Niranjan Niranjan

Thriller Others

3  

Niranjan Niranjan

Thriller Others

मोठ्या मनाचा माणूस - भाग पाच

मोठ्या मनाचा माणूस - भाग पाच

18 mins
1.0K


भाग १०

राजू कोल्हापूरच्या रेल्वेस्टेशनवर आला. समोरच्या टपरीवरून त्याने एक कप चहा घेतला आणि एका बाकावर बसून तो चहा पिऊ लागला. रेल्वेस्टेशनवर नेहमीप्रमाणेच गडबड गोंधळ चालू होता. आपली रेल्वे पकडण्यासाठी लोक मेंढरासारखी पळत होती. एखादी नवीन रेल्वे स्थानकात आल्यावर माईक वरून अनाउन्समेंट होत होती. त्यातच वेगवेगळ्या आवाजात आपल्या खास शैलीत ओरडणाऱ्या फेरीवाल्यांचा आवाज मिसळत होता. पानपट्टी पासून पेपर, मासिकांच्या दुकानापर्यंत सगळीकडे माणसच माणसं होती. बघेल तिथे ट्रेनची वाट पाहून कंटाळलेले तेलकट चेहरेच दिसत होते. या सगळ्या गोंधळात राजूच्या मनात वेगळाच गोंधळ सुरु होता. रसिकाने केलेला अपमान सहन न झाल्यामुळे तो तावातावात घरातून बाहेर पडला होता. पण सखाराम दादाला न सांगता घरातून निघून आपण चूक तर केली नाही नं? असं त्याला आता वाटत होतं. आज तो या जगात होता तो केवळ सखाराममुळेच होता. आत्महत्या करायला गेलेल्या राजूला सखारामने वाचवलं होतं. एवढचं नाही तर त्याने राजूला आपला भाऊ मानून स्वतःच्या घरात घेतलं होतं. सखारामचे राजूवर खूप मोठे उपकार होते आणि याची राजूलाही जाणीव होती. परत घरी जावं आणि सखाराम दादाला सगळं खरंखरं सांगावं असाही विचार त्याच्या मनात येऊन गेला. पण तसं केलं तर सखाराम दादा आणि रसिका वहिनीच्या नात्यावर त्याचा परिणाम होईल असं राजूला वाटलं आणि त्याने परत घरी न जाण्याचा निर्णय घेतला.

चहा पिऊन झाल्यावर राजूने चहावाल्याला पैसे दिले व तो परत बाकावर जाऊन बसला. विचार करून राजूचं डोकं दुखत होतं. थोड्यावेळाने त्याला बसल्या बसल्याच झोप लागली. राजूला जेव्हा परत जाग आली तेव्हा रात्र झाली होती. राजूला खूप भूक लागली होती. तो जवळच्याच एका हॉटेलात जाऊन जेवून आला. आजही रात्र त्याला इथेच स्टेशनवर काढावी लागणार होती. राजूने तिथेच एका बाकावर पाय पसरले, पण थंडीनं तो गारठला होता. व त्याला आता झोपही लागत नव्हती. राहून राहून त्याच्या मनात सखारामदादाचेच विचार येत होते. तो तसाच बाकावर पडून राहिला.

सकाळ झाली तशी स्टेशनवर माणसांची वर्दळ वाढू लागली. पहाटे केव्हा तरी राजूला झोप लागली होती. पण फेरीवाल्यांच्या आवाजामुळे त्याला जाग आली. प्रातर्विधी आटोपून त्याने चहा घेतला व पोहे घेऊन तो परत बाकावर येऊन बसला. त्याच्या समोरच्या बाकावर एक माणूस पेपर वाचत बसला होता. एक भिकारी बाई त्या माणसापाशी आली व खायला मागू लागली. त्या माणसाने हातानेच तिला जायची खूण केली. पण ती बाई काय तिथून हलली नाही व परत त्याच्याकडे खायला मागू लागली. आता तो माणूस चिडला आणि त्याने एक अश्लील शिवी त्या बाईला दिली. निराश होऊन ती बाई तेथून निघाली. हे सगळं पाहून राजूला रखमाची आठवण झाली आणि तो गहिवरला. त्याने हाताने डोळे पुसले आणि त्याने त्या भिकारी बाईला हाक मारली. तिने आश्चर्याने पाहिले पण ती संकोचून तिथेच उभी राहिली. राजू बाकावरुन उठला आणि त्या बाईपाशी जाऊन तिला म्हणाला, “काकी, चला काहीतरी खाऊन घ्या.” ते दोघेही जवळच्या टपरीपाशी आले. राजूने एक प्लेट पोहे आणि एक कप चहा मागवला. ती भिकारी बाई पोहे खात होती. तिच्या एका डोळ्यात अश्रू आणि एका डोळ्यात आनंद होता. इतक्या वर्षात तिला पहिल्यांदाच कोणीतरी काकी म्हणून हाक मारली होती व एवढ्या प्रेमाने खाऊ घातलं होतं. पोहे खाऊन झाल्यावर तिने चहा पिला व राजूच्या डोक्यावर हात ठेवून त्याला आशिर्वाद दिला आणि ती तिथून निघाली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून राजूदेखील सुखावला.

