रात्रीस खेळ चाले
रात्रीस खेळ चाले
मध्यरात्र उलटून गेली होती, दीपक आणि श्वेता गाढ झोपले होते. दीपक एक गॅरेज चा मालक होता, सांताक्रुज मध्ये जुन्या इम्पोर्टेड गाड्यांचं त्याच्या गॅरेज होतं. पश्चिमेकडच्या उपनगरात त्यावेळेस इम्पोर्टेड गाड्यांचं फार प्रस्थ होतं. अलिशान गाड्या रिपेअर करण्यासाठी दीपक कडे येत असत. दीपक स्वतः ऑटोमोबाईल इंजिनिअर असून त्याची बायको देखील त्याला या कामांमध्ये साथ देत असे. दीपकची दोन्ही मुले सुमित आणि विनीत दिपकला गॅरेजमध्ये मदत करत.
अचानक दरवाज्यावरची बेल वाजली. गॅरेजमध्ये सुमित अजूनही काम करत बसला होता. त्याची नेहमीच सवय होती की काम पूर्ण झाल्याशिवाय झोपायचं नाही. इम्पोर्टेड हेराल्ड गाडीची उद्या डिलिव्हरी द्यायची होती. गाडीचा प्रचंड बॉनेट उघडून त्याच्यामध्ये हात काळे करत सुमित एकाग्रचित्ताने काम चालू होतं. त्यांनी बेलकडे काही लक्ष दिलं नाही. परत एकदा बेल वाजली. आता मात्र विनीत उठला आणि डोळे चोळत बाहेर येत त्यांनी दरवाजा उघडला. तोंडावरती मास्क असलेले चार दांडगे पुरुष अचानक घरात घुसले.
" चल आमच्या बरोबर "
" कुठे कशाला?"
" तिकडे गेल्यावर कळेल"
विनीतला विचार करायला वेळ न देता चौघांनी त्याला उचलले आणि बाहेर उभ्या असलेल्या जीपमध्ये कोंबले. बाजूलाच सुमित काम करत होता, त्याच्या लक्षात हा गैरप्रकार आला आणि तो त्यांच्या मागे हातामध्ये असलेल्या टूलसकट धावला. त्या चार माणसांपैकी एक माणूस खाली उतरला, सुमितवरती बंदूक रोखून त्याने त्याला टूलबॉक्स स्वतःबरोबर घ्यायला लावला, आणि त्यांनी सुमितलापण जीपमध्ये ढकलले. जाताना मात्र त्या चौघांनी आणि घराचा दरवाजा व्यवस्थित लावून घेतला. जीपमध्ये लोटल्या क्षणी सुमित आणि विनीत च्या डोळ्यावरती रुमाल बांधण्यात आला.
कोणीही काहीही बोलत नव्हतं, गाडी बराच वेळ चालत होती, आजूबाजूच्या वासावरून गाडी कुठल्यातरी खाडीच्या दिशेने निघालेली होती. बाजूनी माशांचा आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्याचा वास येत होता. जवळजवळ पाऊण तास गेल्यानंतर गाडी एका ठिकाणी थांबली. सगळे जण खाली उतरले सुमित आणि विनीतला हाताला धरून खाली उतरवण्यात आले. त्यांच्या डोळ्यावरचे रुमाल सोडण्यात आले, समुद्राचा गार वारा अंगावर ती येत होता, आजूबाजूला प्रचंड काळोख होता, त्या आडबाजूच्या रस्त्यावरती दोन अलिशान इम्पोर्टेड गाड्या, बंद पडलेल्या अवस्थेत उभ्या होत्या.
पांढरे कपडे घातलेल्या लाल मोठ कुंकू लावलेल्या, गळ्यात जाडजूड सोन्याची साखळी, जाड अंगठ्या, मनगटा मध्ये सलकडी, असा कोणीतरी एक चिरूट ओढत एका गाडीच्या मागे बसला होता.
" शेठ इन दोनों को लाये है,"
" दो लोगों की क्या जरुरत थी?"
" भाई है, काम जल्दी हो जायेगाI"
" ठीक है जल्दी करो, समजदारी से काम करो, सुभे चार बजे की फेरी निकल ना जाये."
" गाडी आमच्या गॅरेजवरती का नाही आणली? आम्ही तिथे पण दुरुस्त केली असती." विनीत म्हणाला
" मी तर तिथेच काम करत होतो आम्ही रात्रीदेखील काम करतो पण हे असे आम्हाला उचलून का आणलं?" सुमित म्हणाला.
" बाते कम, चलो हा चलो. गाडी का ठीक होना बहुत जरुरी है." त्यांचा पांढरे कपडे घातलेला शेठ म्हणाला.
त्या चार माणसांनी बंद पडलेली गाडी अजूनच आडबाजूला घेतली. दुसऱ्या गाडीच्या हेडलाईट मध्ये काम चालू झाले. विनीत आणि सुमित दोघेही कामाला लागले, तसेच त्यांच्या बरोबर त्या चारीही मंडळींनी कुठलाही गैरप्रकार केला नव्हता. विनीत बॉनेट उघडून इंजिन चेक करू लागला, तर सुमित गाडीच्या खाली जाऊन खाली कुठली वायर लूज झाली आहे का किंवा तुटली आहे का याचा शोध घेऊ लागला. विनीतला रेडिएटरच्या खाली काहीतरी मऊ लागलं. त्याने त्या माणसाला विचारले," तिथे काहीतरी आहे त्याच्यामुळे वायर वरती ताण पडून ती तुटली आहे." चारही लोक शेठकडे बघायला लागले.
"ठीक आहे उसे निकालो मेरे पास लाव." शेठ म्हणाला
कसलेतरी पांढरे पावडरची एक छोटी पिशवी रेडिएटरच्या खाली बेमालूमपणे लपवलेली होती, तसेच पिशवी सुमितला चाकांच्याच्या आजूबाजूला पण दिसली, ब्रेक वायर ताणली जात होती. त्याने निमूटपणे ती पण पिशवी काढून शेठ जवळ दिली. सुमित आणि विनीत ने एकमेकांच्या कडे बघितले, हा काहीतरी बेकायदा ड्रग्सचा धंदा असल्यासारखे त्यांना वाटले. गाडीच्या इंजिन मध्ये बेमालूमपणे लपवलेल्या चार पिशव्या तसेच गाडीच्या खाली प्रत्येक खोबण्या जवळ बेमालूमपणे लपवलेल्या अजून चार पिशव्या अशा विनीत आणि सुमितला दिसल्या. त्यांनी जर तोंड उघडलं असतं तर त्या लोकांनी त्यांना तिथेच गोळ्या घातल्या असत्या.
विनीत आणि सुमित वडिलांच्या तालमीत तयार झाल्यामुळे गाडी अर्ध्या तासातच दुरुस्त झाली. आता शेठ बाहेर आला, आपल्या खिशात हात घालून, येतील तेवढे पैसे त्यांनी काढले आणि विनीतच्या खिशात कोंबले. दुसऱ्या माणसाने ब्रिफकेस उघडून अजून नोटांचे दोन बंडल काढले आणि सुमित् च्या खिशामध्ये कोंबले. आता मात्र विनीत आणि सुमित या दोघांचीही बोबडी वळली. काम नसतं केलं तर ह्या लोकांनी त्यांना खतम पण केलं असतं.
दोघांच्या खांद्यावर हात ठेवून शेठ म्हणाला," हमारे साथ काम करोगे? मालामाल कर देंगे."
" किसी से कुछ मत कहना, नही तो........"
