Savita Jadhav

Romance

3  

Savita Jadhav

Romance

प्रीती तुझी माझी

प्रीती तुझी माझी

5 mins
677


छोटसं खेडेगाव. गावाबाहेर खळखळ वाहणारी नदी,हिरवीगार शेती, गुरंढोरं,गावाकडची गावरान माणसं. त्याच गावात रहात होते साहिल आणि शुभ्रा. साहिल ९६कुळी मराठा तर शुभ्रा मागासवर्गीय समाजात मोडणारी, मध्यम वर्गीय घरातील मुलगी. दोघेही शेजारी शेजारी रहायला होते. घरचे संबंध पण अगदीच जवळचे होते. साहिलच्या घरी आईबाबा, दादा, वहिनी असा परिवार.तर शुभ्रा च्या घरी आईबाबा ,आजी,शुभ्रा नि तिचा दादा.शुभ्रा चे बाबा शेती करायचे. आई प्रेमळ होती आजी जुन्या चालीरीती सांभाळणारी. साहिलचे बाबा एका जीपवर ड्रायव्हर होते. साहिलच्या आईबाबा ना मुलीची खूपच हौस होती.ते दोघेही शुभ्रा चा खूपच लाड कौतुक करायचे.सणासुदीला आवर्जून तिला घरी घेऊन जायच्या.


शुभ्रा नि साहिल एकत्रच लहानाचे मोठे होत होते. साहिल एक वर्ष मोठा होता तिच्या पेक्षा. शुभ्रा वयात येऊ लागली तसं तिचं रूप आणखी खुलून यायला लागलं होतं.

बघणारे बघतच रहायचे तिच्याकडे. तिचे बाबा स्वभावाने खूप कडक होते.शुभ्रा चे खूप लाड करायचे पण बंधने खुप घातली. रस्त्यावर जाताना मान वर करुन बघायचे नाही.फिदीफिदी हसायचं नाही. कोणत्याही मुलाशी बोलायचं नाही. अशी बरीच बंधने तिच्या वर लादली. शुभ्रा पण त्यांच्या म्हणण्यानुसार वागायची...तिच्या वर लादलेल्या बंधनामुळे तिच साहिलशी बोलणेपण कमी झाले होते. दोघांनाही उणीव जाणवत होती. काहीतरी चुकल्यासारखे वाटत होते. काय ते मात्र समजत नव्हतं. एकमेकांना बघण्याचा आटापिटा चालू असायचा. एकदा गौरी गणपती चा सण होता. साहिल घरी आला.

"ए शुभ्रा, तुला आईने बोलावले आहे."

"कशाला"

"अगं गौराईच्या पुढती रांगोळी घालायची आहे, आई म्हणतेय शुभ्रा खुप छान रांगोळी घालते."

शुभ्रा साहिलच्या घरी गेली. छान रांगोळी घालत होती.अचानक तिची नजर साहिलकडे गेली. तो कॉटवर पुस्तक तोंडासमोर धरून एकटक शुभ्रा कडे पाहत होता.शुभ्रा ला अगदी कसंसच झाले. तिनं रांगोळी आवरलीआणि काकूच्या शेजारी जाऊन बसली.काकू पोळ्या करत होत्या.

"काकू, मला पण द्या ना पोळ्या करायला."

"नको गं बाळा,तू बस इकडे,मी करते"

"काकू करते न मी,जमतय मला."

"बरं बाई, तू थोडीच ऐकणार आहेस?"

शुभ्रा पोळी करणार म्हणलं की साहिल लगेचच शेजारी येऊन बसला."शुभ्रा, नकाशे करु नकोस बरं का?मला खायची आहे पोळी."

शुभ्रा लाडक्या स्वरातच म्हणाली,"काकू बघा ना कसा बोलतोय?"

काकू,"गप रे तिला चिडवू नको उगीच"

शुभ्रा ने खरचं खूपच छान पोळी केली काकूंना कौतुक वाटले.आणि साहिलला पण.