आता पुढे काय करायचं? राजूच्या मनात विचार आला. स्टेशनवर तो जास्त दिवस राहू शकत नव्हता. त्याच्याकडचे पैसे देखील थोडे दिवसच पुरणार होते. त्याला लवकरात लवकर काही तरी काम शोधणं भाग होतं. गावातील काही लोकांकडून त्याने पुण्याबद्दल ऐकलं होतं. गावातले बरेच लोक कामासाठी पुण्यात गेले होते. त्यांना राजूने परत गावात आलेले पाहिलं नव्हतं. त्याने पुण्यात जाऊन काम शोधायचं ठरवलं. इथं राहणं त्याच्यासाठी फारसं ठीक नव्हतं. केव्हान् केव्हा सखाराम दादा आपल्याला शोधणार हे त्याला माहित होतं आणि पुन्हा वहिनीचे टोमणे ऐकत, अपमान सहन करत जगणं त्याच्यासाठी असह्य होतं.

राजूने पुण्याकडे जाणाऱ्या ट्रेनची चौकशी केली. दोन तासात गाडी येणार होती. राजूने इकडे तिकडे फिरून कसाबसा वेळ काढला. आणि गाडी येताच तो गाडीत चढला. पुण्यात गेल्यावर लगेच काम मिळेल अशी राजूला अपेक्षा होती. सुरुवातीचे काही दिवस तो मिळेल ते काम करायला तयार होता. गाडी पुणे स्टेशनला पोहोचली. राजू तिथे उतरला. त्याने स्टेशनवरच चहा घेतला व तो स्टेशन बाहेर पडला.

रस्त्यावर एवढी गर्दी तो पहिल्यांदाच बघत होता. रात्र झाली की गावातल्या रस्त्यावर चीटपाखरू सुद्धा दिसायचं नाही. इथे मात्र सगळीकडे माणसच माणसं. प्रत्येक जण कसल्या न कसल्या गडबडीत होता. थोडं फिरून राजू परत स्टेशनवर आला. आजची रात्र देखील त्याला स्टेशनवरच काढावी लागणार होती. सकाळी उठून तो काम शोधणार होता. जवळच्या हॉटेल मध्ये राजूने थोडसं खाल्लं आणि एका बाकावर येऊन त्याने पाय पसरले. सकाळी उठल्यावर चहा वगैरे पिऊन झाल्यावर त्याने एक वर्तमानपत्र विकत घेतलं व त्यातल्या जाहिराती पाहू लागला. एका जाहिरातीने त्याचं लक्ष वेधून घेतलं. चाकण मधल्या एका कंपनीत कामगार भरतीची जाहिरात होती. राजूने पत्ता लिहून घेतला. सकाळचा नाशता आटोपून त्याने चाकणची बस पकडली. जाहिरातीत दिलेल्या पत्त्यावर तो पोहोचला. तिथल्या वॉचमनला त्याने कामगार भरतीसाठी आल्याचं सांगितलं. वॉचमनने त्याला समोरच्या ऑफीसमध्ये जायला सांगितलं. केबिनमधल्या साहेबाने राजूला काही माहिती विचारली आणि कामाचं स्वरुप समजावून सांगितलं. राजूला प्रति दिन दोनशे रुपये भत्ता मिळणार होता. तसेच त्याची राहायची सोय देखील तेथेच होणार होती. राजू खुश झाला. दुसऱ्याच दिवसापासून त्याचं काम सुरु झालं. सुपरवायजरने राजूला वेगवेगळी मशीन्स कशी वापरायची ते दाखवलं. गाडीच्या इंजीनमध्ये वापरला जाणारा एक पार्ट त्या कंपनीत बनायचा. इतर कामगारांप्रमाणे राजूही आता कामाला लागला. खरंतर राजूला हे काम फारसं आवडलं नव्हतं. पण सध्या तरी राजूला गरज होती.

