स्वप्नात पाहिले मी ........
स्वप्नात पाहिले मी ........
मृणाल दास गुप्ता एक अतिशय प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि प्रॅक्टिस करणारे डॉक्टर. स्वप्न स्वप्नांचा आयुष्यावरती होणारा परिणाम आणि स्वप्नांची उलगड, याच्या वरती त्यांनी केलेले शोधनिबंध अतिशय प्रसिद्ध होते. आधीच्या सगळ्या कल्पना खोडून काढत त्यांनी स्वप्नाला इतिहासाची जोड दिली होती, आयुष्यात होणाऱ्या घटना या पूर्वनियोजित असतात त्याच्यावरती त्यांचा ठाम विश्वास होता.
भेटणारी माणसं, पडणारी स्वप्न, काहीतरी सुचना देत असतात असा त्यांचा दृढ विश्वास होता. पुढे घडणार्या घटनांवर ती प्रकाश टाकणारे अनेक अनुभव त्यांनी आपल्या शोधनिबंधाततून लिहिलेले होते. त्यांची प्रसिद्धी ऐकून नीलम त्यांच्याकडे आली होती.
नीलम एक पंचविशीतलि तरुणी, आयटी इंजिनियर असून सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करत होती. सावळी स्मार्ट नीलम आपल्या कामाच्या बाबतीत फार दक्ष होती. तिचे आई-वडील पुण्याला राहत असून कामानिमित्त नीलम बेंगलोर सिटी मध्ये राहत होती. तिच्या अपार्टमेंटमध्ये तिच्या कंपनीमध्ये काम करणारी दुसरी एक मुलगी राहात असे.
नीलमला काही दिवसापासून एक विचित्र स्वप्न पडत होतं," निळ्या होंडा सिटी गाडीतून उतरणारी एक स्त्री, पाठमोरी, ड्रायव्हरच्या सीटवर बसलेली व्यक्ती एखादा पुरुष असावी, एका अज्ञात चौकांमध्ये रेड सिग्नल पाशी गाडी थांबते, ड्रायव्हरच्या मागे बसलेली स्त्री दार उघडून खाली उतरते. पायामध्ये पांढऱ्या रंगाचे सॅंडल. , अंगावरती सुरेख रेशमी साडी, छोटेसे पोनीटेल, हातात पांढऱ्या रंगाची महागडी पर्स, डोळ्यावरचा काळा गॉगल सावरत स्त्री सिग्नल पाशी उतरून कुठेतरी जाते."
मृणाल च्या मते स्वप्नामध्ये विशेष काहीच नव्हतं, स्त्री कुठेतरी उतरून जात होती कदाचित तिच्या कामाची जागा सिग्नल पाशी असावी किंवा तिला उशीर झालेला असावा म्हणून ती सिग्नल पाशी उतरून आणि रस्ता क्रॉस करून आपल्या ऑफिसमध्ये जात असा असावी.
नीलम मात्र स्वप्नामधली स्त्री बघून फार गडबडून जात असे. तिच्या परिवार यापैकी कोणीच तशी स्त्री नव्हती, तिची आई मावशी, काकू आत्या वहिनी, कोणा सारखीच ती स्त्री नव्हती. नीलम ची आई आणि मावशी तसेच काकू देखील अतिशय सुशिक्षित असून आपापल्या नोकरीमध्ये रमलेल्या होत्या.
हेच स्वप्न नीलम ला जवळ जवळ महिनाभर पडत होतं. ती स्त्री उतरल्यानंतर नीलम ची झोप खाडकन उघडत असे आणि त्यानंतर मात्र ती झोपत नसे. शेवटी डॉक्टरने तिला झोपेसाठी काही औषधे दिली होती पण कशाचाही परिणाम निलम वरती होत नव्हता.
मृणाल दासगुप्ता कडे अचानक आज तिचा पुतण्या समिर दासगुप्ता आला होता, एका विचित्र स्वप्नाने त्याची पण झोप उडवली होती.
