भूत..भूत..भूत..!!
भूत..भूत..भूत..!!
एकदाची गोष्ट आहे. रघु काकाच्या शेतावर मोवरान होते. बारा ते पंधरा च्या घरात पूर्वजात मोठ-मोठी मोवांची झाडे होती. मार्च महिना आला. मोवांच्या झाडांना कुची येणे सुरू झाले. एप्रिल महिन्यात मस्तपैकी मोवा पडणे सुरू झाले. रघु काका पहाटेच्या प्रहरी आपली निंद्रा त्याग करून, टोपले-टापले घेऊन मोवरान कडे जायला निघायचे.
जराही विसावा न घेता त्यांचे मोवा वेचने सुरू असायचे. रोजचे पाच ते सहा शिटवे भरत असत. असे आठदहा दिवस मस्तपैकी एवढेच शिटवे भरत होते. त्या नंतर तीनचार शिटवेच मोवा मिळायची. ते विचारात पडले की, अचानक मोवा मिळणे कमी का झाले? झाडांना कुची तर चांगलीच आहे. काहीतरी काळं आहे. कुणीतरी माझ्या अगोदर येऊन, मोवा वेचत तर नसतील ना..!! असा विचारचक्र काकांच्या मनात घोळू लागला.
रघु काकांची, शेत शेजारी धोंडीबाशी वाटेत भेट झाली. धोंडीबानच रघु काकाला विचारलं, रघु भाऊ मोव-गीवा चांगले पडत्यातना..? अरे काय सांगू धोंडिबा, अचानक मोवाच मिळणे कमी झाले. कुणास ठाऊक काय होतंय..!! अरे भाऊ, माझी भी तीच गोष्ट हाय. दोन दिवसांपासून मोवाच कमी मिळत्यात. दोघेही आपापल्या दिशेने चालते झाले.
रघु काकांना, एक किशोरवयीन मुलांचं, रात्री तीन वाजेच्या सुमारास टोळकं निघतं म्हणून सुगावा लागला. यांचा बंदोबस्त करायलाच हवं, यांची खोड मोडून, यांना चांगलीच अद्दल घडवायलाच हवी, असे विचार मनात येऊ लागले. काय करायला हवं..? मनात कल्पना सुचली. मोवरानात मधोमध शंभर वर्षापूर्वीचे खूप मोठे झाड होते. तो झाड भयानक दिसायचा. त्या झाडावर अमावश्या-पौर्णिमेला भूत आढळतो म्हणून गावात फार फार वर्षापूर्वीपासून चर्चा होती.
त्याचाच फायदा घेऊन, अद्दल घडविण्याकरिता रघु काकाने एक बेत आखला. रघु काका टोळक्याच्या वेळेआधीच मोवरानात पोहचले व अक्राळ-विकराळ झाडाच्या फांदीवर रघु काका चढला अन् लपून बसून राहिला. रघु काकांना टोळकं येण्याची चाहूल लागली. टोळकं जवळजवळ येऊ लागले. टोळक्यात चार-पाच मुले होती.
मोवा तर.. सळा पडली होती. मुले अंतरा-अंतरावर होऊन, दोन्ही हातांनी हातांनी मोवा वेचु लागली. रघु काका मस्त मजा पाहत होते. काकाने सुरू केले आपले बुजगावण्याचे कार्य..! अगोदर जोरात फांदी हालवली. माकड समजून, मोवा वेचण्यात मुले मश्गुल होती. मग पाच मिनिटांनी मातीचा चुरा त्यांच्या अंगावर भिरकावला.
आपसात त्यांची कुजबुज होऊ लागली. त्यातला एकजण म्हणतो. अबे, या झाडावर भूत राहतो; असे माझ्या ऐकिवात आहे. अमावश्या पौर्णिमेला दिसतो, असे सांगत होते. त्यातला दुसरा, बटा डरपोक, काही सांगते. मी खरंच सांगतो. आज अमावश्या आहे, हा भूत तं नसल रे? अरे वेचना लवकर. भूत-भूत लावून दिलं.
रघु काकांनी आणखी जोरात फांदी हालवली व मघाभर पाणी त्यांच्या दिशेने भिरकावले. आता तर.. त्यांच्या मनात भीतीची धडकी भरली. घाबरून एक मुलगा तोंड फाळून वर पाहू लागला होता. आता तर मुलांची बेंबडीच वळली. काकाने पुन्हा डरावणे आवाज काढले तसेच मुले आपले टोपले सोडून भूत.. भूत.. भूत.. म्हणून गावच्या दिशेने धूम पळाली. रघु काका झाडावरून उतरलेत व खोखो हसू लागली. काकांना हसू आवरेना. त्यानंतर ती टोळकी मुले कधीच मोवरानाकडे फिरकलीच नाही. रघु काकांची नामी युक्ती यशस्वी झाली.
बोध - जे काम शक्तीने होत नसते ते सहजरित्या युक्तीने होत असते. युक्तीने अद्दल घडविता येते.