अज्ञात मित्र
अज्ञात मित्र
राणी आज खूप आनंदात होती कारणही तसेच होते. आजपासून एक महिन्यांनी तिचे आणि विक्रमचे लग्न होणार होते. त्यांचा प्रेम-विवाह होता. दोघं एकमेकांना गेली दहा वर्ष ओळखत होते. आधी ओळख मग मैत्री आणि मग प्रेम या सर्व टप्प्यांमधून ते गेले होते. लवकरच ते एका नव्या नात्यांनी बांधले जाणार होते .दोघांच्या घरचे लोकही आनंदात होते. खास करून विक्रमच्या कारण त्याचा पायच मुळी घरात राहत नव्हता. तो व्यवसायाने बिल्डर होता. पण त्याला भटकंतीचा खूप नाद होता. नेहमीपेक्षा वेगळ्या ठिकाणी भटकायला त्याला फार आवडायचं. त्याचबरोबर त्याला विज्ञान-तंत्रज्ञानांचीही आवड होती. त्या क्षेत्रातले त्याचे मित्रही होते. वेळात वेळ काढून तो त्यांना संशोधनात मदत करायचा. एकूण काय तर विक्रम घरात फार कमी वेळ रमायचा. म्हणूनच आपले हे दिवटे चिरंजीव लग्नानंतर स्त्री घरात राहतील या विचारानी त्याच्या घराचे खूष होते.
लग्नाला १५ दिवस राहिले असताना विक्रमला श्रीकांत चा फोन आला. श्रीकांत समर्थ हा विक्रमापेक्षा वयाने ५-६ वर्षांनी मोठाच असेल तरीही सामान आवडींमुळे ते एकमेकांचे मित्र बनले होते. श्रीकांत प्रोफेसर होता तसेच तो अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचा धडाडीचा कार्यकर्ता होता. बुवाबाजीविरुद्ध त्यांनी केलेले आंदोलन भारतभर गाजले होते.हे साधू - बुवा जे चमत्कार करतात ते कसे खोटे आहेत. हे त्यांनी विज्ञानाचा आधार घेऊन सिद्ध केलेले. विक्रमनेही त्याला या केसमध्ये मदत केली होती.
आज श्रीकांत चा फोन येताच आपल्याला परत काहीतरी एक्सायटिंग ऐकायला मिळणार या कल्पनेने विक्रम खुश झाला. तो काहीतरी वेगळंच सांगत होता. लडाखजवळ टाकुंग नावाचं एक ठिकाण आहे. जेथे जुन्या काळातला एक मोठा किल्ला आहे. त्या किल्ल्यात गेलेला माणूस नाहीसा होतो. कोणाला कधीच दिसत नाही. यावर अनेक संस्थानी संशोधन केले आहे. तरीही कोणी त्यामागचं कारण शोधू शकलं नाही. तो किल्ला कोणी बांधला आहे कोणत्या शतकातला आहे याबद्दल काही माहिती उपलब्ध नाही. तो बांधण्याचे कारणही दिसत नाही . त्याचा आकारही एखाद्या बशीसारखा आहे. त्यात एखाद्या राजांनी वास्तव्य केल्याचा उल्लेख इतिहासात सापडत नाही तरीही तो किल्ला तेथे आहे आणि विशेष म्हणजे त्या भागात जगात सर्वाधिक उडत्या तबकड्या(UFOs ) दिसल्याचे दाखले दिले जातात. तिथले स्थानिक लोक तर शपथेवर सांगतात कि त्यांनी 'राकूस' पाहिलेत. पण मला तरी हे सगळं थोतांड वाटतंय. या सर्व घटनांचा शोध घ्यायला अमेरिकेवरून एक टीम आली होती. अर्थातच भारत सरकारनी त्यांना परवानगी नाकारली. कारण त्यांच्या जीविताची जबरदारी आपली होती. पण या सरकारच्या धोरणावर जगभरातून टीकेची झोड उठवली गेली. मग सरकारला परवानगी द्यावीच लागली.
सरकारनी मीडियापासून हि गोष्ट लपवली पण जेंव्हा ती अमेरिकन टीम एका रात्रीत हवेत विरून गेल्यासारखे नाहीसे झाले तेंव्हा मात्र भारताची खूप नाचक्की झाली. आणि आता हि शोध घ्यायची जबाबदारी माझ्या टीमवर पटेल काकांनी (राष्ट्रपती C. J. Patel यांना श्रीकांत मुलासारखा होता.) माझ्यावर सोपवली आहे. माझ्या टीममध्ये तुझी गरज आहे. टीम दोन दिवसात निघणार होती. विक्रमने घरी हि गोष्ट सांगताच घरी मोठा हंगामा झाला.कोणीच त्याला जायची परवानगी देईना. मग तो राणीला भेटला आणि आपली या मिशनवर जायची इच्छा सांगितली मग मात्र ती म्हणाली," अरे तिथे भूतं-खेत, राक्षस नाहीयेत यावर माझा विश्वास आहे. तरीही जीवाला धोका आहेच ना ? तुम्ही तिथल्या रहिवाश्याना अंधश्रद्धाळू समजता पण काही कारण असल्याशिवाय ते बोलणार नाहीत ना? तिथे एखाद मोठं जनावर असू शकतं असं म्हटलं अरे काही खाणाखुणा सापडायला हवेत कि नको? तिथे असं काहीतरी आहे जे संपूर्ण जगला अज्ञात आहे. तिथे खूप मोठा धोका आहे." तिच्या आवाजातली तळमळ विक्रमला जाणवली. तो म्हणाला," राणी तिथे असं काहीतरी आहे जे विज्ञानालाही अज्ञात आहे, बुचकळ्यात टाकणारं आहे. मलाही हेच सिद्ध करायचं आहे कि त्या ठिकाणी अनैसर्गिक असं काहीच नाहीए. यासाठी मला तुझी मदत हवीय. घरच्यांना फक्त तूच समजाऊ शकतेस. राणीनी घरच्यांची समजूत काढली विक्रम चा मार्ग मोकळा झाला.
मग त्यांनी त्या भागाचा अभ्यास करायला सुरवात केली. त्याच्या हातात २ दिवस होते. खूप शोध घेतल्यावर एका खूप जुन्या पुस्तकात त्याला या भागाचा एक छोटासा उल्लेख आढळला. त्यात असं लिहिलं होतं कि, फार पूर्वी म्हणजे ३ हजार वर्षांपूर्वी या भागात एक छोटेसे राज्य होते. इथल्या राजाला एक दिवस अचानक आकाशातून एक यान येऊन घेऊन गेले काही दिवसांनी राजा परत आला तो दिव्य शक्ती घेऊन. आल्या- आल्या पहिले त्यांनी या किल्ल्याचे बांधकाम केले. ते करण्यासाठी लोक कुठून आणले हे पुस्तकाच्या लेखकानी उल्लेख केला नाही. पण ते अद्भुत असावेत हे नक्की. कारण तीन दिवसातच हा किल्ला बांधून तयार झाला. राजा स्वतः कधी त्यात राहिला नाही. बांधल्या दिवशीपासून आकाशातून प्रकाशाचे झोत येऊन किल्ल्यात जाताना दिसत. स्थानिक लोक त्याला घाबरत कधी कधी तर मोठाले आक्राळ विक्राळ आकार दिसत लोक त्यांना राकूस म्हणत. जे कोणी तिकडॆ जायचा प्रयत्न करत ते नाहीसे होत. अशी हि कथा वाचून विक्रमला हसायला आले. तो यावर विश्वास ठेवणार नव्हता तरीही सावध राहणार होता.
ठरल्या दिवशी श्रीकांतची टीम किल्ल्याजवळ आली. टीम अत्यंत अत्याधुनिक उपकरणांनी सज्ज होती. त्यांच्यात एक भैरप्पा नावाचा मुलगा होता. त्यानी एक रोबोट बनवला होता. तो वातावरणातली अनैसर्गिक स्पंदने पकडत असे. विक्रमने गमतीने त्याला 'भुत्या' नाव ठेवले होते. कारण त्यांना भुताखेतांच्या केस सोडवण्यात या रोबोट नि खूप मदत केली होती. आणि श्रीकांतच्या सर्व सहकाऱ्यांमध्ये हे नाव प्रचलित झाले होते. झालं सर्व तयारीनिशी भुत्या कामगिरीवर जायला सज्ज झाला. त्यानी एक रात्र सुरक्षित अंतरावर राहून निरीक्षण करायचं ठरवलं. त्यानी आपले कॅमेराज सज्ज ठेवले. रात्री १२ च्या सुमारास अचानक भूकंप झाल्यासारखे जमिनीला हादरे बसू लागले आणि किल्ल्यातून प्रखर प्रकाशझोत निघून आकाशात जाऊ लागले. विक्रम आणि टीम तयार असूनही त्या प्रकाशाने त्यांचे डोळे इतके दिपले कि काही क्षण त्यांना दिसेनासे झाले. तो प्रकाश जसा आला तसा गेलाही. मग सर्वानी कॅमेराज चेक केले तर त्यात काहीच रेकॉर्ड झालं नाही. सगळीच टीम नाराज झाली. हि गोष्ट अशी होती कि जिथे अत्याधुनिक तंत्रज्ञानसुद्धा काम देत नव्हतं. मग आता काय करायचं यावर सर्व टीमची चर्चा चालू झाली. श्रीकांत आणि विक्रमच असं म्हणणं पडलं कि आता बाहेर राहून काही होणार नाही. धोका पत्करायलाच हवा.
टीममधील दोन सदस्यांनी भुत्याला घेऊन किल्ल्यात जाऊन बघायचं. जे काही सत्य आहे ते जगासमोर आणलेच पाहिजे. आता भुत्याला न्यायाचा म्हणजे भैरप्पा एक सदस्य ठरला. दुसरा श्रीकांत तयार झाला. विक्रमने या गोष्टीला विरोध दर्शवला जर श्रीकांतला काही झालं तर बाकीची टीम काय करेल त्यापेक्षा विक्रमने जायचे ठरले. विक्रमने जायच्या आधी घरच्यांना आणि राणीला फोन केला. ठरल्याप्रमाणे विक्रम , भैरप्पा आणि भुत्या किल्ल्यात गेले. ते प्रवेशद्वारातून आत जाताना श्रीकांत पाहत होता. कधी नव्हे ती त्याच्या मनात धाकधूक होत होती. दरवेळीप्रमाणे यावेळी त्याला यशाची खात्री वाटत नव्हती. तो प्रकाश पाहून त्याला मनोमन हे मान्य करावे लागले कि नक्कीच हे मानवी शक्तीच्या बाहेरचा काहीतरी प्रकार आहे. म्हणूनच त्यानी विक्रमला बाजूला घेऊन सूचना दिल्या होत्या. तो बोलला," हे बघ विक्रम हे काम जरी आपण अंगावर घेतलंय तरी यात जीवाचा धोका दिसतोय. जर काहीही धोका वाटलं तर नसतं धाडस करू नकोस. सरळ मागे फिरा तुम्हाला कोणीही दोष देणार नाही. जान है तो जहान है| जीव महत्वाचा समजलं?" विक्रमने जरी हे मान्य केले असले तरी श्रीकांतचा त्याच्या हो बोलण्यावर विश्वास नव्हता. कारण अशीच जर संधी आली तर विक्रम नको ते धाडस करणार याची त्याला खात्री होती. विक्रमने मोठया हुशारीने श्रीकांतला आणि त्याच्या टीम ला श्रीकांतने किल्ल्यात जाणं कसं चूक आहे हे पटवून दिलं होतं. जर लीडरच नसेल तर मिशन कसं होईल त्याच्या या प्रश्नाला सगळ्यांनी होकार दिला होता. मग काय एकमुखाने विक्रमच नाव समोर आलं. हे सगळं श्रीकांतला विक्रम किल्ल्यात जाताना आठवत होतं. आपण त्याला जाऊन दिलं हि चूक केली का ? हे त्याच्या मनात येत होतं. पण आता उपयोग नव्हता बाण सुटला होता.
इकडे विक्रम आणि भैरप्पा भुत्याला घेऊन किल्ल्यात प्रवेश करत होते. ते खूप सावधपणे आत जात होते. विक्रमच लक्ष भुत्याकडे होतं तो काय वेगळा सिग्नल देतोय का तिकडे. अजूनतरी तो शांत होता. त्यांनी प्रेवेशद्वारातून आत जाताच त्यांचे डोळे आचार्यांनी विस्फारले कारण ते जणू एखाद्या उंच कड्याच्या काठावर उभे होते. तो किल्ला बशीसारख्या आकाराचा होता. ते बशीच्या काठावर उभे होते आणि जमीन खाली खोल उतरत गेली होती. आता प्रथमच विक्रमच्या मनाला भीतीचा स्पर्श झाला. हे बांधकाम मानवी वाटत नव्हतं. त्याला किल्ला म्हणणंही चूक होतं. बरं आतही काही दिसत नव्हतं. इतक्यात १२ वाजले तो प्रकाश दिसायची वेळ झाली. विक्रम आणि भैरप्पा तिथेच असणाऱ्या एका दगडामागे लपले. त्यांनी खूप पॉवरफुल गॉगल घातले होते. इतक्यात जमीन हादरू लागली. आणि आकाशातून एक मोठा प्रकाशझोत किल्ल्याच्या वर आला. विक्रम आणि भैरप्पा बघत होते. नजरेच्या टप्प्यात आल्यावर बघतात तर काय ती एक उडती तबकडी (UFO ) होती. ती खाली जायच्या बेतात होती. विक्रमने भैरपाला तिकडेच थांबायला सांगून त्या तबकडीतून बाहेर आलेल्या पायांपैकी एक पकडला.
ती उडण्याच्या तयारीत असावी. क्षणात ती जमिनीच्या पोटात निघून गेली. हे सर्व काही सेकंदात झाले. भैरप्पा फक्त हतबुद्ध होऊन तबकडीबरोबर खाली जाणाऱ्या विक्रमला बघत बसला. इकडे भुत्याचे सिग्नल इतके वाढले कि त्याला भुत्याला बंद करून ठेवावा लागला. धक्क्यातून सावरल्यावर, त्याच्यापुढे प्रश्न होतं कि आता काय करायचे? बाहेर विक्रमशिवाय कसे जायचे आणि विक्रमने जाताना इथेच थांब अशी सूचना दिली होती. मग आपण इथून हलायचे नाही हा निश्चय त्यांनी केला. इकडे विक्रम तबकडीबरोबर खाली खाली जात होता. किती खाली अंदाजच येत नव्हता. शेवटी एकदाची जमीन लागली. उतरून विक्रम लपायला जागा शोधू लागला. तो एक गुप्त एलियन बेस होता. तो इकडे तिकडे बघत असतानाच त्याच्या मनात आवाज उमटला," मूर्ख मानावा! आम्ही तुला पहिला आहे. लपायचा प्रयत्न करू नकोस. आहेस तिथेच थांब." "ते मनानी संपर्क करतात तर." विक्रमच्या मनात आलं.इतक्यात त्या तबकडीतून त्याच्याच उंचीच्या पण हिरव्या रंगाच्या मानवसदृश असणाऱ्या माणसांची (?) रांग बाहेर आली. त्यांच्या हालचालीत एक शिस्त होती. ते मानवासारखे दिसले तरी मानवापेक्षा खूप वेगळे आणि भयानक दिसत होते. त्यांचे डोळे खूप मोठे होते. त्यांनी अर्धा चेहरा व्यापला होता. "म्हणून स्थानिक लोक यांना राक्षस म्हणतात तर! "
विक्रमच्या मनात विचार आलं. तो निर्भयपणे त्यांचं निरीक्षण करत उभा होता. इतक्यात त्याच्या मनात आवाज उमटला," मूर्ख मानव ! तुम्ही स्वतःला पृथ्वीचे मालक समजता आम्ही तुमच्या आधीपासून इथे आहोत. तुमचा जन्मही आमच्यापासूनच झाला आहे. तुमचे देव आकाशातून यायचे असे तुम्ही म्हणता ना ? ते कोण होते माहित आहे? तुम्ही तुमच्या सोईनुसार देवाची रूपे कल्पली. पूर्वीच्या काळी अत्याधुनिक तंत्रज्ञान होतं. रामायण-महाभारतातली शस्त्र- अस्त्र , विमानं म्हणजे काय होतं? मानवाला आम्ही दिलेलं वरदान. पांडवांच्या मायसभेतले चमत्कार बनवणारा कुशल शिल्पकाराला हे सर्व ज्ञान कुठून मिळाले? त्या वेळी आतापेक्षाही प्रगत संस्कृती होती.कारण आम्ही त्यांच्या सोबत होतो. ते आम्हाला मान द्यायचे, आमची पूजा करायचे. हळू हळू मानव गर्विष्ठ व्हायला लागला. मग आम्ही त्यांच्यावर दुष्काळ,पूर,भूकंप अशा आपत्ती आणून त्याला धडा शिकवला. पूर्वी आम्ही त्यांच्यासाठी सुलभ होतो आता दुर्लभ झालो. संपूर्ण जगभरात आमची अशी अनेक ठिकाणे आहेत. आम्ही तुमच्यापासून दूर राहायचा प्रयत्न करतो तुम्ही परत परत आमच्या मागे लागतात. तू सुद्धा त्यातलाच एक आता मरायला तयार हो.आमचा अस्तित्व समजल्यावर आम्ही तुला बाहेर जाऊन देणार नाही." विक्रम त्यांना म्हणाला, " हे महामानवांनो! हो मी तुम्हला मानवच बोलणार आहे. फक्त आमच्यापेक्षा उच्च दर्जाचे. मी कधी देव मानला नाही. कारण तो नसतोच असे माझे मत होते. आज तुम्हाला पाहिल्यावर तुमचे म्हणणे ऐकल्यावर समजले देव आहे. तुम्ही कुठले आहात? कोण आहात? यापेक्षा तुम्ही आहात याची जाणीव आज मला झाली. मला माहित आहे तुमचे हे रहस्य घेऊन मी बाहेरच्या जगात जाऊ शकत नाही. तरीही मी मरतानासुद्धा आनंदी आहे कारण मी अशा महामानवांना भेटलो ज्यांचा मी वारस आहे. मी मरायला तयार आहे."
विक्रमच हे बोलणं एकूण क्षणभर ते विचारात पडल्यासारखे वाटले. मग विक्रमच्या मनात आवाज उमटला," मित्रा ! तू आवड्लास आम्हाला. आम्ही तुला इथून जाऊन देतो. वर गेल्यावर तुला आणि तुझ्या त्या लपलेल्या मित्राला आमची आठवणसुद्धा राहणार नाही.आमचे नाव ' देवक' आहे. जा! तुझ्या जगात सुखाने रहा. यापुढे आम्ही या स्थळावर कधी येणार नाही." विक्रमने डोळे उघडले. तर तो भैरप्पाशेजारी होता. दोघं दगडामागे लपलेले. भैरप्पा वैतागून म्हणाला," जाऊ दे आज बहुतेक तो प्रकाश दिसणार नाही. उगाच लपलो इतका वेळ." ते दोघं किल्ल्यातून बाहेर आले. संपूर्ण टीम त्यांची वाट बघत होती कोणालाच आज तो प्रकाश दिसला नव्हता. सगळे आपापल्या घरी परत गेले. दोनच दिवसात बातमी आली कि लडाख मध्ये झालेल्या भूकंपात तो किल्ला जमीनदोस्त झाला.
विक्रम आणि राणीचं लग्न धुमधडाक्यात झालं. लडाखवरून आल्यापासून विक्रमच्या मनात एक हुरहूर दाटून येत होती कि आपण कोणत्यातरी प्रिय व्यक्तीच्या आठवणींनी येते तशी, आज ती खूपच वाढली होती. इतक्यात राणीनी ती आई होणार असल्याचं सांगितलं. नऊ महिन्यांनी त्यांना जेंव्हा मुलगा झाला. तेंव्हा विक्रमने अंतःप्रेरणेनी त्याचं नाव ठेवलं 'देवक'.