महाराष्ट्राचा 'महावीर'
महाराष्ट्राचा 'महावीर'
चार हजार पाकडयांना कंठस्नान घालणारा महाराष्ट्राचा 'महावीर' अद्याप उपेक्षित. महावीरचक्रप्राप्त नाईक कृष्णा सोनावणे यांचे राष्ट्रीय प्रेरणास्मारक कुडपणला होणे आवश्यक.
सध्या देशामध्ये पाकव्याप्त काश्मीर भागातील उरी येथे शहिद झालेल्या भारतीय सैनिकांबाबत आणि त्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राईक्ससंदर्भात जोरदार चर्चा होत आहे. मात्र, सुमारे चार हजार पाकडयांना कंठस्नान घालणारा महाराष्ट्राचा 'महावीर' महाराष्ट्रात अद्याप उपेक्षितच आहे. पोलादपूर तालुक्यातील कुडपण गावाचे सुपुत्र नाईक कृष्णा सोनावणे यांचे राष्ट्रीय प्रेरणास्मारक कुडपण येथे आवश्यक असून पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी असताना प्रस्तुत प्रतिनिधीनेही याविषयी तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्याकडे इंटरनेटद्वारे पाठपुरावा केला असता त्यांनी अनुकूलता दर्शविली होती. परंतू, दुर्दैवाने अद्याप त्यावर कोणतीही इच्छाशक्ती दिसून आली नाही.
जगबुडी नदीच्या उगमस्थानावर वसलेले कुडपण या गावाचा पर्यटनदृष्टया विकास करण्याबाबत सध्याच्या राज्यसरकारने 51 लाख रूपयांचा निधी उपलब्ध करण्याचे ठरविले आहे. या निधीतून 14 लाख स्वच्छतागृहे, पथदिवे 20 लाख आणि पदपथासाठी 17 लाख रूपयांच्या निधीची तरतूद करून हे ब्रिटीशकालीन हिलस्टेशन पर्यटनदृष्टया विकासित करण्याचा विचार अंमलात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, हे कुडपण गाव ज्यांच्या अतुलनीय पराक्रमासाठी चिरकाळ स्मरणात रहावे अन् कुडपणचे सुपुत्र महावीरचक्रप्राप्त नाईक कृष्णा सोनावणे यांचे राष्ट्रीय प्रेरणास्मारक व्हावे, अशी काळाची गरज आहे. पण त्याविषयी ना महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांमध्ये ना स्थानिक पर्यटनविकासासाठी उद्युक्त तरूणांमध्ये इच्छाशक्ती दिसून येते.
पहिल्या महार बटालियनमध्ये 1948 साली कृष्णा सोनावणे भरती झाले. त्यावेळी त्यांचे शिक्षण जेमतेम पहिली इयत्तेपर्यंत झाले होते. या काळात ब्रिटीशांनी हिंदुस्थान आणि पाकिस्तानला स्वातंत्र्य देऊन नागरिकांना कोठे राहायचे ते ठरविण्याची मुभा दिली. परिणामी, फाळणीतून पाकिस्तानचा जन्म झाला. भारताला आणि काश्मीरला स्वातंत्र्य मिळाले. काश्मीरचा राजा हरिसिंह हा हिंदू राजा होता. त्यावेळी पाकिस्तानचे गव्हर्नर जनरलमहमद अली जीना तर पंतप्रधान लियाकत अलिखान झाले. त्यामुळे काश्मीरचा राजा हिंदू आणि जनता माुस्लिंम असल्याने जीनांनी पाकिस्तानी फौज व कबाली यांना काश्मीरमध्ये घुसविले. पाकिस्तानी फौजा व कबालींनी सर्व काश्मीर जिंकत श्रीनगरपर्यंत मजलमारली. काश्मीरच्या राजाची फौज अतिशय छोटीशी होती आणि काश्मीरचे पंतप्रधान मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला होते. हरिसिंह राजा आणि मुख्यमंत्री शेख अब्दुल्ला यांना पाकिस्तानमध्ये सामील होण्याची इच्छा नव्हती. त्यांनी भारताचे पंतप्रधान पं. नेहरुंकडे भारतात सामील होण्याची इच्छा व्यक्ती केली. त्यावेळी भारतातून काश्मीरला जाण्याचे रस्ते अतिशय अवघड होते. जनरल थिमय्या यांच्या नेतृत्वाखाली भारतीय फौजा पूर्ण काश्मीरवर आक्रमण करण्यासाठी आणि पाकिस्तानच्या फौजा हटविण्यासाठी तेथे पोहोचली. हवाईमार्गे श्रीनगरपर्यंतही भारतीय सैन्य पोहोचले. येथेच पहिले भारत -पाकिस्तान युध्द पेटले.
महार युनिटची पहिली बटालियन सर्वात आधी श्रीनगरला गेली तर दुसरी बटालियन सीमावर्ती भागात पाठविण्यात आली. झांगड हा त्यापैकी सर्वात दुर्गम आणि बर्फाळ प्रदेश होता. तेथे ब्रिगेडीयर उस्मानच्या क्रमांक 1 बटालीयनच्या वाय कंपनीमध्ये नाईक कृष्णा सोनावणे दाखलझाले. त्यांचे नेतृत्व ब्रिगेडीयर उस्मान यांच्याकडे होते. झांगडच्या मोर्चावर नाईक कृष्णा सोनावणे दोन मशीनगनसह उंच टेकडीवर पोझीशन घेऊन बसले. ब्रिगेडीयर उस्मान मुसलमान असल्याने पाकिस्तानच्या जनरलने त्याला पाकिस्तानशी हातमिळवणी केल्यास मोठे पद आणि सन्मान देण्याचे आमिष दाखवले. पाकिस्तानची ही चालपाहून ब्रिगेडीयर उस्मानने स्वत: एक चाल खेळली. त्याने पाकिस्तानशी बोलणी सुरु ठेवली आणि भारतीय सैन्याची पुरेशी रसद झांगड मोर्चावर जोपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत पाकिस्तानच्या जनरलसोबत वार्तालाप सुरु ठेवला. मात्र, झांगडच्या लढाईमध्ये अनेक शूर महार सैनिक कामी आले याची आठवण मनाशी बाळगून पाकिस्तान सैनिक आणि कबालींना कंठस्नान घालण्यासाठी महार रेजिमेंटचा प्रत्येक महार लढवय्या आसुसलेला होता. नाईक कृष्णा सोनावणे यांनी भरपूर हँडग्रेनेडस्, बुलेटस् सोबत घेऊन जीवात जीव असेपर्यंत पाकिस्तानी फौजांना पुढे येऊ द्यायचे नाही असा निर्धार केला.
6 फेब्रुवारी 1948 रोजी पाकिस्तानी सैन्याने 7 हजार जवानांसह चाल केली. त्यामुळे भारतीय सेनेचा जोर कमी पडला आणि भारतीय फौज मागे हटली. स्वत:ची आणि याचवेळी जखमी झालेल्या लान्स नाईक पुंडलिक महार याची अशा दोन मशिनगन घेऊन नाईक कृष्णा सोनावणेंनी उंचावर जागा हेरली. तेथून पाकिस्तानी सैन्य अगदी नजरेच्या टापूत दिसत होते. कृष्णा सोनावणेंनी प्रति आक्रमण केले. तब्बलतासां-दीड तासात दोन मशीनगन्समधून हजारो गोळयांचा वर्षाव आणि हॅण्डग्रेनेडस्चा मारा यामुळे सुमारे चार हजार पाकिस्तानी सैनिक आणि कबाली घुसखोर ठार झाले. ब्रिगेडीयर उस्मान याने नाईक कृष्णा सोनावणेंचे हे एकटयाचे पाकिस्तानसोबतचे युध्द पाहिले. कृष्णा सोनावणेंच्या हाताला गोळी लागली तरी ते डगमगले नाहीत. त्यांचे चार जवानही धारातीर्थी पडले. पण सह्याद्रीच्या कुशीत कुडपणच्या थंड हवेत जन्मलेल्या या जवानाने काश्मीरच्या बर्फामध्येही आपल्या आसीम शौर्याने पाकिस्तानचे चार हजार सैनिक मारले. त्यामुळे आक्रमण करणाऱ्या कबालींना पाकसैन्यासोबत माघार घ्यावी लागली, ही घटना त्यावेळी दिल्लीमध्ये जनरलकरिअप्पा यांच्या कानावर ब्रिगेडीयर उस्मानने घातली.