कंपनीजवळच कामगारांसाठी झोपायला खोल्या होत्या. त्यातल्याच एका खोलीत राजूची सोय केली होती. रात्री जेवण झाल्यावर राजू झोपण्यासाठी त्याच्या खोलीत आला. त्या खोलीत अगोदरच तीन जण होते. राजूने स्वतःची ओळख करून दिली. त्यांनीही राजूला आपआपली नावं सांगितली. चिनप्पा, बबलू आणि बाळू. चिनप्पा मुळचा कर्नाटकचा होता पण लहानपणापासून तो पुण्यातच होता. बबलू बिहार मधून आला होता तर बाळू लातूरचा होता. चिनप्पाचे वडील पूर्वी याच कंपनीत कामाला होते. एक दिवस त्यांचा हात मशीन मध्ये अडकला आणि कायमचाच निकामी झाला, त्यांच्याच जागी चिनप्पाला घेतला होता. अगदी लहानपणापासूनच चिनप्पा कांपनीत काम करत होता. आता कंपनीत काम मिळाल्यापासून एक महिना झाला होता. राजूची चिनप्पा, बबलू आणि बाळू यांच्याशी चांगलीच मैत्री झाली होती. आठवड्यातले दोन तीन दिवस रात्री त्यांचा दारूचा कार्क्रयम होत असे. राजू मात्र दारू घेत नसे. पण त्यांच्या गप्पांमध्ये मात्र तो सामील व्हायचा. त्या तिघांनाही दारू चढली की ते काहीही असंबद्ध बोलायचे आणि त्यांची बडबड ऐकून राजूला गंमत वाटायची. पण त्याला काही दारू प्यायची इच्छा झाली नाही. राजूचा पूर्ण दिवस कंपनीत कामातच जायचा. सुपरवायजर देखील त्याच्या कामावर खुश होता. त्याने राजूबद्दल मालकालाही सांगितलं होतं. काही महिन्यांतच मालकाने राजूचा पगार वाढवला. एक दिवस राजूला मालकाने कॅबीनमध्ये बोलावलं. मालकाच्या घरातला गडी पंधरा दिवस सुट्टीवर होता. त्याचे वडील आजारी असल्यामुळे तो गावी गेला होता. त्यामुळे मालक गडी परत येईपर्यंत घरची सगळी कामं राजूकडून करून घेणार होता. मालकाच्या मुलीला शाळेत पोहोचवण्यापासून त्याच्या कुत्र्याला फिरवून आणण्यापर्यंत सगळी कामं राजूला करावी लागणार होती. राजूला देखील फॅक्टरीच्या कामातून बदल हवाच होता. मालक आपल्यावर खुश आहे याचही त्याला समाधान होतं. गेले चार दिवस राजू मालकाने सांगितलेली सगळी कामं मनापासून करत होता. आज सकाळी उठल्यावर आवरुन तो मालकाच्या कुत्र्याला फिरवून आणण्यासाठी मालकाच्या बंगल्यापाशी आला. समोरचं दृशय पाहून राजूला धक्काच बसला. बंगल्याच्या गेटपाशी मालकाचं लॅब्राडोर जातीचं कुत्र मरून पडलं होतं. त्या कुत्र्याच्या मानेवर चाकूचे वार होते व त्या जखमेतून रक्त वाहत रस्त्यावर आलं होतं. त्या कुत्र्याची नक्कीच कोणीतरी निघृणपणे हत्या केली होती. खरंतर राजूला कुत्री फारशी आवडत नसत. कालंच तो चिनप्पाला बोलला देखील होता की त्याला मालकाच्या कुत्र्याला फिरवायची बिलकुल इच्छा होत नाही. ते कुत्र सारखं अंगाअंगाशी करतं आणि माझे पाय चाटतं. मला त्याची किळस येते. पण कुत्रं मालकाचं फारच लाडकं असल्याने मला तसं मालकाला सांगता पण येत नाही असही तो चिनप्पाला बोलला होता. पण आज पहिल्यांदा राजूला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले ते कुत्रं पाहून त्याची कीव आली. कुत्रं मालकाचं लाडकं असल्याकारणाने मालकाला सांगायचही धाडस होत नव्हतं. राजूने थोडावेळ विचार करून तिथून निघण्याचा निर्णय घेतला. तो आजारी असल्याकारणाने आपण इथे आलोच नाही असं मालकाला सांगणार होता. तो तिथून निघाला तेवढ्यात त्याला मालकाचा आवाज आला. बालकनीत उभ्या असलेल्या मालकाने राजूला पाहिलं होतं व त्यानेच राजूला हाक मारली होती. आता मात्र भीतीने राजूच्या पोटात गोळा आला होता. तो तिथेच थांबला. मालक जोरजोरात पायऱ्या उतरत खाली आला. तो थेट त्याच्या लाडक्या रॉकीच्या प्रेतापाशी येऊन खाली बसला. रॉकीचं रक्ताळलेलं डोकं त्याने आपल्या हातात घेतलं आणि थोडावेळ त्याच्याकडे पाहू लागला. आता त्याच्या डोळ्यांच्या कडा अश्रुंनी ओलावल्या होत्या. आता त्याने समोरच उभ्या असलेल्या राजूकडे पाहिलं. मालकाची भेदक, क्रोधीत नजर आपल्याकडे रोखलेली पाहून राजू भीतीने कापत होता. त्याच्या हृदयाची धडधड त्याला स्पष्ट ऐकू येत होती. मालकाला राजूवर संशय होता. तो राजूकडे पाहून मोठ्याने ओरडला, “तूच मारलस ना माझ्या रॉकीला.” राजूचं मन सांगत होतं, “नाही साहेब मी काहीच नाही केलं.” पण भीतीमुळे त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. तो नुसता मालकाकडे पाहत होता. मालकाचा राग अजूनच वाढला. तो राजू जवळ आला आणि त्याच्या शर्टाची कॉलर पकडून म्हणाला, “का मारलस तू माझ्या लाडक्या रॉकीला?” आता मात्र राजूचा धीर सांपला. “मी नाही” असे दोनच शब्द तो उच्चारू शकला. आता मालकाची सहनशक्ती संपली. त्याने राजूला कॉलर पकडून तसेच फरफटत आत आणले. “थांब तुला पोलिसातच देतो.” असे म्हणून मालक आत जाऊन गाडीची चावी घेऊन आला. त्याने राजूला गाडीत बसवला आणि गाडी त्याने स्वतः चालवत पोलीस स्टेशनपाशी आणली. मालकाने राजूला हाताला धरूनच आत नेलं. समोर इन्स्पेक्टर मुजुमदार पेपर वाचत बसले होते. ते मालकाचे चांगले मित्र होते. मालकाचा म्हणजेच प्रकाशचा रागीट चेहरा पाहून मामला गंभीर असल्याची जाणीव इन्स्पेक्टर मुजुमदारांना झाली. मालक मुजुमदारांना म्हणाला, “विकास याला आत्ताच्या आत्ता कोठडीत घे आणि चांगले फटके दे”. मालकाचा आवाज चढला होता आणि अजूनही त्याचे डोळे आग ओकत होते. “अरे प्रकाश आधी शांत हो, आणि याने केलंय काय ते तरी सांग.” इन्स्पेक्टर मुजुमदार म्हणाले. मालक थोडा शांत झाला आणि म्हणाला, “याने माझ्या लाडक्या रॉकीची निघृण हत्या केलीय. कष्टाळू, हुशार कामगार म्हणून मी याच्यावर विश्वास दाखवला आणि याने माझा विश्वासघात केला.” मुजुमदारांनी राजूकडे पाहिलं. तो मालकाच्या मागे अंग चोरून उभा होता. मुजुमदारांनी कॉनस्टेबल डोंगरेंना खूण करताच कॉनस्टेबल डोंगरेंनी राजूला मुजुमादारांसमोर उभं केलं. मान वर करून मुजुमादारांकडे पाहण्याचं देखील धाडस राजूचं होत नव्हतं. तो मान खाली घालून उभा होता. मुजुमादारांना माणसांची चांगली पारख होती. गुन्हेगार आणि सामान्य माणसातला फरक त्यांना चांगलाच माहित होता. आतापर्यंत त्यांनी बरेच गुन्हेगार पकडले होते. ते राजूला शांतपणे म्हणाले, “काय रे, का मारलस तू त्यांच्या कुत्र्याला?” “कुत्रा म्हणू नकोस. रॉकी मला मुलासारखा होता आणि इतका शांतपणे काय बोलतोस त्याच्याशी, चार फटके दिल्याशिवाय नाही बोलणार हा नालायक.” “मागून मालक बोलला. मुजुमदार मालकाला म्हणाले, “हे बघ कुणाला कसं बोलतं करायचं हे मला चांगलच कळतं. ही काय तुझी कंपनी नाही आहे. तुला जर इथं थांबून त्रास होत असेल तर तू जाऊ शकतोस.” मालक रागातच बाहेर गेला. मुजुमदार राजूला म्हणाले, “हे बघ, जे काय झालं ते सगळं खरं सांग. जर तू खरचं काही केल नसशील आणि जर तू हे सगळं काही खरं सांगितलस तर तुला काहीही त्रास होणार नाही. याची ग्वाही मी तुला देतो.” मालक तिथून गेल्यामुळे राजूच्या मनावरचा ताण आता कमी झाला होता. त्याने सगळं काही सांगितलं. मुजुमादारांना राजूने सांगितलेलं पटत होतं पण सध्यातरी ते त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेऊ शकत नव्हते. पण जर राजूने रॉकीला नाही मारलं तर मग कोणी मारलं हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच होता आणि मारणाऱ्याचा हेतू तरी काय असावा? माणसं माणसाला मारतात. माणसा माणसात शत्रुत्व असत. पण त्या निष्पाप मुक्या प्राण्याशी कुणाचं शत्रुत्व असाणार. मुजुमादारांना काहीच सुचत नव्हतं. त्यांनी डोंगरेंना राजूला परत त्याच्या खोलीवर सोडायला सांगितलं. आता त्यांनी मालकाला परत आत बोलावलं. ते म्हणाले, “प्रकाश मी राजूची चौकशी केली. सध्यातरी मी त्याच्याबद्दल काहीच सांगू शकणार नाही आणि कायद्यानुसार पुराव्या अभावी त्याला अटकही करू शकणार नाही. रीतसर चौकशी होईल. पण तुझ्या रॉकीच्या गुन्हेगाराला मी लवकरात लवकर शोधीन असं मी तुला वचन देतो.” आता मालकाकडे अजून काही दिवस थांबण्या शिवाय काही पर्याय नव्हता. तो मुजुमदारांना म्हणाला, “ठीक आहे, पण मलातरी असचं वाटतय की खून राजूनेच केलाय. तू तुझ्या पद्धतीने चौकशी कर पण मी त्याला आत्ताच नोकरी वरुन काढून टाकतो आणि हाकलून लावतो.” “माझं मत असं आहे की तू तसं करू नयेस. उलट तू त्याच्याशी चांगल वाग, त्याला गाफील ठेव. मी माझे दोन विश्वासू सहकारी त्याच्या पाळतीवर ठेवतो. मला हे काम एखाद्या माथेफिरूचचं वाटतय आणि तो जर राजूच असेल तर फार दिवस शांत राहणार नाही. पुढच्या शिकारी साठी तो नक्की बाहेर पडेल आणि आपण त्याला रंगेहात पकडू.” इन्स्पेक्टर मुजुमदारांनी आपलं मत सांगितलं. मालकाला मुजुमदारांचं बोलणं पटलं.

राजूला खरंतर आता तिथं काम करायची बिलकुल इच्छा नव्हती. पण आपण जर इथून गेलो तर पोलिसांचा आपल्यावरचा संशय अजून वाढेल हे त्याला माहित होतं. आता त्याला परत कंपनीतलं काम दिलं गेल. कंपनीतला प्रत्येक जण आपल्याकडे संशयाने पाहतोय असं राजूला वाटायचं व त्यांच्या नजरा त्याला असह्य व्हायच्या.

इन्स्पेक्टर मुजुमदारांनी कॉनस्टेबल डोंगरे आणि कॉनस्टेबल साबळेंना राजूच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवायला सांगितलं होतं. सकाळपासून रात्रीपर्यंत तो काय करतो, कुठे जातो, तसेच रात्री तो काय करतो यावर बारीक लक्ष ते ठेवणार होते.

सकाळीच कॉनस्टेबल डोंगरे आणि साबळे कंपनीत आले. ते प्रत्येक कामगाराकडे राजूची चौकशी करत होते. पण बहुतेक कामगारांचं आणि सुपरवायजरच सुद्धा राजूबद्दलच मत चांगलच होतं. राजू चिनप्पा, बबलू आणि बाळू यांच्यासोबत एका खोलीत रहात असल्यामुळे या तिघांकडे ते जास्त डीटेलमध्ये चौकशी करणार होते. चौकशी आता सांपली होती. चिनप्पाकडून मिळालेल्या माहितीमुळे त्यांचा राजूवरचा संशय आणखीनच वाढला होता. मालकाच्या कुत्र्याची किळस येते आणि त्याचं अंगाशी करणं, लोचटपणा मला आवडत नाही असं तो मला एकदा बोलला होता असं चिनप्पाने पोलिसांना सांगितल होतं.

आता कॉनस्टेबल डोंगरेंनी नाईट ड्युटीवर असलेल्या दोन शिपायांना राजूच्या खोलीबाहेर थोड्या अंतरावर लपून रात्रभर त्याच्या खोलीवर नजर ठेवण्याची व तो रात्री अपरात्री खोलीतून बाहेर आल्यास लगेच कळवण्याची व त्याचा पाठलाग करण्याची सूचना दिली होती.

सलग चार दिवस त्या शिपायांनी एका झाडामागे बसून राजूच्या खोलीवर पहारा दिला होता. पण त्यांना कोणतीच संशयास्पद हालचाल आढळली नाही. पुढच्या दिवशी कॉनस्टेबल डोंगरे स्वतः त्यांच्या बरोबर आख्खी रात्र तिथे थांबले. पण अजूनही काहीच हालचाल झाली नव्हती. शेवटी त्यांनी इन्स्पेक्टर मुजुमदारांना कळवलं. मुजुमदारांनी त्यांना अधून मधून राजूवर लक्ष ठेवायला सांगितलं.

रॉकीची हत्या होऊन आता दहा दिवस झाले होते. पण अजूनही मारेकरी सापडला नव्हता. मालकाचा राग आता बऱ्यापैकी कमी झाला होता. राजूवर आपण उगीचच संशय घेतला असं वाटत होतं. पण त्याचं दुसरं मन राजूला निर्दोष मानायला अजूनही तयार नव्हतं. राजूच्या विरुद्ध जरी पुरावे सापडले नसले तरी तो पूर्णपणे निर्दोष सिद्ध झाला नव्हता.

इन्स्पेक्टर मुजुमदार चहा पीत होते. चहा पीत पीत ते समोर ठेवलेल्या वर्तमानपत्रातल्या बातम्या वाचत होते. पोलीस स्टेशनच्या दारातून राजूला आत येतांना पाहून ते अचंबित झाले. राजू आत येऊन उभा राहिला. “काय रे राजू आज इकडे कसा?” मुजुमदारांनी राजूला विचारलं. “साहेब रॉकीचा खुनी कोण आहे हे मला कळलय.” “काय?” मुजुमदार खुर्चीवरून ताडकन उभे राहिले. हातातला कप त्यांनी खाली ठेवला. “काय म्हणतोस तू? कोण आहे खुनी? ” त्यांनी विचारलं. त्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि कुतुहल एकाच वेळी दिसत होतं. “होय साहेब, चिनप्पा खुनी आहे.” “चिनप्पा म्हणजे तो तुमच्या कंपनीत काम करतो. तुझ्याबरोबर रूम मध्ये राहतो तो चिनप्पा?” “होय साहेब. ” “अरे पण कशाच्या आधारावर तू हे बोलतोयेस? तुझ्याकडे काही सबुत आहे का? ” “सर आज मी माझ्या डोळ्यांनी त्याला एका कुत्र्याचा खून करताना पाहिलं आहे.” “बरं सविस्तर सांग.” मुजुमदार म्हणाले. राजू सांगू लागला, “ज्या दिवशी प्रकाश साहेबांच्या कुत्र्याची हत्या झाली आणि मला साहेबांनी तुमच्यासमोर आणलं त्या दिवशी जेव्हा तुमच्या लोकांनी मला खोलीवर सोडलं. मी पाहिलं की चिनप्पाचे घरी घालायचे कपडे दोरीवर वाळत टाकले होते. ते थोडं विचित्रच होतं, कारण कालच सकाळी त्याने कपडे धुतले होते आणि आज परत त्याने ते कपडे धुवून वाळत टाकले होते. तो जेव्हा त्या रात्री खोलीवर आला तेव्हा त्याच्या बुटावर एक रक्ताचा डाग मला दिसला. मला तेव्हाच त्याच्यावर संशय आला. मी तुम्हाला सांगू की नको या विचारात होतो कारण आधीच तुमचा माझ्यावर संशय होता. मी दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर हे सगळं बाळूला सांगितलं. पण त्याने जेव्हा चिनप्पाचे बूट पाहिले तेव्हा त्यावर रक्ताचे डाग नव्हते. पुढचे काही दिवस मी झोपायचं नाटक केलं व चिनप्पावर लक्ष ठेवलं पण त्याने कोणतीच हालचाल केली नाही. काल रात्री मी झोपलो होतो, पण मला नीट झोप येत नव्हती. तरीही मी तसाच पडून राहिलो. थोड्यावेळाने मला दार उघडण्याचा आवाज आला. मी डोळे उघडून पाहिलं तर मला चिनप्पाची पाठमोरी आकृती बाहेर जातांना दिसली. मी उठलो, टॉर्च घेतली आणि खोली बाहेर आलो. चिनप्पा पुढे चालला होता. मीही त्याच्या मागे मागे जात होतो. तो पुढे डाव्या बाजूला वळला आणि एका झाडापाशी येऊन थांबला. त्याने त्या मोठ्या झाडाच्या ढोलीत हात घालून एक चाकू बाहेर काढला. आता मला खात्री झाली की हाच खुनी आहे. तो परत पुढे चालू लागला. मीही परत त्याच्या मागे चालू लागलो. त्याने एकदा मागे वळून पाहिले. मी लगेच एका गाडीमागे लपलो. बहुतेक त्याला संशय आला असावा कारण तो खूप जोरात चालू लागला. आता मी लपतछपत कसाबसा त्याच्या मागे जात होतो. पण त्याच्या पुढे माझा वेग कमी पडत होता. थोडा पुढे जाऊन तो उजव्या बाजूला वळला. मी ही त्या वळणापर्यंत आलो पण तो मला कुठेच दिसत नव्हता. मी थोडा निराश झालो आणि एका झाडामागे लपून बसलो. मी बराच वेळ तिथे थांबलो आणि कंटाळून शेवटी मी तिथून निघणार होतो तेवढ्यात एक आकृती मला समोरून येतांना दिसली. ती आकृती चिनप्पाचीच होती. चिनप्पा झपाझप पावले टाकत चालला होता. त्याच्या हातात रक्ताळलेला चाकू होता. त्याच्या चेहऱ्यावर असुरी, कू्र हास्य होतं. चेहरा घामाने डबडबला होता. थोडा वेळाने चिनप्पा दिसेनासा झाला. मी पुढे चालू लागलो. थोडा पुढे गेल्यावर मी डाव्या बाजूला वळलो. एका बंगल्यापाशी आल्यावर समोरचं दृष्य पाहून मला धडकी भरली. समोर एक दांडगं कुत्र मरून पडलं होतं. रॉकीच्या मानेवर जशी जखम होती तशीच जखम त्या कुत्र्याच्या मानेवर होती. त्यातून रक्त वाहत होत. मी थेट खोलीवर परत गेलो. पण तिथे चिनप्पा अजूनही आला नव्हता. मला जेव्हा सकाळी जाग आली तेव्हा मला चिनप्पा झोपलेला दिसला पण त्याच्या अंगावरचे कपडे वेगळे होते.”

राजू पुढे काही बोलायच्या आत एक स्थूल माणूस धावतच पोलीस स्टेशनमध्ये शिरला. त्याचे केस पांढरे होते व तो साधारण पन्नास ते साठ वयाचा असणार असे त्याच्याकडे बघून वाटत होतं. तो खूप चिडलेला दिसत होता. तो म्हणाला, “इन्स्पेक्टर मला एफ आय आर नोंदवायचा आहे.” “तुमच्या केसचे डीटेल्स सांगा.” “आज मी सकाळी उठून बाहेर बागेत आलो तर गेटपाशी माझं कुत्रं मरून पडलेले दिसलं. त्याच्या मानेवर जखम होती. कोणीतरी धारधार शस्त्राने त्याचा खून केलाय. मला खात्री आहे हे काम समोरच्या रस्त्यावर बसणाऱ्या भिकाऱ्याचं आहे.” “भिकारी” शब्द ऐकताच राजूला खूप राग आला. पण त्याने स्वतःला कसंबसं सावरलं. तो माणूस पुढे बोलू लागतो, “आम्ही एवढी महागडी कुत्री आणायची आणि हे भिकारडे, भुरटे, चोर साले, बघून घेईन मी एकेकाला.” या माणसाला कुत्र मेलं यापेक्षा ते महागडं होतं आणि आपले पैसे वाया गेले याचं दुःख जास्त होतं. इन्स्पेक्टर मुजुमदार त्या माणसाला म्हणाले, “तुमच्या कुत्र्याचा खुनी आम्हाला लवकरच सापडेल. थोड्याच वेळात मी तुमच्या बंगल्यापाशी येतो.” मुजुमदार कॉनस्टेबल डोंगरेंना बरोबर घेऊन निघाले. ते त्या बंगल्यापाशी आले. बंगल्याच्या गेट समोरच ते कुत्र मरून पडलं होतं. राजू सांगत होता त्याप्रमाणेच ही जखम देखील रॉकीच्या मानेवरील जखमेप्रमाणेच दिसत होती. ते परत पोलीस स्टेशनमध्ये आले. त्यांनी फोटोज राजूला दाखवले. राजूनेही ते फोटो ओळखले. त्याने रात्री पाहिलेलचं ते कुत्र होतं.

