अज्ञात बेटावर - भाग 1
अज्ञात बेटावर - भाग 1
प्रारंभ
दोन मच्छिमार आपली बोट घेऊन निघाले होते. आज जरा वेगळ्या भागात जाऊन मच्छिमारी करावी असा विचार ते करत होते. कारण सगळे एकाच भागात जाऊन मासे जास्त मिळत नसत. ते बराच वेळ बोट चालवत होते. इतक्यात एक मच्छिमार ओरडला,
" बाळू ! अरे ते बघ एक बेट दिसतंय. आपण याच भागातले असून कधी कोणी बोललं कसं नाही याबद्दल?"
"अरे! ए काळू त्या बेटावर गेलेले लोक परत येत नाहीत. असा आजा सांगायचा. चल लवकर इथून लांब जाऊ." बाळू म्हणाला.
ते त्या बेटाच्या जवळ आले होते. इतक्यात काळू म्हणाला," अरे बाळू ते बघ सोनेरी रंगाचं हरीण आहे. दिसलं का?"
बाळू," अरे ! मला काहीच दिसत नाहीये. उलट धोका वाटतोय. चल मी बोट वळवतो. पटकन लांब जाऊ."
काळू -" अरे ! त्या हरणाची जर शिकार केली ना तर कातडीचे लाखो कमाऊ. चल कसला घाबरतोस जाऊ." दुसऱ्या दिवशी काळूबाळूची बोट त्यांच्या गावाच्या किनाऱ्याला लागली. पण त्यात काळू बाळू नव्हते.
प्रकरण १
आज लवकर निघायचं ठरवून वीर आला होता. पण नेमकेच आजच परदेशातून काही मंडळी आली होती. वीर आर्किओलॉजिस्ट होता. दिल्लीमध्ये आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटमध्ये नोकरी करत होता. आज त्याच्या डिपार्टमेंटमधल्या त्याच्या समवयस्क मित्र-मैत्रिणींनी पार्टी करायचं ठरवलं होतं. अचानक मीटिंग जाहीर झाल्यामुळे सर्वांच्याच आनंदावर पाणी फिरलं होतं. त्यांना सगळ्यांना कॉन्फरन्स हॉल मध्ये बोलावलं होतं. वीर, समीर, राकेश , , नीना आणि रितू वैतागून एकमेकांकडे बघत होते. मग ते परदेशी पाहुणे आले. खरंतर ते भारतीयच होते पण अनेक वर्षे परदेशात राहिले होते. त्यांचे नाव होते प्रोफेसर गुप्ता. प्रोफेसर गुप्ता बोलू लागले," आज मी अचानक आलो त्यामुळे तुमच्या अनेक प्रोग्रॅम्सवर पाणी फिरले असेल याची मला कल्पना आहे. " वीर आणि त्याचे मित्र एकमेकांच्या तोंडाकडे पाहून हसायला लागले. "आता मी इथे येण्याचं कारण सांगतो. तुमचे बॉस राजे सर माझे मित्र आहेत. माझी भेट आधीपासूनच ठरली होती. गेली २० वर्ष मी एक जागेच्या शोधात आहे. ती अस्तित्वात आहे कि नाही याबद्दल पक्की खात्री नव्हती अगदी मी इकडे येईपर्यंत. पण आता असं काही झालं आहे ज्यामुळे ती जागा अस्तित्वात आहे याची खात्री मला पटली आहे मी मोठ्या मुश्किलीने हा नकाशा मिळवला आहे. तो कुठून मिळाला हेही एक कोडेच आहे.
मी बरीच वर्षे या बेटाचा भारताच्या जुन्या ग्रंथालयांमधून शोध घेत आहे. परंतु मी परदेशात राहत असल्यामुळे येथील लोकांना मी फारसा विश्वासार्ह वाटत नाही आणि ते साहजिकच आहे. हा शोध मी बरीच वर्षे चालू ठेवला आणि अचानक मला तो नकाशा सापडला. कुठून ते सांगणार नाही. एका व्यक्तीने तो माझ्या सुपूर्द केला, आणि त्याचमुळे मी इकडे आहे." सर्वांच्या प्रश्नार्थक चेहेऱ्याकडे बघून ते हसले आणि म्हणाले," मला माहित आहे कि मी खूप कोड्याच्या भाषेत बोलत आहे. आता नीट सांगतो. भारतच्या उत्तरेकडे असलेल्या एका बेटाविषयी हि माहिती आहे." "पण गुप्ता ! भारताच्या उत्तरेला हिमालय आहे. मग बेट? कसं शक्य आहे?" राजेंनी विचारले. गुप्ता हसत म्हणाले," लाखो वर्षांपूर्वी हिमालयाच्या जागी समुद्र होता. जमिनीतील बदलांमुळे हिमालयाची निर्मिती झाली. हिमालयावर काही ठिकाणी समुद्र असल्याच्या खुणाही सापडतात. तर मी खूप वेळा हिमालयाचा ट्रेक केला आहे. हिमालय हे अतिशय गूढ अशी जागा आहे. त्यात अनेक ठिकाणे अशी आहेत कि जी सामान्य माणसांसाठी नाहीत,
प्रोफेसर गुप्ता दाखवत असलेला नकाशा रितुने नीट पहिला. मग ती म्हणाली," जरी जुन्या पुराव्यांनुसार भारताच्या उत्तरेकडे समुद्र होता हे मान्य केले. तरी हा नकाशा उत्तरेकडे नाही तर दक्षिणेकडे इशारा करतो आहे. मग तिने तो नकाशा उलट फिरवला. तसे ती काय बोलते आहे हे सगळ्यांच्याच लक्षात आले. दक्षिण भारतात समुद्रकिनाऱ्याजवळ असलेले रामकुट्टी नावाच्या गावापासून या बेटावर जाता येईल असे सद्य परिस्थितीनुसार वाटते आहे." रितू बोलून गप्प बसली. नीट नकाशा बघताच सगळ्यांना तिचे बोलणे पटले.
मग पुढच्याच आठवड्यात तयारी करून निघायचे ठरले. नीना फक्त येणार नव्हती कारण तिचे लग्न ठरले होते आणि पुढच्याच आठवड्यात तिचा साखरपुडा होता. हा कार्यक्रम अचानक ठरल्यामुळे तिचे कलिग्स साखरपुड्याला येणार नाहीत या गोष्टीच तिला वाईट वाटलं. पण नाईलाज होता.
(क्रमशः)