अबोल प्रीत ( भाग 3)
अबोल प्रीत ( भाग 3)
निखिलने आदीत्यच्या हृदयावरच बॉम्ब फोडला होता. तरी स्वत:ला सावरत आदी म्हणाला, विचार ना तिला डायरेक्ट किंवा कवितेमधून प्रपोज कर तसेही तिला तुझ्या कविता आवडतात ना मग.
कविता आवडणं वेगळं त्यावरून कसा अंदाज लावू मी?
मग मनातलं सांगून टाक, मनातलं एकदा बोललं ना की मन हलकं होतं रे... साठवून ठेवलं तर सडून जातं मन... पण आणि त्या भावना पण...
आदी अपसेट झाला होता. पण निखिलला ते जाणवून नाही दिले. हो नक्की बोलतो मी संयुशी निखिल म्हणाला. आदी निखिलचा बेस्ट फ्रेंड होता, त्याला दुखवून तो आनंदी राहिला नसता. म्हणूनच आपल्या भावना संयुपर्यंत पोहचू द्यायच्या नाहीत असे त्याने ठरवले. निखिल कविता करायचा आणि संयुला द्यायचा ती वाचायची आणि कौतुक करायची निखिलचं. आणि निखिल ला वाटायचं तीच पण आपल्यावर प्रेम आहे. अशातच कॉलेजचे तिसरे वर्ष आले पण अजून कोणीच काही बोलले नाही. संयुला वाटायचे आदीत्य कॉलेज संपले की बोलेल तिला आणि निखिलला वाटायचे संयु त्याला मनातलं बोलेल.
कॅन्टीनमध्ये आदीत्य एकटाच बसला होता. अजून कोणी आले नव्हते, तो संयुचा विचार करत होता. आणि त्याच्या बर्थ डेला काढलेले फोटो मोबाईलमध्ये पहात होता. बराच वेळ तो संयुचा फोटो पहात होता, अचानक मागून कोणीतरी त्याचा फोन घेतला, त्याने मागे पाहिले... श्रावणी होती.
श्रावू माझा फोन दे प्लिज, तो म्हणाला.
ना आदीत्य मला पण बघू दे इतकं एकटक तू कोणाला बघत होतास, असे म्हणत श्रावणी त्याच्यासमोर येऊन बसली. तिने फोन पाहिला तर संयुचा एकटीचा मस्त फोटो होता, तोच आदी बघत होता. श्रावणीने आदीत्यकडे पाहिले आणि म्हणाली, डु यु लव संयु?
आदीच्या डोळ्यात पाणी आले तो म्हणाला, येस आय रियली लव हर बट...
पण काय आदीत्य तू मग सांग ना तिला तसे. नाही श्रावणी, निखिलचे प्रेम आहे संयुवर आणि संयुपण त्याला लाईक करते, त्याच्या कविता तिला आवडतात. मग मी कुठे दोघांच्यामध्ये जाऊ. आणि प्लिज मी निखिलला प्रॉमिस केलंय की ही गोष्ट मी कोणाला सांगणार नाही, सो श्रावणी तुलापण आपल्या मैत्रीची शपथ आहे. आता तू जे ऎकलेस ते तू ही कोणाला सांगणार नाहीस अगदी संयुला ही!
ओके आदी, श्रावणी म्हणाली.
अशातच फायनल एक्झाम झाली. पण कोणीच आपल्या भावना बोलून नाही दाखवल्या. कारण प्रत्येकाला वाटलं की आपण बोलून दाखवले तर आहे ही चांगली मैत्रीसुद्धा गमवून बसू.
कॉलेज संपले जो तो आपल्या आयुष्यात पुढे गेला. पण संयु निखिल आदीत्य यांची लवस्टोरी सुरू होण्यापूर्वीच संपली. पण प्रत्येकाने ती आपल्या मनात जपून ठेवली. संयुच्या हृदयात कायम आदीत्यच होता आणि आदीत्यच्या मनात संयु कायमची आठवण बनून राहिली आणि निखिलच्या कवितेत, त्याच्या शब्दा-शब्दात फक्त संयु होती. एक अबोल प्रीत सोनेरी आठवण बनून राहिली जो तो मनातून हळहळत राहिला.
आज संयुला सगळं सगळं आठवले आणि आदीत्यच्या आठवणीने ती पुन्हा एकदा कासावीस झाली. पहिलं प्रेम असतंच असं ओढ लावणारं, हुरहूर वाढवणारं! पण आता या गोष्टीला पाच वर्षे झाली होती. आदी कुठे असेल काहीच संयुला माहीत नव्हते आणि आज श्रावणीच्या फोनमुळे व्हाटसअपमुळे पुन्हा एकदा आदीत्यजवळ आल्यासारखा वाटला तिला. दुसऱ्या दिवशी ग्रुपवर मेसेज आला की कॉलेजचे रियुनियन ठेवले आहे, 15 दिवसांनी सगळ्यांनी नक्की यायचे असे ठरले. श्रावणीने अभिजित निखिल संयु आणि आदीला मैत्रीची शपथ देऊन यायला भाग पाडले होते.
आज रविवार आज रियुनियन होते. सगळ्यांनाच एकमेकांना भेटायची ओढ लागली होती. हळुहळु कॉलेज कॅम्पस भरत चालला होता. श्रावणी आणि संयु एकत्रच आल्या. थोड्यावेळात अभि आणि निखिल आले. दोघेही थोडे तब्येतीने जाड झाले होते श्रावणी आणि संयु चुडीदारमध्येही छानच दिसत होत्या. आता फक्त आदीत्य यायचा होता. ते आदीची वाट पहात गप्पा मारत होते. संयुचे मन थाऱ्यावर नव्हते, कधी आदीत्यला पाहते असं तिला झाले होते.
