पैंज आणि मी..
पैंज आणि मी..
थंडीचे दिवस होते. गार वारा सगळीकडे पसरला होता. गुलाबी थंडी अंगाला झोंबत होती .रात्र झाली होती. आकाशात चांदण्या चमकत होत्या. त्याचा मंद प्रकाश सगळीकडे पडला होता. सगळ्यांचीच जेवणं आटोपली होती. तशी गावाकडची जेवणं लवकरच होतात.
रोज ठरलेल्या जागी आम्ही जमलो.जमल्या-जमल्या सगळ्यांनी वाळलेला पालापाचोळा आणि लाकडं गोळा केली. काडीपेटी सोबतच आणली होती. आग पेटवली तसें सगळ्यांनी गोल केला आणि त्या आगीच्या कडेने बसले.आता या थंडीच्या दिवसांमध्ये रात्रीच्या गप्पा म्हणजे भुताच्या गोष्टी, राजकारणाचा विषय, जुन्या आठवणी यांना उधान येत.अचानक कोणाला नवीन काय सुचायच तर कोणी हश्या पिकवायचं.
अचानक बबलून आमच्या घोळक्यात एन्ट्री मारली. बबलू म्हणजे बकबक मशीन, बडबड्या. वयाने माझ्यावरून, छोट्यावरून आणि दिघ्या वरून एक वर्षांनी मोठा बाकी सगळे आमच्यावरून लहानच होते. बबलू आला की आमच्या गप्पांना वेगळाच रंग चढायचा. बबलू आला आणि आमच्या अगोदरच भुताच्या गोष्टी चालू होत्या. त्यानं आम्हाला मधेच थांबवत त्याच्या आजोबांचा एक किस्सा सांगायची परवानगी माघितली आम्हीही हो बोललो. तो कितीही बकबक करत असला तरी त्याच बोलणं उत्कृष्ट होत आणि विषयाला धरून असायचं. त्यांन किस्सा सांगायला सुरुवात केली तसें आम्ही कान टवकारले आणि किस्सा ऐकला. किस्सा ऐकल्यावर बघितलं तर आमच्यावरून जी लहान मंडळी होती ती कधीच गायब होती. तिथे उरलो होतो मि, छोट्या, दिघ्या आणि बबलू. त्यांन वातावरण अगदी शांत करून टाकलं. त्याचा किस्सा ऐकून आमचीही फाटलीच होती पण तस कोणीच दाखवलं नाही. छोट्या म्हणजे अतरंगी माणूस अगदी लहरी मोहम्मद काय, कधी अन केव्हा काय करल सांगताच येणार नाही.
त्यानं विषय बदलला आणि एक मजेदार जोक सांगून वातावरण नॉर्मल केल. पण तो शांत बसेल तर छोट्या कसला. लहरी मोहम्मद कुठचा. अचानक म्हणाला, "आपण एक गंम्मत करू " तसें सारे हादरले कारण त्याची मस्ती कधी कधी अंगाशी यायची. आता पुढे तो काय बोलणार यावर सगळ्यांचे लक्ष्य वेधलं होत. आपण एक पैंज लाऊयात.बघूया कोणाच्यात किती हिम्मत आहे ते. आमच्यापासून थोड्याच अंतरावर स्मशान भूमी होती त्याकडे बोट करून म्हणाला की, "एक एकाने जायचं आणि स्मशान भूमीचा जो छताचा पत्रा आहे तो वाजवून यायचं."हा कधी काय बोललं भरवसाच नाही. त्याची ही कल्पना सगळ्यांना पटली. आता मी बळजबरी हो बोललो कारण त्यांनी मला भित्रा चिढवू नये म्हणून. मला खरंतर अंधाराची खूपच भीती वाटायची आणि त्यावेळी 11:30 झाले होते.
आता ही आलेली कल्पना एक मस्तीच होती पण त्याच पुढ काय होईल सांगताच येणार नव्हत. नंबर ठरले आणि जायचं आणि पत्रा वाजवायचा. विशेष म्हणजे या पैजेत फसवायचा प्रश्नच नव्हता कारण जिथे आम्ही आग पेटवली होती तिथून एक डांबरी रोड होता. तिथून पलीकडे एक उसाच शेत अन त्याला लागूनच एक रुंद ओढा आणि त्या ओढ्यातच स्मशान भूमी होती. जी आम्ही बसलेल्या ठिकाणाहून अगदी स्पष्ट दिसायची. त्यामुळे फसवणे अर्ध्यात जाऊन येणं प्रश्नच नव्हता.
सगळ्यात पहिला नंबर बबलूचा नंतर दिघ्याचा नंतर छोट्या या पैजे मागचा (मास्टर माईंड )आणि लास्टला मी कारण मी घाबरत होतो अंधाराला आणि माझा नंबर लास्टला मुद्दाम कारण यांना माझी फजिती एकत्र पाहायची होती. बबलू, दिघ्या आणि छोट्या यांनी तेथे जाऊन पत्रा वाजवला आणि स्वतःला हिंमतवान दाखवून दिल. आता माझी वेळ होती.
मी निघालो मी अर्ध्यात पोहोचलो आणि माघारी जायचा निर्णय घेतला पण मनात आल की आयुष्यभर भित्रा म्हणून यांच्याकडून ऐकून घ्यावं लागल. बळजबरी हळूहळू पाऊल पुढे टाकत होतो. घड्याकडे पहिले तर करेक्ट 12:00 झाले होते. आता तर खूपच घाबरलो होतो. कारण हा वेळ भुतांसाठी राखीव आणि उपयुक्त असतो. आता माझ्या मनात बबलूच्या आजोबांचा किस्सा यायला लागला मी रडवेला झालो होतो. अगदी बळच पाऊल टाकत होतो. ते तिघे माझी मज्जा घेत होते.माझी पुरती घाबरगुंडी उडाली होती. अचानक माझ्या शेजारी कोणीतरी आलंय असा मला भास झाला माघे वळून पाहिलं तर माझा एक दोस्त ज्याची अन माझी 2 महिने भेटच झाली नव्हती. माझ्या आता जिवती जीव आला होता. पण त्याचे डोळे लाल जाणवत होते. शरीर असं भरभक्कम. तो जरा वेगळाच जाणवत होता. तो म्हणाला, "एवढ्या रात्री कुठे निघाला? " मग मी त्याला पैजेबद्दल सांगितलं. आम्ही चालतच बोलत होतो. मग इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. अचानक माझं लक्ष्य ओढ्याकडे गेलं. माझ्या लक्ष्यात आलं आपण हा ओढा 3 वेळा पार केलाय आणि घड्याळाकडे पहिला तर अर्धा तास झालं चालतोय तस पाहिलं तर अगदी 10-15 मिनिटे पुरेसे आहेत जाऊन यायला स्मशान भूमीपासून. पण मी पूर्ण 30 झाले चालतोय तेही 3 वेळा ओढा पार करून. मला काहीतरी बरोबर नाही हे जाणवलं.
माझ्या पूर्ण अंगाला घाम सुटला होता. माघे वळून पाहण्याचीही हिम्मत उरली नव्हती.जेव्हा मी माझ्या भेटलेल्या मित्राच्या पायाकडे पहिले तर माझ्या तोंडातून शब्दचं गायब झाले. त्याचे पायच नव्हते. तो हवेत तरंगतो तसा माझ्यासोबत पुढे पुढे चालत होता. आता मला समजतच नव्हत काय ते. पूर्ण चक्रावून गेलो होतो. तसाच धपकन जमिनीवर कोसळलो.जेव्हा जाग आली मी घरी होतो. ते तिघे आणि आई बाबा. काय झाल असं विचारलं तर चक्कर येऊन पडलो असं बोललो. दुसऱ्या दिवशी परत एकत्र भेटलो तेव्हा त्यांना माझ्या भेटलेल्या मित्राबद्दल सांगितलं त्यांच्याही पायाखालची जमीन सटकली. ते एकाच सुरात बोलले "कस शक्यय?" कारण तो त्या ओढ्यातच बुडून मेलेला 2 महिने झाले. आता मला पुन्हा चक्कर आली.