संत गाडगे बाबा समाज सुधारक
संत गाडगे बाबा समाज सुधारक
"जत्रा मे फत्रा बिठाया
तीरथ बनाया पानी
दुनिया भाई दिवानी
पैसे की धुलधानी"
असा गाडगेबाबांनी कुठेतरी संदेश दिला आणि तो लोकांना पटला देखील, आपल्याकडे तेहतीस कोटी देव आहेत पण ते सोडता, कुठेही एक दगड मांडला, त्याला शेंदूर फासला कुठेतरी दृष्टांत झाला, म्हणून सांगितलं ,की झाले! लोकांची रीघ लागते.
कारण या कलियुगात, सगळेच लोक कुठल्या ना कुठल्या प्रश्नाने ग्रासलेले असतात. मग अगदी अकरा रुपये, 21 रुपये ठेवले, एखादा हार नेला ,एखादा नारळ नेला, तर एवढ्या स्वस्तात जर आपल्या एखाद्या प्रश्नाला पर्याय मिळत असेल, उत्तर सापडत असेल, तर लोक का नाही जाणार?
शिवाय लोकं अनुकरण प्रिय असतात, आणि अशा प्रकारांची माऊथ टू माऊथ पब्लिसिटी करणारी त्या लोकांचीच माणसे पेरलेली असतात.
अशावेळी , डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा ,वरील शेर आहे. बाबांनी लोकांना स्वच्छतेचे महत्व शिकवले, जे इतर दीनदलित, दुबळे, समाजापासून दूर असणारे. छोट्या-मोठ्या रोगराई साठी म्हसोबा, मुंजाबा, वेतोबा ,अशा देवांना पुजणारे , आणि भगता कडे जाणारे ,अशा मंडळींना त्यांनी स्वच्छतेचा मंत्र दिला.
जर तुम्ही स्वच्छता राखाल तर तुमचे आरोग्य चांगले राहील, हा त्यातून एक छुपा संदेश होता.
बाबा सामाजिक सुधारणेवर कीर्तन करायचे.
"गोपाला गोपाला!
देवकीनंदन गोपाला"
हा त्यांचा परवलीचा शब्द होता.
गाडगे महाराजांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. त्यांच्या वडिलांचे नाव - झिंगराजी राणोजी जाणोरकर, तर आईचे नाव - सखुबाई झिंगराजी जणोरकर हे होते
. गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेमध्ये आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करणारे होते. त्यांच कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे. आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा रूढी परंपरा यावर ते टीका करत. समाजाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना स्वच्छता आणि चारित्र्य याची शिकवण गाडगेबाबा देत.
गाडगे महाराज हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी कार्य करणारे समाजसुधारक होते.
" तीर्थी धोंडापाणी
देव रोकडा सज्जनी |"
असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. " सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशांतून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत.
डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे.
त्यांना कोणी आमचे गुरु हा असे सांगायला गेले किंवा पाया पडायला गेले तर बाबा त्याच्या डोक्यात खराट्याने मारत असत
समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत.