रम्य ते बालपण...
रम्य ते बालपण...
आजही आठवतो बालपणीचा तो सुखाचा काळ...आईने काऊ चिऊच्या गोष्टी सांगत प्रेमाने भरवलेला घास...तिच्या हातचा वरणभात.
आईचा हात धरून रडत रडत केलेला बालवाडी मधील प्रवेश, अ आ इ ई ने केलेला अभ्यासाचा श्रीगणेशा, नव्या कोऱ्या पुस्तकांचा गंध, पाटीपेन्सिल, खडू, फळा, दप्तर, खाऊचा डब्बा, घरचा अभ्यास, कट्टी बट्टी.
भातुकलीचा खेळ, बाहुला बाहुलीचे लग्न, एवढेच काय तर लपंडाव, जोडसाखळी, टिकरीपाणी, विटीदांडू यासारखे खेळ...भाड्याने आणून चालवलेली सायकल...दोन बॅडमिंटनच्या रॅकेट...खेळायला आठ ते दहा जण...मेरा नंबर कब आयेगा म्हणत पाहिलेली वाट... कुकरच्या किंवा सायकलचा जुना टायर घेऊन गावभर फिरणे.
कट्टीबट्टी, रुसवेफुगवे, व्हीसीआर भाड्याने आणून एकाच दिवशी पाहिलेले ते चार चार पिक्चर, भुकेची जाणीव होताच घराची झालेली आठवण...सुट्टी लागताच मामाच्या गावी जायची ओढ ...दिवाळीच्या सुट्टीतील घरचा अभ्यास अपूर्ण म्हणून शाळेत खाल्लेला माराच्या दुःखापेक्षा...आपल्या बरोबरच अजून बऱ्याच जणांना झालेल्या शिक्षेचा आनंद...
अजूनही बरच काही...शब्दात न मांडता येण्यासारखं आणखीही बरंच काही... हातातून निसटून गेलेले सोनेरी क्षण, आपलं बालपण...जीवनाच्या ह्या टप्प्यावर मागे वळून पाहताना प्रकर्षाने जाणवतय गेले ते अविस्मरणीय दिवस...राहिल्या फक्त आठवणी.
खरंच स्वप्नात का होईना परत बालपण अनुभवावे ...
आईच्या कुशीत पुन्हा एकदा विसवावे..