रेवती
रेवती
रेवतीचे लग्न होऊन सहाच महिने झाले होते. रेवतीची ख्याली खुशाली विचारायला रोज फोन यायचा सुमनताईंचा... तिच्या आईचा. आपली लेक खुश आहे ना सासरी... तिला कसला जाच होत नाहीये ना... याची काळजी असायची सुमनताईंना.
आज त्या दोघी फोनवर बोलतच होत्या तेवढ्यात रेवतीच्या सासूबाईंची हाक आली, “अगं रेवती, येते आहेस ना पोळ्या करायला? अमोलच्या ऑफिसची वेळ होत आली."
सुमनताई ऐकतच होत्या सारे. लगेच रागाने त्या रेवतीला म्हणाल्या, “काय गं? तू का करायच्या पोळ्या? स्वैपाकाच्या मावशी कुठं आहेत? का सून आल्यावर काढली लगेच बाई?"
आईला थोपवत रेवती म्हणाली, "असे काही नाहीये आई. मावशींना बरे नसल्याने आज रजेवर आहेत त्या."
"मग एक दिवस तुझ्या सासूला पोळ्या करायला काय होतं? सून आली घरात की लगेच यांचा आराम सुरु." रेवतीच्या आईचा अगदी संताप झाला होता.
"आई, असं काही नाहीये. काल लाडवाचा पाक करताना त्यांच्या हाताला चुकून भाजलेय. लाटणं हातात धरायलाही त्रास होतोय त्यांना. म्हणून मीच त्यांना म्हटलंय मी पोळ्या करते म्हणून. आणि ऐक इथली परिस्थिती तुला काय माहित असणार गं... आमच्या घरचे प्रश्न आम्ही दोघी मिळून सोडवू ना. तू नको काळजी करू."
रेवतीला यायला उशीर का होतोय हे पाहायला आलेल्या रेवतीच्या सासूबाईंच्या कानावर वरचा संवाद आला आणि आपले घर नेहमी हसते खेळते राहील या समाधानाने त्या मागे वळल्या.