अज्ञात बेटावर - भाग २
अज्ञात बेटावर - भाग २
प्रकरण २
पुढचा सगळा आठवडा तयारी करण्यात आणि परवानग्या काढण्यात गेला. ते एका आर्किऑलॉजिकल प्रोजेक्टसाठी जाणार होते. त्यात जो काही शोध लागेल त्याचे श्रेय या टीमला मिळणार होते. परंतु त्यात जे काही शोध लागलीत ते भारत सरकारच्या सुपूर्द करायचे होते. त्यासाठी त्यांच्यासोबत दोन पोलीस अधिकारीही जाणार होते. तुषार कुलकर्णी आणि राजेंद्र नायर. राजेंद्र नायर हा साऊथ इंडियन असल्यामुळे त्याला त्या भागाची जास्त माहिती होती. त्याचे गाव रामकुट्टीजवळच होते. म्हणूनच खासकरून त्याची निवड करण्यात आली होती . हि चर्चा झाल्यापासून बरोबर दहा दिवसांनी ते रामकुट्टी गावच्या समुद्र किनाऱ्यावर पोहोचले होते. ते येण्यापूर्वी राजेंद्रने त्या बेटाबद्दल माहिती काढण्याचा प्रयत्न केला होता. आता तो सगळ्यांना ती माहिती देत होता,” ते एक बेट नाही तर सात बेटांचा समूह होता. समुद्रातील हालचालीमुळे त्यातली पाच बेटे पाण्याखाली गेली. दोन बेटे अजूनही अस्तित्वात होती. त्यातल्या एकावर विषारी साप असल्यामुळे सरकारने जाण्यास बंदी घातली होती. तर दुसरे ! त्याबद्दल अनेक दंतकथा प्रसिद्ध होत्या.
काही लोक म्हणत असत कि त्या बेटावर गेलेली माणसे कधीच परत येत नाहीत. काहींच्या मते त्या ठिकाणी एक ड्रॅगनसदृश जनावर आहे जे लोकांना आपले भक्ष बनवते. या आणि अनेक माणसे आपापल्या सोयीने कथा बनवतात. पण या सर्वांचा सारांश एकच आहे कि त्या बेटावर गेलेला माणूस जिवंत परत येत नाही. आता मी माझा अंदाज सांगतो कि मला असे वाटते कि त्या बेटावर एखादा विषारी वायू असावा त्यामुळे ठराविक ठिकाणी जाताच लोक त्या वायूच्या संपर्कात येऊन मरत असतील.किंवा एखादा अजगरसदृश साप असेल जो तिथे आलेल्या लोकांना खात असेल." "किंवा त्या बेटावर अशी एखादी गोष्ट लपलेली असेल जिथे सामान्य माणसांनी पोहोचून ती लुटू नये असे लपवणाऱ्यांना वाटत असेल." रितू असे म्हणताच सगळे तिच्याकडे पाहू लागले.
“या बेटाबद्दल मीही थोडीफार माहिती काढली आहे. फार पूर्वी या ठिकाणाला देवबाग म्हणत असत. या ठिकाणी आकाशातून देव येऊन विहार करत असत. हे ठिकाण अतिशय नयनमनोहर असे होते. जर तिथे कोणी माणसाने जायचा प्रयत्न केला तर देव त्याला भस्म करून टाकत असत. मला या सर्व भाकडकथा वाटतात. मात्र एक गोष्ट असे सांगते कि पूर्वी या भूभागावर अत्यंत औषधी अशा वनस्पती होत्या. त्या भागातले वैद्य त्याचा वापर रोग्यांच्या उपचाराकरता करीत असत. लांबलांबून लोक इथे उपचार घेऊन रोगमुक्त होत असत. परंतु भूगर्भातील काही हालचालींमुळे किंवा या ठिकाणी असलेल्या ज्वालामुखीचा उद्रेक होऊन हे संपूर्ण बेट पाण्याखाली गेले. तसेच ते शेकडो वर्षे राहिले. मग अशाच भूगर्भात होणाऱ्या बदलांमुळे ते परत समुद्रच्या पृष्ठावर आले. बराच काळ समुद्रात राहिल्याने त्यावरील औषधी वनस्पतीमध्ये काही बदल झाले असतील व बेटावर जाणाऱ्या लोकांनी त्या वनस्पती खाल्ल्या तर ते मृत होत असतील."
"किंवा इथे खरोखरच एखादी अज्ञात शक्ती वावरत असेल जिला मानवांचे तिच्या जागेत प्रवेश करणे पटत नसेल. जर आपण त्याचा शोध लावू शकलो तर आपण खूप प्रसिद्ध होऊ. " वीर म्हणाला. “या सगळ्या चर्चेचं तात्पर्य असं आहे कि त्या बेटावर नक्कीच काहीतरी आहे जे बाहेरच्या जगापासून लपवण्यासारखं आहे. आणि आपण त्याच्या शोधासाठी जाणार आहोत." इन्स्पेक्टर तुषार कुलकर्णी म्हणाला. त्याला या तात्विक चर्चेचा कंटाळा आला होता. काहीतरी ऍक्टिव करावं असं त्याला वाटत होतं.
क्रमशः