Sangita Tathod

Comedy Romance

3  

Sangita Tathod

Comedy Romance

केले कबूल

केले कबूल

5 mins
177


  फुलगाव आणि आणि सुनगाव ही दोन जुळी 

खेडी होती . जसे एका आईची दोन जुळी

मुले असतात ना ! अगदी तसेच . या दोन

गावांच्या मधे फक्त नदीचं आडवी . त्यामुळे

 काय ती दोन गावं वेगळी दिसत . म्हणून

ती जुळी गावे . तर त्या सुनगावमधे एक सम्या

राहत होता. तसे त्याचे ओरिजिनल नाव

समीर होते. लोक त्याला मानाने सम्या म्हणत.

सम्यालाही हेच नाव आवडत असे . बाजूच्या

म्हणजे फुलगावात रुपाली राहत होती .

नावाप्रमाणे ती रूपाने देखणी होती . रूपालीला

सर्व रूपा म्हणत . रूपा आणि सम्या दोघेही

तरुण . येता , जाता त्या दोघांची कुठे ना कुठे

नजरा नजर व्हायची . कधी वावराच्या मेरीवर,

तर कधी नदीकाठच्या मंदिरात तर कधी 

आठवडी बाजारात . नजरेच्या खेळातून , 

प्रेमाचे बाण अचूक सोडले गेले होते . पण

प्रेमाची गाडी पुढे काही सरकत नव्हती .

सम्या खूप प्रयत्न करायचा , पण रुपाशी कधी

एकट्यात त्याचे बोलणे होत नसे.


   कधी कधी ती दोघे एकाच S T मधून

तालुक्याच्या गावी जात असत. पण रूपा सोबत

नेहमी कुणी तरी असायचे . त्यामुळे बोलायची

पंचाईत. तो तिच्याशी बोलण्याचा चान्स शोधत

असायचा . एक दिवस , मिळाला चान्स .

त्याचे असे झाले की _ _ _ 


सम्या इलेक्ट्रिकचे बिल भरायला तालुक्याला

गेला होता. बिल भरून झाल्यावर तो , घरी

परत जाण्यासाठी S T स्टँड वर आला . तर

समोर रूपा उभी दिसली . त्याने आजूबाजूला

कानोसा घेतला . ती एकटीच होती . अहाहा _ _ 

मस्तच चान्स मिळाला . साम्यला भर दुपारी

आकाशात चांदण्या दिसू लागल्या . त्याने

दुरूनच मोबाईल मधे तिचा फोटो काढून

 घेतला. नंतर तिच्या जवळ गेला. त्याला

 दरदरून घाम फुटला . काय बोलावे हे सुचेना.

शेवटी हिम्मत करून म्हणाला,


"हाय रूपा . ऊन भयंकर आहे . चल आपण

उसाचा रस प्यायला जाऊ. "


काहीही न बोलता रूपा गोड हसली . सम्या

सोबत रस प्यायला तयार झाली. ती दोघे दोन

पाऊले जात नाही, तोच तिचा भाऊ आला .

त्याला पाहताच सम्याचे मस्तक ठणकले .


आत्ताच याला कलमडायचे होते का ?


    सम्या मनात म्हणाला .


सम्याला तिचा भाऊ म्हणतो कसा,


"लय ऊन हाय गड्या . बाजारातून हे सामान

आणुन जाम थकलो मी. तू माझा शिवभाऊ

तुझ्यावर भरवसा हाय. मी असं करतो हे

समान इथच ठेवतो . तू या सामानवर लक्ष ठेव.

रूपा आणि मी रस पिऊन येतो ."


  दात ओठ खात सम्या बसला सामानाची 

रखवाली करत. तोंडाशी आलेला घास पळविने

काय असते , हे सम्याला आज कळले .


दिवसा मागून दिवस गेले, पण सम्याला रूपाशी

बोलणे काही जमले नाही. रोज रात्री मोबाईल

मधील रूपाचा फोटो बघून , तो त्या फोटोशी

बोलत होता. सुगीचे दिवस संपले अन् सुरू

झाली लगन घाई . सम्याचा मोठा भाऊ गण्या

लग्नाचा होता. पाच सहा पोरी पाहण झाल्यावर

गण्याच लग्न नेमक रुपाशी पक्क झालं.


आता झाली की , नाही पंचाईत _ _ _ !


नेमका त्याच वेळी सम्या त्याच्या आत्याकडे

गेला होता. अत्याच्या मळ्यातील टरबूज

 काढण्याचे काम होते . तिकडून आल्यावर

त्याला हे मिस मॅच लग्नाचे कळले . पण

घरात उघड उघड तो काही बोलू शकत नव्हता.

