पाउस तुमचा आमचा..
पाउस तुमचा आमचा..
पाऊस पाऊस
कालचा पाऊस आमच्या गावातच झाला
पाऊस तुमचा आमचा सेम नसतो
कोणासाठी तो निनादणारा असतो
कोणासाठी तो रिमझिम असतो
कुठे दुष्काळ आणतो, कुठे पुर आणतो
कालचा पाऊस आमच्याच गावात झाला
पाण्याची दहशत दाखवून गेला
आस्मानी थैमान दाखवून गेला
शहराला हदयविकर, लकवा आणून गेला
होत्याचं नव्हतं करून गेला
अनेकांना त्याने घरी पोहोचुच दिले नाही
पुरही आता मानवनिर्मित झाले
आताशा पुलाखालून पाणी वाहत नाही
ओढे नाले, घाणीमुळे बंद झाल्याने पाणी पुलावरून वाहते
अनेकजण असाहाय्यपणे
विनाशाचे सामनेच पाहतात
आपत्तीव्यवस्थापन जेव्हा स्विच ऑफ असते तेव्हा मृत्यू स्वस्त असतो
पाऊस आता फक्त कवितेपुरता उरला नाही
पाऊस इतिहास व भूगोल बदलणारा निबंधाचा, लेखाचा विषय झाला आहे
रस्त्यांच्या ही आता नद्या होतात
रस्त्यातूनही आता बोटीने जावे लागते
ढगफुटी होते पण, निसर्गाप्रती मनफुटी जोपर्यंत होत नाही, नाले,मन तुंबणे जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत निसर्ग कोपणारच
कवितेतला पाऊसही आता नकोसा वाटतोय
सांग सांग भोलानाथची आता गरज नाही
शाळेभोवती तळे साचायची गरज नाही
निसर्ग कोपला की शाळेला काय
आयुष्याला सुट्टी मिळत आहे
आता पत्त्यांचेच बंगले कोसळत नाहीत
तर खरेखुरे बंगले, गाड्या, माणसे कोसळतात
निसर्गाचे कोसळणे थांबवले तरच हे थांबणार आहे