समीर एका प्रसिद्ध कायदे तज्ञांच्या कंपनीमध्ये वकील म्हणून काम करत होता. बेंगलोर च्या प्रसिद्ध असलेल्या लॉ कॉलेजमधून शिक्षण घेऊन सिंगापूरच्या यूनिवर्सिटीतलं मास्टर्स डिग्री घेऊन समीर एक उदयोन्मुख कायदे तज्ञ म्हणून काम करत होता. त्याच्याकडे कॉर्पोरेट लॉ असल्यामुळे मोठमोठाल्या कंपन्यांबरोबर त्याचा संबंध येत होता. मृणाल त्याची काकू, मृणाल ची एक मुलगी अमेरिकेत सुस्थितीत असून मृणाल चे यजमान काही दिवसांपूर्वीच कॅन्सर न मृत पावले होते. आपल्या बंगल्यामध्ये मृणाल एकटीच राहत होती, मानसशास्त्राचा अभ्यास असल्यामुळे तिच्या हाताखाली असणारी काही विद्यार्थी मंडळी आणि तिचे क्लाइंट
यांची ये जा तिच्या बंगल्यामध्ये होत असे. ड्रायव्हर, माळी, स्वयंपाकी, आणि वर काम करणारी कमला अशी मंडळी पण मृणाल च्या घरी येत असत.
सगळ्यात योगायोगाची गोष्ट म्हणजे समीरला देखील नीलम सारखीच स्त्री सिग्नल पाशी उतरताना दिसत होती, स्वप्नामध्ये पुढे काहीच नसायचं.
आता मात्र मृणाल चिंतेमध्ये पडली, कारण तिच्या शोधनिबंधामध्ये किंवा मानसशास्त्राच्या इतिहासामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तीला सारखे स्वप्न पडणे अशक्य होते.
प्रोफेशनचा भाग म्हणून नीलम ने आणि समीरने न भेटणे हेच योग्य होते.
अचानक एक दिवस मृणालची बालमैत्रिण संगमित्रा तिच्याकडे आली, संगमित्रा इतिहास संशोधन कार्यालयामध्ये नुकतीच बदलून आलेली होती. इतिहास संशोधन करताना बरीशी ऐतिहासिक पुस्तके किंवा वास्तू, वस्तू याच्यावर तिथे संशोधन असे. जुन्या कागदपत्रांमध्ये त्या वेळेची भाषा, त्यावेळची लिपी याचादेखील उलगडा करण्यासाठी त्यांची टीम कार्यरत होती. संगमित्रा च्या मते पडणारी स्वप्न ही काहीतरी सुचवत असतील, पण स्वप्नामध्ये कुठलीही ऐतिहासिक व्यक्ती नसून सध्याच्या काळातली व्यक्ती आणि साडी नेसलेली म्हणजे एखादी स्त्री होती. तिच्या पोषाखा वरून ती उच्चभ्रु असावी, कुठल्यातरी मोठ्या पदावर ती कार्यरत असावी. पण नुसते सिग्नल पाशी उतरून ती पुढे कुठे जाते याचा मात्र नीलम आणि समीर यांना पण काही बोध होत नव्हता.
नीलम आणि समीरला संगमित्रा वेगवेगळी भेटली, त्यांच्या स्वप्नांमध्ये सिग्नल पाशी अजून कुठली इमारत किंवा अजून कुठली कोणत्या याच यासंबंधी तिने चौकशी केली, पण वाहता रस्ता थांबलेली गाडी निळीहोंडा सिटी याव्यतिरिक्त समीर आणि नीलम पाशी काहीच माहिती नव्हती.
मृणाल दासगुप्ता चे वडील तिच्याकडे येणार होते त्यामुळे तिने या दोन मुलांना आणि संगमित्रा ला घरी जेवणास बोलावले.
मृणाल चे वडील अमर्त्य सेन ज्योतिष जाणत, पत्रिका आणि हात बघण्या मध्ये त्यांना रुची होती, त्यांचा गाढा अभ्यास पण होता.
जेवणाच्या वेळी स्वप्नाची गोष्ट करायची नाही हे ठरवलेले असून देखील काही कारणास्तव अमर्त्य सेन एकदम म्हणाले की काहीतरी होणार असल्याचा संकेत या मुलांना होत आहे. त्यांनी हसून मृणाल आणि संगमित्रा या दोघींना म्हणाले," तुम्ही पण कुठेही सिग्नल पाशी उतरू नका, काहीही झाले तरी. ज्या अर्थी ही दोन मुले तुमच्याकडे आली आहेत त्या अर्थी स्वप्नांचा संबंध तुमच्याशी येत आहे. जरी तुम्हा दोघींची गाडी निळ्या रंगाची नसेल तरीपण कधी लिफ्ट घेताना निळ्या रंगाच्या गाडीत बसू नका. संगमित्रा चा हात बघून अमर्त्य सेन म्हणाले," ऐतिहासिक वास्तू निरीक्षणाच्या वेळेला सावधान राहा. ऐतिहासिक कागदपत्रे तपासताना नेहमी आपल्या टीम बरोबर राहा." त्यांच्या बोलण्याचा अर्थ संगमित्रा ला समजला.