इन्स्पेक्टर मुजूमदारांनी चिनप्पाला रंगेहात पकडायंच ठरवलं. त्यांनी एक प्लॅन बनवला. काही दिवस दोन शिपायी राजूच्या खोलीजवळ लपून रात्री लक्ष ठेवणार होते. राजू देखील पुढचे काही दिवस रात्री झोपायचं नाटक करून चिनप्पावर लक्ष ठेवणार होता. चिनप्पा घरातून बाहेर पडताच राजू आणि स्वत: इन्स्पेक्टर मुजुमदार त्याचा पाठलाग करून त्याला रंगेहात पकडणार होते.

पहिले तीन चार दिवस काहीच हालचाल झाली नाही. मात्र पाचव्या दिवशी रात्री दोन वाजायच्या दरम्यान राजूला दार वाजल्याचा आवाज आला. त्याने समोर पहिले तर त्याला चिनप्पा बाहेर पडतांना दिसला. त्याने लगेच इन्स्पेक्टर मुजुमदाराला फोन लावला व चिनप्पा खोलीतून बाहेर पडल्याचं सांगितल. तसेच चिनप्पा बाहेर येताच समोरच्या झाडामागे लपलेल्या दोन शिपायांनाही तो दिसला. ते हळूहळू लपत छपत त्याच्या मागे जाऊ लागले. तो पुढे जात होता. दोन खून करून देखील पोलीस आपल्याला पकडू शकले नाहीत या प्रकाराने त्याच्यात एक बिनधास्तपणा आला होता. तो आपल्याच तंद्रीत पुढे जात होता. मुजुमदार आता राजूच्या खोलीपाशी आले होते. ते आणि राजू आता गाडीतून निघाले. तिकडे ते दोन शिपाई अजूनही चिनप्पाच्या मागावर होते. तो मोठ्या झाडापाशी आला आणि त्याने झाडाच्या ढोलीतून चाकू बाहेर काढला. एका गाडीमागे लपलेल्या शिपायाने मुजुमदारांना फोन लावला आणि चिनप्पाच्या लोकेशनची माहिती दिली. चिनप्पा एका हातात चाकू घेऊन पुढे पुढे चालला होता. दोन तीन वेळा त्याने रस्ते बदलले आणि एका कॉलनीपाशी येऊन तो थांबला. दोघे शिपाई सुद्धा त्याच्यापासून थोड्या अंतरावर एका गाडीच्या मागे लपले होते. त्यातील एकाने फोन करून लोकेशन कळवलं. थोडा वेळ चिनप्पा तिथेच थांबला होता. तो काहीतरी विचार करत होता. त्या कॉलनीत बरेच मोठेमोठे बंगले होते. काही बंगल्यांच्या गेटपाशी वॉचमन होते तर काही बंगल्यात फक्त कुत्री बांधली होती. बराच वेळ विचार केल्यावर चिनप्पा एका बंगल्याच्या दिशेने चालू लागला. त्या बंगल्याच्या गेटपाशी वॉचमन नव्हता. एक मोठ कुत्र दारात झोपलं होतं. त्या बंगल्याच्या आजूबाजूच्या बंगल्यांमध्ये सुद्धा एकही वॉचमन नव्हता. म्हणूनच चिनप्पाने तो बंगला निवडला होता. तो बंगल्याच्या गेटपाशी येऊन थांबला. आता मुजुमदार आणि राजू देखील तिथे पोहोचले. ते त्या बंगल्या जवळच्याच एका झाडाच्या मागे उभे राहून चिनप्पाकडे पाहत होते. चिनप्पाने त्याच्या खांद्यावरच्या पिशवीतून एक स्प्रेची बाटली काढली. आणि तो गेटजवळ गेला. त्याच्या पायाचा धक्का गेटला लागला आणि आवाज झाला. आवाजाने आत झोपलेल्या कुत्र्याला जाग आली आणि त्याने समोर उभ्या असलेल्या चिनप्पाला पाहून भुंकायला तोंड उघडलं तेवढ्यात चिनप्पाने तो स्प्रे त्या कुत्र्याच्या नाकावर मारला. तत्क्षणी कुत्र बेशुद्ध झालं. चिनप्पा गेटवर चढणार होता तेवढ्यात मुजुमदार त्याच्यासमोर आले. चिनप्पाने पळायचा प्रयत्न केला पण दुसऱ्या बाजूला गाडीमागे लपलेले शिपाई धावून आले आणि त्यांनी चिनप्पाला पकडले. चिनप्पाने स्वतःला सोडवून घ्यायचा खूप प्रयत्न केला पण शिपायांच्या मजबूत पकडीमुळे त्याचा प्रयत्न निष्फळ ठरला आणि शेवटी त्याने शरणागती पत्करली.

