अज्ञात बेटावर - भाग ४
अज्ञात बेटावर - भाग ४
प्रकरण ४
तिथे वाळूचा सुंदर किनारा होता. त्यांनी बोटी सुरक्षित जागी बांधून ठेवल्या. त्या अशा जागी ठेवल्या कि आणीबाणीची वेळ आलीच तर पटकन पाळता येईल. कोणापासून पाळायचे हा विचार त्यांनी केला नव्हता. पण तिथे काहीतरी धोकादायक आहे असे सगळ्यांनाच वाटत होते. मग ते बोटीतून सामान उतरवू लागले. किनाऱ्यापासून जरा आत अशी सुरक्षित जागा पाहून त्यांनी तंबू ठोकले. मग जवळच्याच झाडाच्या फांद्या जमवूनआणि तीन दगड ठेऊन पारंपरिक चूल बनवली व त्यावर चहा केला. सोबत निघताना जेवण घेतले होते, ते जेवले. मग सगळ्यांनी बेटाचे निरीक्षण करायला जायचे ठरले. दुपारचा एक वाजत होता. त्यांच्या हातात बराच वेळ होता. मग त्यांनी दोन नावाड्याना तंबूजवळ बसायला सांगितले. व आवश्यक सामान घेऊन ते निघाले. ते दोघे नावाडी जाम घाबरले होते. कुठून पैशाचा मोह धरून या शहरातल्या लोकांसोबत आलो असे त्यांना झाले होते . तरी ते किनाऱ्याजवळ होते. गरज पडलीच तर एक नाव घेऊन त्यांना पळता येणार होते.
इकडे शोधपथक निघाले होते. कसला शोध घ्यायचा हे त्यांना माहित नव्हते. तरी सावधपणे ते आसपास पाहत होते. ते जंगल अतिशय सुंदर होते. तेथील झाडे अस्ताव्यस्त वाढलेली नव्हती. ठराविक अंतरावर नीट होती. जणू काही काळजीपूर्वक कोणीतरी लावली होती.गवत वाढले होते परंतु तेही स्पर्शाला मुलायम होते. प्रोफेसर सर्वात पुढे होते. इतक्यात रितूला परत ते हरीण दिसले. "वीर ते बघ हरीण ! किती गोड!" ती उद्गारली. यावेळीही ते फक्त रितूलाच दिसले होते. सगळे तिच्याकडे संशयाने पाहू लागताच ती म्हणाली," ठीक आहे यावेळी मी पुरावाच घेऊन येते." गळ्यातला कॅमेरा दाखवत ती म्हणाली. " मी आलेच पटकन. इथे जवळच असेल." राकेश म्हणाला रितू अगं सगळ्यांनी बरोबर राहायचं ठरलंय ना ? मग एकटी कुठे जाऊ नकोस. थांब मी येतो तुझ्यासोबत. रितू म्हणाली ," अरे नको! ते इथेच जवळच असेल. तुम्ही हळूहळू पुढे व्हा. मी पटकन येऊन तुम्हाला जॉईन होते.तसंही इथे हरवण्याची शक्यता कमीच आहे. आलेच पटकन." असं म्हणून ती गेलीसुद्धा. "संभाळून" असे तुषार म्हणत असताना ती नजरेआड झालीही. खरंतर तिने असं एकटं जाणं त्याला पसंत नव्हतं. पण तो ठराविक मर्यादेपर्यंतच त्यांना सांभाळू शकणार होता. हि मुलगी अतिशय आगाऊ आहे असे पहिल्याच नजरेत त्याचं मत झालं होतं. मग ते आसपास बघत हळूहळू पुढे निघाले.
वीर, राकेश यांचं लक्ष मागच्या रस्त्याकडे लागलं होतं.त्यांना रितूची काळजी वाटत होती. बराच वेळ गेला तरी रितू आली नाही. तसे ते बरेच पुढेही आले होते. त्याच्यातला सर्वात हुशार आणि कमी बोलणारा मित्र समीर, ज्याचं रितूवर मनापासून प्रेम होतं तो आता काळजीत पडला होता. अशा काही जागांवर विषारी वायू असतो, जो ठराविक माणसांच्या मेंदूवर परिणाम करतो त्यामुळे माणसांना अस्तित्वात नसलेली दृश्य दिसतात. असाच भास रितूला झाला असावा असे त्याला वाटले. त्याने तिला हे समजवायचा प्रयत्नही केला. पण नेहेमीप्रमाणे तिने त्याला बावळट समजून उडवून लावले. रितूच जाणं इन्स्पेक्टर तुषारला पसंत नाही हे समीरला समजलं होतं तो म्हणाला," या ठिकाणी आल्यापसूच मला काहीतरी विचित्र वाटतंय. मला त्या प्रोफेसर गुप्तांवर संशय आहे. बघा ते कसे सराईताप्रमाणे चालले आहेत ! मला असं वाटायला लागलंय कि ते पूर्वी इकडे येऊन गेलेत. यांनी आपल्याला इकडे का आणलंय कोणास ठाऊक!" तुषारनेही सहमतीदर्शक मान हलवली. तुषारला समीर पहिल्या भेटीपासून आवडला होता. हा मुलगा खूप हुशार आणि विचारी आहे हे त्याच्या पोलिसी नजरेने हेरले होते.
ते पुढे पुढे जातच होते. रितूला जाऊन बराच वेळ झाला होता. समीर मागेमागे बघत होता. जशी संध्याकाळ होऊ लागली तसे सगळे चिंतेत पडले. इतक्यात एक कर्कश्य किंकाळीच्या आवाजाने ते सगळे दचकले. तो आवाज रितूचा होता. ते क्षणभर स्तब्ध झाले. मग भानावर येऊन सगळे आवाजच्या दिशेने धावत निघाले. ते एका जमिनीच्या एका मोकळ्या तुकड्यावर आले. साधारण दहा बाय दहाच्या त्या भागात एकही झाड किंवा गवताचे पाते नव्हते. इकडूनच रितूची किंकाळी आली याची त्यांना खात्री होती. पण आता त्या जागेवर काहीच नव्हतं. मग तुषार आणि राजेंद्रने सगळी सूत्र आपल्या हातात घेऊन शोधाची सुरवात केली. त्यांनी दोन टीम बनवल्या एकात राजेंद्र आणि दुसरीत तुषार. कारण त्यांच्याकडे वॉकी-टॉकी होते खूप वेळ शोधूनही त्यांना रितू काही सापडली नाही किंवा तिच्या काही खाणाखुणाही सापडल्या नाहीत. रात्र झाल्यामुळे सगळे मुक्कामी परत आले.
(क्रमशः)