आदीत्य आला मस्त बुलेटवरून, तसाच पूर्वीसारखा रुबाबदार आणि डोळ्यावर गॉगल... संयु भान हरपून पहात होती. आदी जवळ आला तसे अभ्या आणि निक्याने त्याला घट्ट मिठी मारली. त्यांची मिठी बघुन संयुलाही वाटले की मी ही अशीच घट्ट मिठी आदीला मारावी आणि आजपर्यंत भरलेले मन त्याच्या मिठीत हलकं करावं. पण कसे शक्य आहे आता ती कोणाची तरी बायको होती एका मुलाची आई होती.
श्रावणी म्हणाली, आदी आम्ही पण आहोत म्हटलं इथे.
अगं दम घे जरा. पाच वर्षांनी भेटतो आहोत आपण. मग कशी आहेस श्रावू.
मी मस्त आहे आणि संयुकडे जात आदी म्हणाला, संयु कशी आहेस आणि काय करतेस सध्या.
संयु म्हणाली, मी मुंबईला असते आणि सध्या घरीच आहे. तू कसा आहेस आदीत्य?
मी मजेत, मी पुण्यातच आहे. हे पाच जणच गप्पा मारत बसले होते बाकी कॉलेजचे विद्यार्थी विविध गेम खेळत एन्जॉय करत होते. श्रावणीने निखिलला पुन्हा एकदा कविता ऐकवायला लावली. निखिल आजही कविता करायचा संयुच्या आठवणीत. अभीने माईक आणला आणि आदीत्यला म्हणाला, आदी आज तुझं गाणं झालंच पाहिजे.
नाही रे अभ्या आता नाही म्हणत गाणं मी. केव्हाच बंद केलं.
का कोणाच्या आठवणीत बंद केलेस की कोणाची तरी आठवण येईल म्हणून बंद केलेस? श्रावणीने विचारले.
तसा आदीत्य म्हणाला, असे काही नाही. मग आज गाणं ऐकूनच जाणार आम्ही.
ओके, असं म्हणत आदीने माईक हातात घेतला आणि गाणं म्हणू लागला-
छुपाना भी नहीं आता
जताना भी नहीं आता
हमे तुमसे मोहब्बत है
बताना भी नहीं आता
हथेली पे तुम्हारा नाम
लिखते हैं, मिटाते हैं
तुम्ही से प्यार करते हैं
तुम्ही से ही क्यों छुपाते हैं
जुबान पे बात हैं लेकिन
सुनाना ही नहीं आता
हमे तुमसे...
मोहब्बत कैसे करते हैं
कोई तो हमको समझाएं
कहीं ऐसा न हो के
प्यार बिन उम्र कट जाए
तुमसे मिलने का कोई
बहाना भी नहीं आता
हमे तुमसे...
चोरी-चोरी चुपके चुपके
तुमको देखा करते हैं
हाल-ए-दिल सुनाने से
ना जाने क्यों डरते हैं
कितना पागल दिल है मेरा
मनाना भी नहीं आता
हमे तुमसे...
आदीने गाणं छान म्हटले. ते फक्त संयुसाठी होतं, हे संयु आणि श्रावणीने ओळखले. कार्यक्रम संपला तसे सर्व घरी जायला निघाले, पुन्हा भेटू असे म्हणत निघाले.
संयुने ठरवले आज काहीही झाले तरी आदीत्यशी बोलायचे सो ती आदीला म्हणाली, आदीत्य माझे काम आहे तुझ्याकडे.
ओके बोल ना मग.
बाहेर जाऊ कॉफी घेत बोलू, संयु म्हणाली. दोघे कॉफी शॉपला आले. संयु आदित्यला म्हणाली, माझी आठवण येते का तुला आदी, का विसरलास मला.
अरे असे का म्हणतेस संयु, मी कसा विसरेन तुला रादर सगळ्यांनाच...
आदी अजून किती दिवस लपवणार आहेस.
काय बोलतेस संयु तू, मी काय लपवले.
आदीत्य का नाही बोललास कधी की तुझे माझ्यावर प्रेम होते ना? मी पण फक्त तुझ्यावर प्रेम करत होते. एकदा विचारायचे होतेस आदी, आनंदाने हो म्हटले असते वेड्या आणि आज आपण एकत्र असतो.
पण तुला कोणी हे सांगितले संयु.?
मला श्रावणीने हे माझे लग्न झाल्यावर सांगितले, आदित्य तिने शपथ नाही मोडली.
पण संयु निखिलचे प्रेम होते तुझ्यावर तो मनापासून प्रेम करत होता. तू ही त्याच्या कविता लाईक करायचीस मला वाटले तुलाही निखिल आवडत असेल.
नाही आदीत्य मी तुझ्यावर प्रेम केले रे. तिचे डोळे भरून आलेले, आदित्यने तिचा हात हातात घेतला म्हणाला, संयु झालं ते झालं आता आपण वेगवेगळ्या वाटेवर उभे आहोत, आयुष्यात पुढे निघून गेलो. आता भुतकाळ आठवून काय करणार. आपलं प्रेम ही एक गोड आठवण आयुष्यभर आपल्यासोबत असेलच. ते सोनेरी क्षण कायम आपल्यासोबत राहतील. आणि आपलं प्रेम होतं एकमेकांवर, ते तसंच जपून ठेवूयात आपल्या मनात, हृदयात.
हो आदीत्य संयु म्हणाली आणि त्यांनी एकमेकांचा निरोप घेतला पुन्हा भेटू, असे म्हणत. तोपर्यंत आजच्या आठवणी असतीलच सोबत....!!!
----- समाप्त-----