"खरचं गं शुभ्रा, छान पोळी करतेय, रोज येत जा करायला"साहिल बोलला. तशी ती लाजल्यासारखी झाली.


एकदा शुभ्रा खूपच आजारी पडली. अँडमिट केले दवाखान्यात. घरी आणल्यावर काकू येऊन भेटून गेल्या. "फारच सुकलय गं लेकरू.काळजी घे आता"

पण नेमके त्या वेळी शेतातील कामंआली.आईबाबा ना जाणे गरजेचे होते.आजी थकली होती.शुभ्रा कडे कोण लक्ष देणार. इतक्यात साहिलच्या आईने सांगितले, अहो साहिल आहे ना तो थांबेल की,साहिलवर जबाबदारी दिली. साहिल दोन तीन दिवस लागोपाठ शुभ्रा च्या घरी येत होता .तिची काळजी घेत होता. औषध वेळेवर देत होता.याच काळात दोघेही कधी एकमेकांच्या जवळ आली कळलच नाही. एक ओढ निर्माण झाली होती. काही काळानंतर शुभ्रा च्या बाबांनी शेतात घर बांधले आणि शेतावर रहायला गेले. या दोघांच्या भेटी कमी झाल्याने एकमेकाबद्दल ओढ आणखी वाढली. शाळेसाठी गावात यायची तेव्हाच काय ती नजरानजर व्हायची.


साहिल कॉलेजला जायला लागला तशी त्याची राहण्याची, वागण्याची पध्दत बदलली. खूपच हँडसम दिसू लागला होता.आणि शुभ्रा देखील दिवसेंदिवस आणखीन सुंदर दिसू लागली होती. दोघेही एकमेकांच्या प्रेमात गुंतून गेले होते. बारावीनंतर साहिल कामासाठी मामाकडे गेला. मामाचे मोठे कापड दुकान होते.तिथे तो काम करू लागला. पण इकडे शुभ्रा ला त्याची आठवण स्वस्थ बसु देत नव्हती. तिने साहिलच्या मित्राकडून त्याचा मोबाईल नंबर मिळवला आणि फोन केला.


"साहिल..."

"कोण?शुभ्रा, कशी आहेस गं"

"खूप आठवण येते रे तुझी,कधी येशील भेटायला."

"येईल लवकरच,नक्की"

"बघ हं, नाही आला तर मी अन्न पाणी सोडून देईल."

"ए वेडाबाई,असं काही करु नकोस.

माझ्या साठी स्वतः ची काळजी घे,घेशील ना?"

"हो,पण तू लवकर ये.मी वाट पाहिल तुझी."

साहिलशी बोलल्यानंतर शुभ्रा ला थोडे का होईना बरं वाटलं होते. फोनवर बोलून झाल्यावर एक आठवड्यात साहिल गावी आला. आला तो डायरेक्ट कॉलेजवरच गेला. साहिल ला अचानक पाहून काय करावे ते तिला समजेना.


"अगं अशी काय बघतेस,खरच आलोय मी, चल बैस गाडीवर." क्षणाचाही विलंब न करता,कोणताही विचार न करता ती गाडीवर बसली. दोघेही एका घाटातून निघाले होते. खूश होती दोघेही. हो त्यांच्या प्रेममयी प्रवासाची पहिलीच भेट होती. लोकांचा, समाजाचा विचार बाजूला ठेऊन दोन्ही प्रेमी जीव एकत्र येऊ पाहत होते.

 एका ठिकाणी गाडी उभी केली . अर्ध्या रस्त्यावर एका झाडाखाली सावलीत बसले.एकटक एकमेकांना बघत होते. आकंठ बुडून गेले एकमेकांना बघण्यात.खूप गप्पा मारल्या. रुसवे फुगवे झाले. इतक्यात... जोराची वीज कडाडली.पाऊस यायच्या बेतातच होता.बघता बघता पाऊस सुरु झाला. दोघेही भिजून चिंब झाली. शुभ्रा थंडीने कुडकुडत होती.वाराही जोरात सुटला होता. गारवा खूपच होता. शुभ्राला असं कुडकुडत असलेले बघून साहिलला काय करावे सुचेना. एकतर तो तिला खूप दूर घेऊन आला होता. ओलेचिंब अंग, चेहऱ्यावरील केसांच्या बटा, पावसाचे ओघळणारे थेंब, शुभ्राचे सौंदर्य अजूनच खूलून दिसत होते. 