अंधारामध्ये शेठचा चेहरा नीट दिसत नव्हता पण तरी पण त्याच्या बोलण्याचा अंदाज आणि शरीरयष्टी लक्षात येत होती. त्या दोघांनाही परत जीपमध्ये कोंबून हायवेपर्यंत आणून सोडून देण्यात आले. त्या चारही माणसांनी परत परत ताकीद दिली,"मू नही खोलना, हमे तुम्हारा घर भी मालूम है और सब कुछ मालूम है, तोंड उघडलं तर, तो जिंदा नही बचोगे"
फरर् आवाज करत जीप तिथून निघून गेली. सुमित आणि विनीतच्या पायातले त्राणत निघून गेले. रस्त्याच्या कडेला उभा राहून आधी दोघांनी लघुशंका केली, कुठल्या दिशेला जायचं? ते दोघे जण कुठे आहेत त्यांना काही कळेना? हळू हळू चालत जाऊन एका वडाच्या झाडाखाली दोघांनीही बसकण मारली. कुठलं गाव आहे? मुंबईच्या बाहेर आपण किती आलो आहोत, घर उघडे टाकून आले आहेत, आई-वडील कसे असतील? विचाराने दोघांच्या डोक्यामध्ये जणूकाही काहूर माजले.
दोघांनीही उजाडेपर्यंत तिथेच बसण्याचा निर्णय केला. अतिशय दमल्यामुळे आणि झालेल्या प्रकारामुळे सुमितला तर झोप येऊ लागली. झाडाला टेकून दोघांनीही एकेक डुलकी आळीपाळीने काढली. दोन तासानंतर दुरून दोन दिवे त्यांच्या दिशेने येताना दिसले, एक पोलीसची जीप नेहमीच्या राऊंड वरती त्या रस्त्याने येत होती. विनीतला काय वाटले कोणास ठाऊक, धावत जाऊन त्याने पोलीसची गाडी थांबवली. पोलिसांच्या मदतीने दोघेही जण पहाटे घरी आले.
नको नको म्हणत असताना देखील, सुमित ने सर्व माहिती पोलिसांना सांगितली. पोलिसांच्या म्हणण्यानुसार त्या दोघांना या टोळीने वसईजवळ आणलेले होते. पहाटे साडेतीनची एक फेरी वसईहून निघणार होती ती पोलिसांना माहिती होती. सुमित आणि विनीतच्या म्हणण्यानुसार शेठ फेरीतून त्या पांढऱ्या पिशव्या कुठेतरी पोहोचवणार होता. पोलीस यंत्रणा कामाला लागली, तरीपण शेठ तिथून निसटला. पोलिसांनी कितीही प्रयत्न केले तरीही शेठ काही त्यांना मिळाला नाही.
घरी आल्यानंतर विनीत आणि सुमित ने खिशातले पैसे मोजले, दोघांना मिळून जवळ जवळ दोन लाख रुपये त्या रात्री मिळाले होते. दीपक आणि श्वेताने डोक्याला हात लावला, दोन्ही मुलं त्यांचा काहीही अपराध नसताना कुठल्यातरी जाळ्यात अडकणार होती. मध्यंतरी बरेच महिने आणि दिवस गेले. सुमित आणि विनीत यांनी व्यवस्थित जम बसवला.
दीपक आणि श्वेता आता वृद्ध झाले होते, मध्यंतरी मिळालेल्या पैशातून सुमित आणि विनीत यांनी एक मोठा प्लॉट विकत घेऊन आपलं गॅरेज अजून वाढवलं. काही दिवसातच एक तरुण मुलगी एक इम्पोर्टेड गाडी चालवत त्यांचा पत्ता शोधत आली, सुमितला भेटून तिने सर्विसिंग चे काम सांगितले, त्याच्यानंतर तिच्या सारखाच अजून एक मुलगा पण त्यांच्या गॅरेजमध्ये कायम घेऊ लागला. मोठ्या महागड्या इम्पोर्टेड गाड्या दर वेळेला त्या दोघांना जवळ असत. दीपक ने एक नियम घालून दिलेला होता, कुठली गाडी कोणाची गाडी असल्या काही फालतू चौकशा करायचा नाहीत, आपण बरं आपलं काम बरं.
