रे मना
रे मना
धरलाय अबोला,
सुचत नाहीये नं पळभर?
भांडण झालंय!
बोला, व्हा मोकळे लवकर!
डाचलं खूपलं काही
असेल मनी खोलवर
नको कोंडल्या भावनांचं
दडपण मनावर...
राग होताच अनावर
अविवेकाचा हल्ला बुद्धीवर
मात्र विचार जागतील
कोंडली वाफ सोडल्यावर!
सोडून देऊ भांडणं
कोण चुकलं यावर,
पुन्हा कसं सांधता येईल
या वर देऊ भर...
धारण जरी केला असेल,
मुखवटा शांतीचा
जगाला मस्त देत रहाल,
उपदेश आध्यात्माचा
शिक पहायला आरशात
चेहरा स्वतःचा,
काळाकुट्ट ढग दिसेल
आपल्या भोवतीचा...
दिखाऊ हसणं, कामात
पूर्ण गढून जाणं
नाटकी वागणं, खोटंच
मोठ्याने हसणं
गाणी म्हणत, मी आनंदी
असल्याचं सांगणं
ओळखून घे मना
सारं हे वरवरचं असणं...
सत्य जाणून घेतल्यावर,
नको होऊस दीन!
खरेपणाचा आव आणत
नको तोडून वागू
चूक वा बरोबर
खरंतर असतं तात्कालीन
ताणरहीत जगून मस्त
जीवन जगू....
सत्याला जाऊन सामोरं
कर स्वीकार त्याचा
जाणीव झाली चुकांची
तरी राग नको स्वतःचा
प्रेम देऊन घेशील
न आनंद जगण्याचा
हाच तर मार्ग आहे
मना खऱ्या मुक्तीचा...
