संजीवन समाधी
संजीवन समाधी
स्व अनुभव - साधारण पाच-सहा वर्षापूर्वी मी आळंदीला गेले होते ,तत्पुर्वी अनेक संतांच्या समाधीचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले होते. परंतु ज्या वेळी प्रत्यक्ष आळंदीला ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी वरती मस्तक टेकवले, आणि खरं सांगते त्या चैतन्याचा मला अनुभव आला .
इथं काहीतरी शुभ उर्जा, चैतन्य वावरत आहे, असे जाणवले . परमेश्वर कृपेने, मीन रास असल्यामुळे, थोडासा अतिंद्रिय शक्तीचा वास माझ्या ठाई आहे. आणि बऱ्याच वेळा मी त्याचा अनुभव देखील घेतलेला आहे.
संजीवन समाधी आणि जिवंत समाधी यातील फरक
जिवंत समाधी घेणारे संत-महात्मे देखील तितकेच आदरणीय आहेत, परंतु संजीवन समाधी एकमेवद्वितीय ज्ञानेश्वर माऊलीनीच घेतलेली आहे. जिवंत समाधी घेताना काही तासानी दिवसांनी, अखेर तो देह मरण पावतो. परंतु ज्ञानेश्वर माउलींची समाधी म्हणजे ते वर्षानुवर्षे शतकानुशतके त्यामध्ये जिवंत आहेत. संजीवन म्हणजे जीवना सहित ज्याच्या मध्ये जीवन आहे जीवनाचा धरा आहे अशी ती समाधी.
ज्ञानदेवांचे गुरु निवृत्तीनाथ, आणि निवृत्तीनाथांचे गुरू गहिनीनाथ, त्यामुळे ही चारही भावंडे नाथपंथीय होती. आणि त्यांनी समाधी घेतली आहे ती देखील नाथपंथी पद्धतीनेच घेतलेली आहे.
संत नामदेवांच्या अभंगात नामदेव गाथेमध्ये श्री ज्ञानदेव समाधी महिमा नावाचे एक स्वतंत्र प्रकरण आहे.
त्यामध्ये पांडुरंग सोपान देवाच्या समाधीच्या वेळी असे म्हणतात की, तुमच्या समाधीसाठी ज्ञानेश्वर देखील दिव्य देहाने येथे आमच्या प्रमाणे येईल. याचाच अर्थ ज्ञानेश्वर चिरंजीव आहेत, दिव्य देहाने तेथे वास करत आहेत, असे पांडुरंगाने सांगितले आहे.
ज्ञानेश्वर माऊलीच्या समाधीची सिद्धता स्वतः पांडुरंग आणि नामदेव यांनी केलेली आहे. भगवंताच्या आज्ञेने सिद्धेश्वर मंदिरा समोरील नंदी हलवला असता, आत मध्ये विवर होते आणि असा उल्लेख आहे की, तेथे ज्ञानदेवांनी आतापर्यंत 108 वेळा समाधी घेतली असून ,ही त्यांची एकशे नववी वेळ होती.
तेथूनच ते पुन्हापुन्हा दरवेळी अवतार देखील घेत होते. प्रत्यक्ष श्रीकृष्णाचा अवतार संत ज्ञानदेव होत.
आदल्यादिवशी कार्तिक द्वादशीला, स्वतः पांडुरंगानी दिव्य अन्न तयार करून, ते ज्ञानदेवांना भरवले.
त्यामुळे माऊलीचे शरीर अमृतमय झाले, आणि कार्तिक कृष्ण त्रयोदशीला सिद्धेश्वर मंदिरासमोरील नंदी बाजूला करून, आधी नामदेवाच्या मुलांनी तेथे सिद्धता केली होती. साफसफाई करून मृगाजिन घातले होते . ज्ञानेश्वरांना हाताला धरून प्रत्यक्ष पांडुरंगाने आणि नामदेवांनी त्या विवरामध्ये नेले.
तिथे त्यांनी आपल्या गुदा ला टाच लावून, भीम मुद्रा लावली आणि ते संजीवन समाधी मध्ये गेले.
ज्याप्रमाणे प्रलयाच्या वेळी पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हि पंचतत्वे एकमेकात विलीन होतात, त्याच प्रमाणे माऊलींनी संजीवन समाधी घेतली.
प्रथम पृथ्वी तत्वाचा जलात, जलतत्वाचा अग्नीत, अग्नी तत्वाचा वायूत आणि वायूचा आकाशात विलय झाला. आकाशाचा कशाशी लय होत नसल्यामुळे, ते देवी भगवतीच्या चिदा आकाशाशी तादात्म्य पावले.
आणि हे सर्व संतांनी डोळ्यांनी पाहिले, प्रथम माऊलीचा स्थूलदेह अदृश्य झाला, त्या जागी तेजोमय मूर्ती दिसू लागली. त्यानंतर ते तेजही दिसेनासे झाले, केवळ नादरूपात राहिले, आणि तो नादही नंतर आकाशात सामावून गेला .. म्हणून संत-महात्मे आळंदीला नित्य तीर्थ म्हणतात. त्या समाधीला कालाचा स्पर्श नाही. त्यामुळे साडेसातशे वर्षांपूर्वी ठेवलेली फुले, तेथे आजही ताजी आहेत. आणि ठेवलेले पंचखाद्य तसेच्या तसे आहे.
आता हे आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला कसे समजेल ? त्यासाठी तेथे स्थुल देहाने जाऊन फायदा नाही.
माऊलीच्या विवरात उतरण्याचे भाग्य काही मोजक्याच संत मंडळींना मिळाले, आश्चर्य म्हणजे वेगवेगळ्या काळात उतरलेल्या मंडळींनी केलेले वर्णन, सारखेच आहे. समाधी सोहळ्याच्या वेळी संत जनाबाई हजर नव्हत्या, त्या नंतर आल्या, त्यांचे माऊली वर पुत्रवत प्रेम होते. त्यामुळे त्यांना दिव्य दृष्टी देऊन संपूर्ण समाधी सोहळा ज्ञानदेवांनी दाखवला .
त्यानंतर तीनशे वर्षांनी आजानं वृक्षाची मुळी आपल्या गळ्याला काचते आहे, म्हणून ज्ञानदेवांनी एकनाथांच्या स्वप्नात जाऊन सांगितले ,ही आख्यायिका तर सर्वश्रुत आहेच. त्यानुसार तीनशे वर्षांनी संत एकनाथ अजान वृक्षाची मुळी कापण्यासाठी आत उतरले असता, त्यांनी देखील आतील वर्णन तसेच केलेले आहे.
त्यानंतर दोनशे वर्षांपूर्वी श्री चिदंबर स्वामींच्या शिष्या संत विठाबाई महाराजांना हे भाग्य लाभले. त्यांनी ज्ञानदेव विजय मध्ये रचलेल्या अभंग ओळी आपणास तेथील दृश्याचा अनुभव देतात
ज्ञानेश्वराची समाधी स्थिती
पुनश्च येणे देहावरती
याची घेतली प्रचिती
त्रिशतकोत्तर नाथांनी
पूर्वजांनी जया पाहिले
तया नाथांनी ही पाहिले
आजही तसेच संचले
समाधीत ज्ञानेश्वर