सुभेदार बी. जी. मोरे 2 महार बटालियनमध्ये तर नाईक कृष्णा सोनावणे 1 महार बटालियनमध्ये होते. दोघे काही काळ मध्यप्रदेशातीलसागर मुक्कमी एकाच सैनिकी तळामध्ये राहत होते. त्यावेळी कृष्णा सोनावणे यांनी आपली ही गौरवगाथा बी. जी. मोरे यांना सांगितली. हाताला गोळी लागून जखमी झालेल्या अवस्थेत नाईक कृष्णा सोनावणे यांची त्यांच्या शौर्याबद्दल जनरल करिअप्पा यांनी महावीर चक्र पदकाच्या सन्मानासाठी घोषणा केली. स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्रप्रसाद यांनी नाईक कृष्णा सोनावणे यांना त्यांच्या शौर्याबद्दल सर्वोच्च महावीर चक्र पदक प्रदान करून सन्मानित केले. यानंतरही सुभेदार मेजर पदावरून 1962 भारत -चीन युध्द व 1965 भारत-पाकिस्तान दुसरे युध्द यात सहभागी होऊन देशसेवा केली.
क्रमांक 1 बटालीयनच्या वाय कंपनीमध्ये सुभेदार मेजर पदावरून निवृत्त होत सागर लष्करी तळावर महार रेजिमेंट युध्दसराव देणारे महावीरचक्रप्राप्त नाईक कृष्णा सोनावणे अतिशय नम्रभावाने साधेपणाने राहात असत.नंतर मुंबई पोलीस दलात हत्यारी पोलीस म्हणून सेवा बजावली. या महावीराचे निधन 29 डिसेंबर 1997 रोजी मुंबई येथील राहत्या घरी झाले. यानंतर 'पोलादपूरचे पोलादी पुरूष'पुस्तकासाठी माहिती संकलीत करणारे प्रस्तुत प्रतिनिधी शैलेश पालकर यांनी महायोध्द्याचे राष्ट्रीय स्मारक कुडपण जन्मगावी व्हावे, यासाठी तत्कालीन राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुलकलाम यांच्याकडे इंटरनेटवरून पाठपुरावा केला. त्यावर संबंधित बाब आपण डीफेन्स मिनिस्ट्रीकडे पाठविली असून याबाबत लवकरच निर्णय कळविण्यात येईल असा रिप्लाय राष्ट्रपतीमहोदयांनी पाठविला.
1929 साली कुडपण अतिदूर्गम भागात जन्मलेले नाईक कृष्णा सोनावणे पोलादपूरच नव्हे तर महाराष्ट्रवासियांचा अभिमान असल्याचा उल्लेख 1990 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी करून 'महाराष्ट्र गौरव' पुरस्कार देऊन सन्मानित केले. मध्यप्रदेशात महार रेजिमेंटने या महावीराचे यथोचित स्मारक उभे केले आहे. पुतळा उभारलाय आणि सर्व माहिती देणारे केंद्रही उभारले आहे. एका रस्त्यालाही सोनावणे मार्ग नांव देऊन इतिहास जिवंत ठेवलाय. अलिकडेच कुडपण ते मध्यप्रदेशातील सागर येथील महार रेजिमेंटपर्यंत शौर्य यात्रा टाटा नॅनोतून करणारे पोलादपूरचे एलआयसी एजन्ट सुभाष अधिकारी यांनी महावीराच्या स्मृती जरूर जागविल्या. मात्र, अद्याप या महावीराच्या स्मृती महाराष्ट्रामध्ये जागविण्याबाबत कमालीचे दूर्लक्ष होत असून तातडीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांनी या कामी पुढाकार घेण्याची गरज आहे.