शिपायांनी त्याला गाडीत ढकललं व त्याच्या दोन बाजूला दोन शिपाई त्याला धरून बसले. गाडी पोलीस स्टेशनपाशी आली. चिनप्पा रंगेहात पकडला गेला होता. त्यामुळे आता लपवण्यात काहीच अर्थ नव्हता. आत आल्यावर मुजुमदारांनी त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यांनी चिनप्पाला विचारलं, “बोल, प्रकाशच्या कुत्र्याला का मारलंस?” चिनप्पा सांगू लागला, “साहेब खरं तर माझा सगळ्याच कुत्र्यांवर राग आहे. काही वर्षांपूर्वी माझ्या आयुष्यात एक दुर्दैवी घटना घडली, तेव्हापासून माझ्या मनात कुत्र्यांबद्दल राग आहे. माझा भाऊ जवळच्या एका घरात घरगडी म्हणून काम करायचा. मालक खूप श्रीमंत होता. त्याच्याकडे दोन तीन महागड्या गाड्या होत्या. तसेच चार कुत्री त्याने पाळली होती. सर्वच कुत्री चांगली उंच आणि दांडगी होती व तितकीच रागीट होती. माझा भाऊ तिथे ड्रायव्हर, माळी म्हणून काम करायचा तसेच कुत्र्यांना फिरवून आणणे, त्यांच्या खाण्यापिण्याचं पाहणं ही कामं सुद्धा तो करायचा. एक दिवस माझ्या दोन वर्षाच्या मुलाला तो आपल्या बरोबर घेऊन गेला. त्याने कुत्र्यांना मोकळं केलं आणि त्यांच्या समोर डॉगफूड ठेवलं. माझा मुलगा पायरीवर बसला होता. त्याचे लक्ष त्या कुत्र्यांकडे गेलं. भूभू भूभू म्हणत तो त्या कुत्र्यांकडे गेला. पाणी आणायला माझा भाऊ आत गेला होता. कुत्री खाण्यात मग्न होती. माझ्या मुलाने एका कुत्र्याच्या डोक्यावरून हात फिरवला तेव्हा ते कुत्रं चिडलं आणि त्याने माझ्या मुलाचा हात तोंडात पकडला. माझा मुलगा जोरात ओरडला. त्याचा आवाज ऐकून माझा भाऊ बाहेर आला पण तो काहीच करू शकला नाही. तो तिथे पोहचेपर्यंत त्या क्रूर, रानटी कुत्र्यांनी माझ्या कोवळ्या बाळाचे हाल केले होते. त्याच्या इवल्याश्या शरीरातून जीव केव्हाच निघून गेला होता.” चिनप्पा भावनाविवश झाला होता. तो पुढे बोलू लागला, “आम्ही पोलिसांकडे गेलो पण पोलिसांनी आम्हाला दारात उभं देखील केलं नाही. कुत्रा हा प्राणीच माझ्या मनातून उतरला होता. खासकरून श्रीमंतांच्या घरातील कुत्री. मी बदला घ्यायचं ठरवलं. थोड्याच दिवसांत मी एक प्लान केला आणि ज्या कुत्र्यांनी माझ्या मुलाला हालहाल करून मारलं होतं त्या कुत्र्यांना मारायचं मी ठरवलं. पण मी काही करायच्या आतच घरमालकाने ती कुत्री विकली होती. पण माझं मन शांत होत नव्हतं. बदल्याच्या आगीत मी पेटून उठलो होतो. बाहेर एखाद्या बंगल्याच्या बाहेर कुत्रं बांधलेलं पाहिलं की रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या माझ्या मुलाचं कोवळं शरीर आठवायचं आणि माझं रक्त उसळायचं. माझे हात शिवशिवायचे. अस वाटायचं की जावं आणि त्या कुत्र्याचा गळा चिरावा. मी खूप वेळा प्लान बनवायचो पण सापडले जाऊ अशी भीती वाटायची. खूप वर्षानंतर मला तो चान्स मिळाला. जेव्हा मालकाने राजूला घरकाम करायला सांगितलं आणि राजूने मला मालकाच्या कुत्र्याबद्दल सांगितलं व कसं त्याला मालकाच्या कुत्र्याची कीळस येते हे पण सांगितलं. मालक राजूवर संशय घेणार हे मला माहित होतं कारण त्याच दिवशी मी राजू जे काही कुत्र्याबद्दल बोलला होता ते मालकाच्या कानावर घातलं होतं. तेव्हा मालकानं मला फारसं सिरीयसली नाही घेतलं. पण सगळं काही प्लानप्रमाणे झालं. आज मी त्याच पद्धतीने त्या कुत्र्याला संपवलं असतं ज्याप्रमाणे मी त्यादिवशी मालकाच्या कुत्र्यालाही मारलं होतं. पण आज तुम्ही तिथे असाल असं स्वप्नातदेखील मला वाटलं नव्हतं. मालकाच्या कुत्र्याला मारल्यावर एक प्रकारचा आनंद मला झाला होता जो यापूर्वी मला कधीच झाला नव्हता. माझा मुलगा जणू काही वरून पाहतोय आणि आनंदाने हसतोय असं मला वाटलं होतं. त्याचे चिमुकले हसरे ओठ मला दिसत होते.” हे सगळ बोलतांना चिनप्पा वेगळ्याच जगात असल्या सारखा वाटत होता. त्याने त्याचा गुन्हा कोर्टात देखील कबूल केला. आय पी सी च्या कलम ४२८ अंतर्गत दोन पाळीव कुत्र्यांची हत्त्या केल्याच्या प्रकरणी चिनप्पाला पाच वर्ष तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली.


क्रमशः


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller