खंत
खंत
आज मज हाकारती ही हरवलेली माणसे
रात्र टक्क जागी व्यर्थची टाकतो उसासे
सुख दुःखाचे जाताना ती सोडून गेली ठसे
एकटाच उरे कळेना, मी जगतो तरी कसे//
हरवली का माणसे.......
पार केली किती वादळे, वाटले ते यशमाझे
हरवलेल्या माणसाविना सुखाचेही ओझे
हुंगता आठवाची फुले गंध भासती ताजे
अवेळी पुसून का गेलीस स्वप्न माझे तुझे?/
हरवली का माणसे......
बालपणीचे मैत्र माझे होते आनंदाचे मळे
उल्हास, ऊर्जा, सुखाचे निर्मल होते तळे
एकेक करून कोण कुठे निघून का गेले
आता शोधतो मी ते चित्र जे पुसूनी गेले//
हरवली का माणसे.......
सुखं दुःखाच्या प्रवाही होते काही किनारे
तप्त झळात तेव्हाही झाले शीतल वारे
अशांत रात्रीतील काही स्नेहल शांत तारे
हरवलेल्या माणसानो पुन्हा परतुनी या रे//
हरवली का माणसे...
