा खर्च भागवू लागली. 


मुलांच्या चांगल्या शिक्षणासोबतच आता थोडा पैसा सुद्धा शिल्लक पडत होता. मोहनने आता ऑटो विकून एक टॅक्सी खरेदी केली. असं म्हणतात की सुख वाट्याला आलं की आपली स्वप्न वाढतात, आणि त्यातूनच कधी कधी दुःखही वाट्याला येतं. असच काहीसं मोहनच्या वाट्याला आलं. टॅक्सी घेतल्यानंतर मोहनचा संपर्क मोठमोठ्या लोकांशी येवू लागला, त्याची टॅक्सी बरेचदा मोठमोठया ट्रीपसाठी बुक होऊ लागली. मोहन स्वतःच ड्रायव्हर, मग काय! मोहन सुद्धा आता दूरवर जाऊ लागला. 


एकदा महाबळेश्वरला जायचं म्हणून कॉलेजमधल्या काही मुलांनी गाडी बुक केली. कॉलेजातली मुलं म्हटल्यावर खाणं-पिणं, पत्ते, जुगार, एन्जॉय सारं सारं आलंच. मोहनाला या गोष्टींची बिलकुल सवय नव्हती, तसं त्याला ते आवडत सुद्धा नव्हतं.आत्तापर्यंत कधीही दारूला स्पर्शसुद्धा न केलेल्या मोहनने मुलांनी खूप आग्रह केला म्हणून बळजबरीने त्याने थोडी दारू घेतली. नंतर पत्ते, जुगार अश्या वाईट संगतीचे मोहनला व्यसनच लागले. चांगले गुण घ्यायला माणसाला किती वेळ लागतो, पण वाईट गुणांना तो लवकरच आत्मसात करतो. 


आता वारंवार त्या मूलांना मोहनचीच गाडी लागायची. मोहनला सुद्धा आता या सर्वांची सवय लागलीच होती. मीनाला मात्र एक गोष्ट प्रकर्षाने जाणवायला लागली होती, प्रत्येक ट्रीपनंतर मोहन मीनाच्या हातात पैसे द्यायचा, पण आता त्याने पैसे देणे बंद केले होते, कारण विचारताच तो म्हणायचा, अग! आज गाडीचे टायर बदलले, तर कधी दुसरी कारण सांगून उडवाउडविची उत्तरे देऊन वेळ टाळून न्यायचा. छान मजेत चालणाऱ्या संसारात वारंवार खटके उडू लागले. पैशाची कमतरता भासू लागली, मोहनने बरीच उधारी करून ठेवली , कर्जाचा डोंगर वाढतच चालला होता. लोकं आता घरी पैसे मागायला येवू लागले. 


नुकतीच नवरात्र सुरू झाली होती. मीना चे कडक उपवास सुरू होते. देवी माँ अंबेवर तिची खूप खूप भक्ती. आज तर हद्दच झाली ! मोहन आज सुद्धा दारू पिऊन घरी आला, मुलं त्याला असं बघून खूप घाबरले. 

मोहन: मीना, मला पाच हजार रुपये हवेत? आत्ताच्या आत्ता....

मीना : अहो, इतके पैसे मी कुठून देऊ.

कालच मुलांच्या शाळेची फी भरली, घरातलं धान्य, किराणा संपलाय...त्यासाठी सुद्धा पैसे नाहीत हो... तरीसुद्धा तुम्ही दारूसाठी पैसे मागताय. थोडं मुलांकडे तरी बघा.

मोहन : ते मला काहीच माहिती नाही! मला फक्त पैसे हवेत....म्हणतच त्याने मीनाच्या गळ्यातील मंगळसूत्र खसssकन ओढलं. गडगडाटी हसतच तो हातात मंगळसूत्र नाचवत बाहेर निघाला. मीना हतबल होऊन उभी होती.

एवढयात !

आतापर्यंत मूकपणे सारं बघणारी सुनीता, सुबोध धावतच बाबांच्या समोर येऊन उभी राहीली.

सुनीता : बाबा! मुकाट्याने आईचं मंगळसूत्र परत द्या!

मोहन : ये सुने ! तुझी एवढी हिम्मत! मला अडवणारी तू कोण?


म्हणतच तिच्यावर हात उगारणार... एवढ्यात सुबोध आणि मीनाने मागून मोहनला जोरदार धक्का दिला.जणू तिच्या अंगात देवीच अवतरली होती. बाजूलाच पाटा-वरवंटा होता, मोहन डोक्याच्या भारावर त्यावर पडला...जे नको व्हायला नेमकं तेंच झालं. मोहनच्या डोक्यातून भळाभळा रक्त वाहत होतं, त्यातच तो गतप्राण झाला. मुलं आणि मीना खूप घाबरले. शेजारी-पाजारी जमले, पोलीस तक्रार करण्यात आली. मीनाने स्वतः गुन्हा कबूल केला.

"एक वादळ जरी शमलं होतं, पण "नवीन वादळाची" चाहूल लागली होती." 

आजूबाजूचे मिनाकडे "एक खुनी" या नजरेने बघत असतांना तिच्या पिल्लानी तिला गच्च मिठी मारली. खुनाच्या आरोपाखाली मीनाला शिक्षा झाली. 

आता सुनीतावर भावाची जबाबदारी आली होती, मायेच्या ममतेने ती सारं सांभाळून आपलं आणि सुबोधचं शिक्षण घेत होती. 


   दोन वर्षानंतर......

मीनाची तुरुंगातील चांगली वागणूक, तिची उत्तम तर्हेने काम करण्याची पद्धत ,आणि विशेष म्हणजे तिने हा खून मुद्दाम न करता स्वतःच्या आणि मुलांच्या बचावासाठी म्हणून तिने केलेला प्रतिकार होता, या मागे तिचा मोहनला मारण्याचा मुळीच उद्देश नव्हता. मोहनला धक्का दिला ...आणि त्यातचं त्याचा मृत्यू झाला हे कोर्टात सिद्ध झालं. हे सारं बघून तिची सजा कमी करण्यात आली. आज ती आपल्या घरी परत आली, आपल्या पिलांपाशी. 

व्यसनाच्या आहारी जाऊन एक चांगलं हसतं-खेळतं घर उध्वस्त झालं.पण! आपल्या पिलासाठी तिला परत आपलं घरटं उभारायचं होतं, लोकांची टोमणे,त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन या सर्वांना सामोरे जाऊन.

    "धूसर धूसर एक वाट

      वादळाने जरी शमली होती.

     दवबिंदूने सजून आज

      ती हरीत तृणांनी सजली होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational