आयुष्याचा प्रवास
आयुष्याचा प्रवास
देवकीला ऑफिस मध्ये पोहोचल्यावर एका तासाभरातच तिच्या भावाचा फोन आला तशी ती गडबडीने लिव्ह टाकून तिथून बाहेर पडली .
गाडी सुरू करून ती हॉस्पिटलच्या दिशेने भरधाव गाडी पिटाळत निघाली . मनात असंख्य विचार येत होते . कालच तर भेटून आली होती बाबांना . तेव्हा तर अगदी ठीक होते मग अचानक काय झाले असावे ?
दिपकने नीट सांगितले पण नाही फक्त ,
" बाबांना हॉस्पिटल मध्ये घेवून चाललो आहे तू पण लवकर ये . " एवढेच सांगून फोन ठेवून दिला .
सकाळी अकराची वेळ , रस्त्यावर भरपूर गर्दी , शाळा कॉलेजला जाणारी मुले , आधीच रस्ता छोटा आणि त्यात चौकाचौकात लागणारे सिग्नल .
देविकाला या सगळ्यातून गाडी चालवणं मुश्किल होत होतं . त्यात तिचं सगळं लक्ष बाबांकडे लागलेलं .
आईला जावून काही महिनेच झाले होते पण बाबांनी मात्र त्यानंतर उभारी धरलीच नाही . आईशिवाय ते स्वतःला अपूर्ण समजत होते . नशिबाने वहिनी खुप चांगली अन् काळजी घेणारी होती .अगदी आईसारखी माया करणारी होती पण बाबांना मात्र आईशिवाय जगणं अशक्य होतं . ते त्यानंतर कसे बसे दिवस काढत होते .
मागच्या काही दिवसात देविकाला बऱ्याच वेळा त्यांना समजावून सांगायला जावं लागत होतं. त्यांनी खाणं पिणं सोडलं होतं , मग देविका त्यांच्या आवडीचे काहीतरी बनवून न्यायची आणि त्यांना बळजबरीने खायला घालायची .
काल सुध्दा त्यांना देविकाच्या हातच्या अळूच्या वड्या आवडत होत्या म्हणून घेवून गेली होती ती आणि त्यांना खायला घालून खुप उशिरा घरी परतली होती .
तिला रात्रभर झोप लागली नाही , सारखे अस्वस्थ वाटत होते . झोप नीट न झाल्यामुळे तिला आज ऑफिसला सुट्टी घ्यावी असे वाटत होते पण तरीही ती ऑफिसला आली होती आणि एक दोन तासांनी भावाचा हा फोन .
विचारात ती सिग्नल लागला आहे ते न बघताच पुढे निघाली आणि बाजूने येणाऱ्या गाडीवर धडकणार तेवढ्यात त्या गाडीवाल्याने थोडे वळून ब्रेक दाबला . गाडी साइडला घेत तो देविकाला अपशब्द बोलू लागला पण देविका ते ऐकायला थांबलीच नाही .
मनातल्या धावणाऱ्या विचारांमुळे तिची गाडी मात्र म्हणावा तसा वेग घेवू शकत नव्हती , त्यामुळे तिला हा नेहमीचा रस्ता पण अजूनच लांब वाटत होता .
बाबांकडे लवकरात लवकर पोहोचण्याच्या नादात ती स्वतः एका अडचणीत सापडली असती .थोड्या वेळापूर्वी काय घडलं असतं या विचाराने ती धास्तावली .
थोडे पुढे आल्यावर तिने जवळच्या गणपती मंदिराजवळ गाडी घेतली . गाडी साइडला उभी करून ती मंदिरात आली .
मंदिरात बाप्पाच्या मूर्तीला डोळे मिटून हात जोडले . डोळ्यातून वाहणारे अश्रू पुसत , दीर्घ श्वास घेत तिने स्वतःला सावरले . ती तिथेच डोळे मिटून शांत बसून राहिली .
तिला जरा मन शांत झाल्यासारखं वाटलं . तिने मनोमन देवाला प्रार्थना केली की , " बाप्पा , आईला तर नेलं . आता जरी बाबांना तिच्याशिवाय जगायची इच्छा नसेल तरी त्यांना सावरण्याचे बळ दे .
आमच्यासाठी ते आम्हाला आई एवढेच महत्त्वाचे आहेत .
त्यांचा हा जीवनप्रवास आईशिवाय अपूर्ण आहे ,खुप प्रेम होतं दोघांचं एकमेकांवर . तिची सोबत त्यांना इथपर्यंतच होती .त्यांचा हा प्रवास कुठवर आहे हे फक्त तुलाच माहीत .
आई तर त्यांना अर्ध्यावर सोडून गेली पण
जन्माला येणारा एक ना एक दिवस जाणारच याची जाणीव बाबांना होवू दे .
आयुष्याच्या या वाटेवर कोणाची सोबत कुठवर असावी हे तर विधिलिखित असते .
कुणाचे आयुष्य किती आहे हे जाणून घेणे कुठे आपल्या हातात असते ?
माझ्या बाबांना जगण्याचं बळ दे , त्यांना सावर . "
देविका तिथून सरळ हॉस्पिटल मध्ये आली . समोर दीपक आणि वहिनी काळजीत बसल्या होत्या . देविकाला बघून दोघांनाही जरा धीर आला . तेवढ्यात डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले , " ते आता ठीक आहेत , माईल्ड अटॅक होता . वेळीच इथे आणले म्हणुन बरे झाले , पटकन उपचार करता आले त्यांच्यावर .तरीही पुढे काळजी घ्यावी लागेल .त्यांना कसलाही स्ट्रेस येणार नाही याची काळजी घ्या ."
तिघेही त्यांना होकार देतात . देविका विचारते ," आम्ही त्यांना भेटू शकतो का ? "
डॉक्टर म्हणतात ," जाऊ शकता , पण एक एक जण जा . आणि काही बोलू नका तिथे ."
तिघांनी देवाला हात जोडले आणि पहिल्यांदा देविका बाबांना भेटायला रूम मध्ये गेली .
(समाप्त)