जेवणाच्या वेळेला प्रथमच भेटलेल्या समीर आणि नीलमला तिशय आश्चर्याचा धक्का बसला, त्या दोघांना एकच स्वप्न पडत होतं. हळू हळू दोघांची मैत्री झाली, आवडी-निवडी जुळत चालल्या.
त्या रात्री अचानक नीलम ला स्वप्न पडले, निळ्या होंडा सिटी तून उतरलेली स्त्री सिग्नल पाशी डीवाईडर वरती उभी होती, आणि अचानक मागून येणाऱ्या ब्रेक तुटलेल्या ट्रकने................
तोंडातून एक किंकाळी फोडून नीलम जागी झाली. तिने ताबडतोब समीरला फोन केला, त्याला पण तसेच स्वप्न पडले होते. त्या दोघांनीही दुसऱ्या दिवशी मृणाल कडे जायचे ठरवले.
मृणाल आपल्या बंगल्याच्या बाहेरच उभी होती, तिला कुठल्या तरी कॉन्फरन्स मध्ये जायचे होते, दोघेही मुले घाईघाईने तिच्यापाशी आली," मॅडम स्वप्नाचा पुढचा भाग पण दिसला."
" अरे आत्ता मला फार घाई आहे, कॉन्फरन्स ची वेळ होत आली आहे आणि अचानक गाडी बंद पडली, ड्रायव्हर गॅरेज मध्ये गेला आहे, तो जर नाही आला तर मला टॅक्सी करून जावं लागेल, आपण आल्यावर बोलू." मृणाल म्हणाली.
समीर ने परत परत तिला आग्रह केला की तिने त्यांचे स्वप्न ऐकावे, पण मृणाल आपलेच काळजीत होती. तेवढ्यात संगमित्रI आपली गाडी घेऊन आली. अर्थात गाडी ड्रायव्हर चालवत होता. मृणाल आणि मुलांना रस्त्यावरती बघून ती गाडी खाली उतरली.
उशीर होतो म्हणून मृणालने टॅक्सी बुक केली.
समोर एक निळ्या रंगाची होंडा सिटी आली, मुलांच्या विनंतीला मान न देता मृणाल टॅक्सीत बसली आणि निघाली.
तिच्या मागोमाग समीरने आपली मोटर सायकल स्टार्ट केली आणि नीलमला मागे बसायला सांगितले, ते दोघे पण मृणालच्या मागे निघाले.
स्वप्नात घडत होतं तसेच दृश्य समोर दिसायला लागले. उशीर झाला म्हणून मृणाल सिग्नलपाशी उतरली, रस्त्यावरचे डिव्हायडर वरती ती उभी राहिली, नीलम ने तिला फोन करायचा प्रयत्न केला, फोन वाजू लागला म्हणून मृणालने पर्स उघडली, तेवढ्यात सिग्नल सुरु झाला, आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने येणारा ट्रक ब्रेक तुटून सिग्नलच्या खांबावर ती आदळला, वेडावाकडा होत तिथे उभे असणाऱ्या सर्व माणसांना चिरडत तो पुढे निघून गेला.
नीलम आणि समीर एकमेकांना घट्ट धरून उभे राहिले, त्यांचा आ वासलेला होता, घडणाऱ्या घटनांची त्यांना सूचना मिळत होती, ते दोघे जण मृणालला सांगत पण होते पण घटनेमध्ये होणारी दुर्घटना मृणाल बरोबर होणार याची कोणालाच कल्पना नव्हती.
अमर्त्य सेन यांनी त्या दिवशी संगमित्राचा हात बघितला पण स्वतःच्या मुलीचा हात बघितला नाही हादेखील एक योगायोगच. अमर्त्य सेन ला माहिती असेल का की आपल्या मुलीचा अपघाती मृत्यू लिहिला आहे? त्याच सुमारास कधी न येणारे वृद्ध अमर्त्य सेन मृणाल कडे का बर आले होते? त्यांनी पण तर धोक्याची घंटा आणि सूचना मृणाल ला दिली होती. मानसशास्त्रज्ञ असून देखील मृणालला का भुरळ पडली ? मुलांना पडलेले उरलेले स्वप्न न ऐकता जाण्याचा धोका तिने का बर पत्करला? का योगायोग असाच होता? सगळं अनाकलनीय आणि गुढ आहे, भविष्याच्या पोटात काय दडले आहे कोणालाच सांगता येणार नाही. पण मात्र सूचना मिळत असेल तर सावध रहा.