धोरण
धोरण
धरणीच्या उदरातून
हे असं कोणतं रोपटं उगवलंय
की लोक हिरीरीने त्यास खतपाणी घालत आहेत
अंजारत आहेत आणि गोंजारत आहेत..!!
बहुतेक त्या रोपट्याची
अजून जात निश्चित झाली नाही
म्हणूनच लोक त्यावरून भांडत आहेत..
कमी अधिक प्रमाणात पाणी सांडत आहेत
आणि पुन्हा पुन्हा माती उकरून काढत आहेत..!!
प्रत्येकजण खेचू पाहत आहे त्याला
आपल्या जातीत
पण त्यांना माहीत नसावे बहुतेक
उद्या हेच रोपटे
झाड बनून कसली फळं देणार आहे?
रसाळ गोमटी?
की विषारी निपजणार आहेत?
की मातीत जन्मलेल्या ह्या रोपट्यास
खतपाण्याचा अतिरेक
पुन्हा मातीत मिसळणार आहे..?
कळत नाही हो,
ह्या रोपट्याचा बाबतीत
माणसाचं धोरण, नेमकं काय आहे..??
ते त्याचं संवर्धन करताहेत?
की आपल्याच ऱ्हासास कारणीभूत ठरत आहेत..!!