अजून असेच काही दिवस गेले, ती तरुण मुलगी कायमच गॅरेजवर येऊ लागली, कधी कामानिमित्त तर कधी चौकशी करण्यासाठी तर कधी गाडीची सर्विसिंग करण्यासाठी. एक दिवशी ट्रायल साठी म्हणून तिने दीपकला विचारून सुमितला बाहेर काढले, ट्रायलसाठी तिने बराच दूरवर गाडी नेली, तिच्या डोळ्यांत पाणी तरळत होते, अचानक तिने सुमितला विचारले,"त्या रात्री जे शेठ तुम्हाला भेटले होते ते तुम्हाला अजून काही म्हणाले का?"
सुमित गोंधळला, पण त्याने स्वतःला सावरले, त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली.
शेवटी तिच्या आग्रहाखातर सुमित तिला म्हणाला,"ते काहीच म्हणाले नाहीत, कुठेतरी जायच्या घाईमध्ये होते, आणि काम झाल्यानंतर अक्षरशः आम्हाला जीपमध्ये कोंबून रवाना केलं."
बऱ्याच वेळानंतर ती तरुणी सुमितला म्हणाली,"ते माझे डॅडी होते, त्या रात्रीनंतर ते घरी कधीच परत आले नाहीत."
सुमित ने तिला विचारलं,"पण तुला आमचा पत्ता कोणी दिला?"
"त्या रात्री गाडी बंद पडली होती तेव्हा ड्रायव्हरने मला फोन केला होता, तुम्हाला दोघांना जेव्हा ते घेऊन गेले तेव्हा ड्रायव्हरने मला तुमचा पत्ता आणि तुम्हा दोघांचे फोटो मोबाईलवरून पाठवून दिले होते. विश्वासाच्या माणसान व्यतिरिक्त जेव्हा डॅडी इतर कुठल्या माणसाची मदत घेत तेव्हा त्यांचा ड्रायव्हर त्या माणसाचा फोटो आणि त्याचा पत्ता आमच्या घरच्या मोबाईलवरती पाठवून देत. तो दुसरा तरुण मुलगा तुमच्याकडे येतो तो माझा भाऊ. घाबरू नका. आमचे बरेच बिजनेस आहेत ज्याच्यावरती आमचं आणि आमच्या माणसांचं घर चालतं."
"डॅडी आणि त्यांच्याबरोबरचे साथीदार त्या रात्रीनंतर नाहीसे झाले, आम्हाला धड पोलीसांकडे पण जाता येत नाही, म्हणून मी तुमच्याकडे येते, कदाचित त्यांच्या बोलण्यावरून तुम्हाला कळलं असेल की ते सर्वजण कुठे जाणार होते."
एका गुन्हेगाराची मुलगी असून देखील सुमितला तिच्याबद्दल सहानुभूती वाटली, पण त्याच्यानंतर मात्र त्याने तिला निक्षून सांगितले,"तुम्ही उगीच आमच्या गॅरेजवरती येत जाऊ नका तुमच्या माणसं जर आमच्याकडे कधी आली तर मी तुम्हाला नक्की कळवेन पण तुमच्या व्यवहारांमध्ये आम्हाला अडकवू नका."
कुठलाही गुन्हेगार त्याला वाटत असतं आपण आपले पैसे हे सगळे मुलाबाळांसाठी कमवत आहोत, मुलाबाळांना पैशापेक्षा आईवडिलांची गरज असते, असले धोक्याचे धंदे करून अवेळीच मरण झेलण्यापेक्षा आपापल्या मुलाबाळांचं योग्य रीतीने पालनपोषण करण्यात समजदारी नाही का?