सतर्कता काळाची गरज
सतर्कता काळाची गरज
*ठिकाण :- दुर्गा मातेचे मंदिर*
*पात्र :- दुर्गामाता आणि वंदू* (
(वंदू दुर्गा मातेच्या मंदिरात दर्शनासाठी गेली आहे. दुर्गा मातेची आरती करून देवीचा आशीर्वाद घेत आहे.)
*वंदू :-* आई तुझी कृपा अशीच आम्हावर राहु दे.
*दुर्गामाता:-* तथास्तु.....
*वंदू :-* अरे ? हा कोणाचा आवाज आला?
(वंदू कावरीबावरी होऊन इकडे तिकडे पाहते.)
*दुर्गामाता :-* बाळा... मी आहे... तुझ्या समोर उभी. बघ ईकडे.
*वंदू :-* आई ! जगतजननी ! धन्य माझे भाग्य ....मला तुझे दर्शन मिळाले. माझे जीवन सार्थक झाले!
*दुर्गामाता :-* हो बाळा. आज तुमची श्रद्धा, तुमची भक्ती पाहून मला आनंद झाला. तुम्ही मनापासून केलेली भक्ती, तुमच्या भावना खरच माझ्यापर्यंत पोहोचल्या.
*वंदू :-* माता माझ्या भक्तीचा स्वीकार कर. आई, मला तुझा आशिर्वाद दे.
*दुर्गामाता :-* या सृष्टीवर, प्रत्येक जीवावर, सदैव माझे आशीर्वाद आहेत. जो सद्भावनेने वागतो, सुख-समृद्धी नेहमी त्याच्या घरात नांदेल. जो प्रेमाने वागेल, त्याला ही भरभरून प्रेम मिळेल.
*वंदू :-* माता, माझी, धरतीवरच्या जीवसृष्टीची भक्ती कुठे कमी पडली ? आज या कोरोना मुळे लाखो बळी गेलेत. महामारी ने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. आई आमचे काही चुकले का ग ? चुकल्यास क्षमा कर,पण आम्हाला या विळख्यातून सोडव.
*दुर्गामाता :-* धीर धर बाळा... दुःखाच्या काळोखा नंतरची येणारी पहाट नेहमी नव चैतन्य आणि आनंद घेऊन येते. हे दिवसही जातील. नव्याने दिवस येतील. हे जे घडत आहे ही मानवाचीच करणी आहे.
*वंदू :-* मानवाची करणी ? आई यातून मार्ग दाखव. आम्हाला तुझी गरज आहे.
*दुर्गामाता :-* मी पाहात आहे. मानवाने स्वतःची चूक स्वीकारली आहे. मला आशा आहे, भविष्यात तो असा वागणार नाही. सतर्क राहणे हे मानवाचे प्रथम कर्तव्य आहे. हलगर्जीपणा, असंस्कारीपणा हे मानवाचे शत्रू आहेत. यापासून दूर राहिल्यास मानव समस्यांच्या विळख्यात गुंतणार नाही.
*वंदू :-* हो माता... धन्य तुझी वाणी. मि वचन देते, इथून पुढे अविचारी पणे वागणार नाही.
*दुर्गामाता :-* मोह, क्रोध, लोभ, ईर्षा, हिंसा हे सर्व मानवाचे शत्रू आहेत. यापासून मुक्ती मिळविल्यास मानव एका समृद्ध जीवनाकडे वाटचाल करेल.
*वंदू :-* जय हो माता ! तुझी कृपा अशीच आम्हावर राहु दे.
*दुर्गामाता :-* मानव कल्याणासाठी भल्या माणसांनी नियमांची चौकट तयार केली आहे. त्या नियमांचे पालन करणे हे तुम्हा सर्वांचे प्रथम कर्तव्य आहे.
*वंदू :-* आई चुकले आमचे. आमच्या डोळ्यांवर मनमौजी होऊन वागण्याची काळी पट्टी झाकलेली होती. नियम पाळणे किती गरजेचे आहे, हे आजवर समजलेच नाही. इथून पुढे नक्कीच काळजी घेऊ.
*दुर्गामाता :-* पूर्वापार चालत आलेले संस्कार विसरून असंस्कारी जीवनाकडची वाटचाल थांबवा. मुलांना संस्काराचे महत्त्व शिकवा. मुले ही भविष्याची नवीन पिढी आहे. या पिढीला चुकीच्या मार्गावर ढकलू नका. त्यांच्यात आत्मविश्वास जागृत करा. तेव्हाच या पृथ्वीतलावर एक चांगला बदल घडून येईल, जो सर्व मानव जातीला कल्याणाकडे, समृद्धीकडे घेऊन जाईल.
*वंदू:-* आई मुलांना संस्कार लावणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे, पण मुले फारच भरकटत चालली आहे. या आधुनिक युगात यांच्या एका बोटावर जग आले आहे. मुलं पालकांच्याही पुढे गेली आहे. हे सर्व खूप खेदजनक आहे.
*दुर्गामाता :-* बरोबर आहे. पण काही गोष्टी फक्त आईवडिलांच्याच हातात असतात. तुम्ही तुमच्या मुलांना संस्कार देऊ शकता. हीच तर खरी आई-वडिलांची परीक्षा आहे.
*वंदू :-* माता, तुझे शब्द मी आशीर्वाद समजून माझ्या मनात रुजवून ठेवते. आम्हा सर्वांवर तुझी अशीच कृपा असू दे. जय दुर्गा माता!
*(आणि दुर्गा माता परत पूर्ववत मूर्तीत रूपांतर झाली)*
*(आज मानवच मानवाचा शत्रू झाला आहे. मानवाच्या अविचारी वागण्याने मानवानेच मानवाला समस्यांच्या गुंत्यात अडकविले आहे. आपण सर्वांनी एक मताने सतर्क राहूनच यावर तोडगा काढू शकतो. त्यासाठी एक मताने नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.)*