अज्ञात बेटावर ८
अज्ञात बेटावर ८
प्रकरण ८
राजेंद्रकडे रिव्हॉल्वर आहे हे त्याला माहित होते. नक्कीच काहीतरी मोठा धोका असल्याशिवाय तो फायर करणार नाही अशी त्याला खात्री पटली. प्रोफेसर आणि राकेशही त्या आवाजाने दचकले. आता त्यांना निघा म्हणून सांगायची गरज नव्हती. ते धावतच किनाऱ्याकडे निघाले. ते तंबूजवळ येऊन बघतात तर राजेंद्र आणि समीर यांचा मागमूसही नव्हता. त्यांनी आसपासचा सगळा परिसर पिंजून काढला. त्यांना काहीच सापडले नाही. हताश होऊन ते बसले. तुषारला तर त्याचा उजवा हातच निकामी झाल्यासारखे वाटले.
इकडे तुषार प्रोफेसर आणि राकेश गेल्यावर राजेंद्र आणि समीर बोलत बसले. थोड्या वेळाने त्यांनी चहा करून प्यायला. दोघेही आपण बेटावरून सुखरूप बाहेर पडू का याचा विचार करत होते. समीरला रितूच्या आठवणीने कासावीस व्हायला होत होते. कायम उत्साहात सळसळणारी गोड रितू, चेष्ठा मस्करी करणारा पण हुशार वीर काय झालं असेल त्यांचं ? या विचारांनी तो अस्वस्थ होता. तर राजेंद्र हे काय गौडबंगाल आहे याचा विचार करत होता. हळू हळू काळोख पडू लागला होता. त्यांनी पेट्रोमॅक्स चे दिवे लावले. इतक्यात जंगलाच्या दिशेने त्यांना तुषारच्या किंकाळीचा आवाज आला. तुषार, राकेश आणि प्रोफेसर कोणत्यातरी संकटात आहेत याची त्यांना जाणीव झाली. राजेंद्र समीरला म्हणाला," तू इकडेच थांब मी जंगलात जातो. माझ्याकडे रिव्हॉल्वर आहे. का कोण जाणे मला वाटते आहे कि हा किनाऱ्याचा परिसर सुरक्षित आहे." तेंव्हा समीर म्हणाला," नाही आपण दोघेही जाऊ. हि जागाच धोक्याची आहे. सगळीकडेच धोका आहे. त्यापेक्षा दोघे एकत्र राहू." राजेंद्र वाद घालायच्या मूडमध्ये नव्हता. त्याचे लक्ष तुषारकडे लागले होते. जितका आपण वेळ लावू तितका त्याचा धोका वाढेल असे त्याला वाटत होते. मग ते दोघे धावत आवाजाच्या दिशेने गेले………………………..
आता राकेश, तुषार आणि प्रोफेसर उरले होते. तुषार वॉकी-टॉकीवर मदत मागायचा आटोकाट प्रयत्न करत होता. पण त्याला यश मिळत नव्हते. दुसऱ्या दिवशी प्रोफेसर एकटेच जंगलात गेले. तेंव्हा राकेश तुषारला म्हणाला," आपले इतके साथीदार नाहीसे झाले पण या प्रोफेसरला काहीच फरक पडलेला दिसत नाहीये. मला तर वाटतंय कि हा मुद्दामच आपल्याला सगळ्यांना इकडे घेऊन आलाय बळी द्यायला." असे बोलल्यावर तो स्वतःच दचकला. आपल्या तोंडून असे शब्द कसे बाहेर पडले याचेच त्याला आश्चर्य वाटत होते.मग तुषार म्हणाला," मलाही हेच वाटतंय. तो मोठा दगड आहे ना ! ज्याचा काल तुम्ही अभ्यास करत होतात. तिथे काय आहे ? तू पाहिलंस का ?" राकेश म्हणाला," अरे ! तो दगड दगड नाहीये. म्हणजे ती एखादी मानवनिर्मित वस्तू वाटते आहे. तो स्पर्शाला दगडासारखा वाटला नाही. कदाचित या गोष्टीची त्यांना कल्पना होती. आपण होतो म्हणून ते उगाच परीक्षण केल्यासारखे दाखवत होते. एक काम करू तू वॉकी - टॉकीवर कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न कर मी त्यांच्यामागे जाऊन बघतो." तुषारच्या मनात खरंतर त्याने जाऊ नये असेच होते. पण आता दोघांचा जीव वाचवायचा असेल तर बेटाच्या रहस्याचा पत्ता लावणे आवश्यक होते. जीवाला धोका तर होताच. त्याने सावधगिरीचा इशारा देऊन राकेशला पाठवले.
क्रमशः