अज्ञात बेटावर - भाग ९
अज्ञात बेटावर - भाग ९
प्रकरण ९
संध्याकाळचे सात वाजले तरी राकेश परत आला नव्हता. तो कदाचित परत कधीच येणार नाही. याची तुषारला खात्री वाटू लागली. प्रोफेसर त्यांचाही काहीच पत्ता नव्हता. इकडे कोणाशीही संपर्क होत नव्हता. तुषार वैतागला होता. एक गोष्ट कोणालाही माहित नव्हती अगदी राजेंद्रलाही. ती म्हणजे तुषार पोलीस नव्हे तर स्पेशलफोर्स कमांडो होता. त्या बेटावर अजूनपर्यंत अनेक लोक नाहीसे झाले होते. तसेच हे प्रोफेसर गुप्ता त्यांचीही तुषारने माहिती काढली होती त्यांच्या वरचेवर भारतातल्या खासकरून रामकुट्टीला होणाऱ्या फेऱ्यांबद्दल त्याला समजले होते. याच कारणासाठी त्याने स्वतःला या मिशनवर पाठवावे अशी सरकारला विनंती केली होती.
आपण या रहस्याचा शोध नक्कीच लावू याची त्याला खात्री होती परंतु त्या अज्ञात बेटावर जे काही घडत होते ते त्याच्या समजापलीकडचे होते. जर आपण या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावू शकलो नाही आणि आपल्याला काही झाले तर अनेक निष्पाप लोकांचे बळी जातच राहणार. म्हणून त्याने एक कठोर निर्णय घेतला. त्याला स्वतःच्या जीवाची पर्वा नव्हती फक्त आता अजून लोक इकडे बळी जायला नकोत इतकीच त्याची इच्छा होती.
तो हळूहळू किनाऱ्याजवळच्या एका झाडाजवळ गेला आणि जमीन खोदू लागला. आल्याच्या पहिल्याच रात्री सगळ्यांच्या नकळत त्याने ती बॅग तिथे लपवून ठेवली होती. ती बॅग काढली. त्याला ठरवलेली गोष्ट करायला दोन तास लागणार होते. मग तो प्रोफेसर गुप्तांना बघून घेणार होता.
इकडे नीना साखरपुडा आटपून कामावर परत हजर झाली. तिला समजले कि तिच्या कोणत्याही टीम मेंबर्स बरोबर संपर्क होत नाही. तेंव्हा ती चिंतेत पडली. राजे सरांनी आणि तिने मिळून तुषार आणि राजेंद्रच्या ऑफिस बरोबर संपर्क साधला.
तेव्हा एक दिवसाआड हेलिकॉप्टर जाते परंतु ते बेट कोणालाही दिसत नाही असे समजले. मग नीनाने यापुढे हेलिकॉप्टर जाईल तेंव्हा ती स्वतः त्यांच्याबरोबर येईल अशी विनंती केली. तिला त्या मिशनबद्दल संपूर्ण माहिती असल्यामुळे तिला भारत सरकारकडून तशी परवानगी मिळाली. काही झालं तरी शोध घेण्यासाठी गेलेले लोक सापडणे महत्वाचे होते. लवकरच नीना रामकुट्टीला हजर झाली.
क्रमशः