पण दोघांना आपापली मर्यादा माहिती होती. चांगले संस्कार होते दोघांना पण. एकमेकांना सावरत ते घरी जायला निघाले.

घरी पोचला तेव्हा साहिलचा चेहरामोहरा बदलून गेला होता. एक वेगळीच चमक, वेगळाच आनंद त्याच्या चेहऱ्यावर होता, हे काही त्याच्या वहिनीच्या नजरेतुन सुटले नाही.


"काय बाई, ......आज कुणीतरी खूपच खूश दिसतय,

.......भेट झालेली दिसतेय प्रिय व्यक्ती सोबत,"

"हो वहिनी मी आज शुभ्रा ला भेटून आलो. वहिनी आम्हाला लग्न करायचं आहे."

वहिनी आणि दादाला हे प्रकरण माहिती होती. साहिलच्या बाबांनी पण होकार दिला होता या नात्याला.आणि शुभ्रा च्या बाबाशी बोलण्याणा निर्णय घेतला.पण त्याआधीच शुभ्रा च्या बाबाना कुणीतरी तेलमीठ लावून काय सांगितले कुणाला ठाऊक....

भलतेच संतापले होते.

"अगं कारटे,एवढी माया केली. हवं नको ते दिले, हे असे उद्योग करायला का?गावात तोंड दाखवायला जागा उरणार नाही." खूपच चिडले शुभ्रा वर.

ती बिचारी काही करू शकत नव्हती.नुसती रडत होती.साहिलच्या बाबांना समजले की ते लगेचच आले शुभ्रा च्या बाबांना भेटायला.

त्यांनी समजावून सांगितले.

"हे बघ मित्रा,आपली मुले समजूतदार आहेत.एकमेकांना खूपच प्रेम करतात. आणि तसही त्यांना लग्न करायचं तर पळुन जाऊन केलं असते की?पण आपली सहमती त्यांना तितकेच महत्त्वाचे वाटते.दुसरीकडं लग्न लावून कुणीही सुखी होणार नाही.

राहिला प्रश्न समाजाचा, जातिभेदचा,तर त्याची काळजी तू करू नको,या गोष्टी चा सामना तुला नाही मला करावा लागेल. कारण शुभ्रा सून म्हणून माझ्या घरी येणार आहे. त्यामुळे कुणाला काय उत्तर द्यायचे ते मी माझे पाहून घेईल.लग्नाला होकार दे,मुलं सुखी होतील,"

"मला थोडा वेळ हवाय",शुभ्रा चे बाबा

"तुला हवा तेवढा वेळ घे."

शुभ्राच्या बाबांनी खूप विचार केला.

लहापणापासून लाडाकोडात वाढलेली पोर.तिच्या मनाविरुद्ध लग्न केले तर ती सुखी कशी होईल. आणि साहिल सोबत लग्न करून ती गावातच,डोळ्यासमोर राहिल.साहिलच्या घरचे पण चांगले आहेत. पोरीला खूप जीव लावतात. ते तडकाफडकी साहिलच्या घरी गेले आणि लगेचच लग्नासाठी तारीख पक्की केली.एका आठवड्यात रजिस्टर पद्धतीने लग्न पार पाडले. आता साहिल आणि शुभ्रा दोघेही सुखाने संसार करत आहेत.


झाले एकरूप दोन्ही प्रेमी जीव..

ठेवला आदर्श, रचली सुखी संसाराची नीव...

घेतलेल्या शपथा,आणाभाका साऱ्या...

झालेल्या दोघांच्या पण पुऱ्या...

मिळाले आशिर्वाद वडीलधाऱ्यांचे..

संसारसुख मिळाले...

लाभले क्षण आनंदाचे.


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance