नवरात्रीचे प्रश्न
नवरात्रीचे प्रश्न
महिषासुराचा तू अंत केला,
केलास त्याला युग लोटले की !
त्याचीच पिल्ले फोफावताना
का येत आम्हास सामर्थ्य नाही ?
नवनिर्मितीची नवशक्ति अंगी
देऊन लेकींस तू धाडियेले.
गर्भात जेव्हा मिटती कळ्या त्या
का शांत राहून अन्याय साही ?
तू अन्नपूर्णा बनुनी जगाला
देतेस तृप्ती असतेस आई
लाथाडती जे परी अन्न तेव्हा
माजोरड्यांना अभिशाप देई
रंभे परी रूप घेऊन येसी
घरा अंगणांना शोभाच देसी
दु:शासनांची मति भंगता का
डोळे तयांचे फोडीत नाही ?
तू शारदा तूच सरस्वतीही
तुझीच रुपये किती भोवती ही
संधी तयांना नवशिक्षणाची
नाकारता का न संताप होई ?
घरात बाहेर 'ही' कष्ट घेते
शक्ती शिवाचीच बनू पाहते
परंतु भोळा आशुतोष का गं
जागृत का होतं 'त्या'च्यात नाही ?
प्रश्नावली सर्व ऐकून घेता
बोले हसुनी जगताची आई
की, "सांगते नीट ऐकुन घे ग
दोषीच तू ही जी अन्याय साही.
अंशांश माझे तुम्हीच बाळे,
धी धैर्य शक्ती स्थिरबुद्धी युक्ती
यां जागविण्यास येतेच मी ही,
का वेळ येताच निद्रिस्त राही ?
ईर्षा, भय, क्रोध अन् मत्सराला,
अज्ञान, अस्वच्छ तनामनाला
उल्लंघुनी जाय सीमेस आता
मग साजरा रोज दसराच होई!"