पण मनातल्या मनात मात्र रडत होता. मग काय

त्याने खाणे पिणे सोडले . रोजच्या रोज त्याचे

किलो किलोने वजन कमी होऊ लागले .

त्याची तब्बेत अशी पाहून , त्याची माय म्हणाली,


"आत्याच्या घरी सम्याले भुतान झपाटल , म्हणून

तर हे पोरगं अस करून राहील ."


घरातील लोकांसमोर सम्या काही बोलत नव्हता.

पण रूपा साठी मात्र मनातून झुरत होता.


आता गाण्याच्या अन् रूपाच्या कुंकवाचा दिवस जवळ आला . नवीन सुनेसाठी म्हणजेच रूपा

साठी काठाची साडी अन् अंगठी आणली.

आता मात्र , सम्याने काहीतरी करायचे

ठरविले . या चान्स गेला तर भाऊ दुसरा 

मिळणार नाही. असा विचार करून सम्याने

मग शक्कल लढविली_ _ _ 



त्याने काय केले असेल बरे ??



त्याने कुंकावासाठी आणलेली, रुपाची साडी

आणि अंगठी लपवून ठेवली . साडी अन्

अंगठी कुठेच दिसत नाही, म्हणून सम्याच्या

मायने सारे घर डोक्यावर घेतले . सर्वजण

अंगठी शोधण्याच्या कामात लागले . दुपारचे

दोन वाजले तरी , घरात चूल पेटली नाही .

सर्वच ठिकाणी अंगठी शोधून झाले , पण

कुठेच सापडली नाही . सम्याची आत्या , एका

डब्यात अंगठी शोधायला गेली , तर तिला

गव्हाच्या चिकाच्या कुरडया दिसल्या . तो

डबा तिने सम्याच्या माय समोर आपटला . 


"काहो , वहिनी तुम्हाले काल , माया पोरासाठी

कुरया तळा म्हणल, तर कुरळ्या संपल्या

म्हणत होत्या . आता या डबाभर कुरळ्या कुठून

आल्या . "


"अहो , रख्माबाई माय ध्यानच नव्हतं , या डब्यात

कुरळ्या आहेत ते _ _ " माय


"ते काही नाही वहिनी , तुमाले , आम्ही माहेरी

आलेलो खपतच नाही. काही ना काही कुरापती

काढून आम्हाले हाकलून देत राहता . "


"असं , काही नाही रखमा बाई . तुमी मायावर

भलते आरोप , नका लावू . मी इतके मनापासून

तुमचे सण वार करते अन् तुमी , असे आरोप

लावता . " माय


दोघी नणंद , भावजयचे एकमेकिंवर आरोप ,

प्रत्यारोप सुरू होते . सम्या गालात हसून त्यांचे

प्रेमाचे भांडण ऐकत होता . ते भांडण त्याच्या

पथ्यावर पडले होते. त्या निमित्ताने सर्व ,

हरवलेली अंगठी विसरले होते .

 "बरच झालं, अंगठी बद्दल सर्व विसरले . 

अंगठी नाही मिळाली तर , कुंकवाचा कार्यक्रम होणार न्हाई. पुढचं पुढे पाहून घेऊ . आता पुरते 

लग्न तर टळेल . " 


लगेच दुसरी सोन्याची अंगठी आणू शकतील

इतके काही सम्याचे कुटुंब श्रीमंत नव्हते .


असा मनाशी विचार करीत , सम्या भांडणात

तेल ओतत होता . कधी आईची बाजू घेत होता

तर कधी आत्याची बाजू घेत होता . शेवटी

संध्याकाळ पर्यंत भांडण मिटले . सर्वांना भूका

लागल्या होत्या. लगेच खिचडी बनवून सर्व

जेवायला बसले. सम्या मनातून खुश होता . 


जेवण होत नाही तोच , सम्याचा इब्लिश भाचा

सोहम अंगठी आणि साडी हातात घेऊन 

नाचत नाचत आला .


"सापडली सापडली , नव्या मामीची अंगठी आणि

साडी सापडली ." असे तो जोराने ओरडत होता.


सर्वजण सोहम भोवती गोळा झाली . अंगठी

शोधली म्हणून सोहमचे कौतुक होऊ लागले .

सम्या मात्र , सोहम वर दात ओठ खात उभा होता.


शेवटी कुणीतरी सोहमला विचारले ,


"ही साडी आणि अंगठी तुला सापडली तरी कुठे ?"


"तिथेच होती , आबाच्या कपड्या काही , देवाच्या

बाजूला ." सोहम


"पण तिकडे , हे अंगठी अन् साडी गेली तरी कशी ?

मी तर ते आलमारीत ठेवली होती. "माय


सम्या कडे बोट दाखवीत, सोहम म्हणाला,


" या . सम्या मामाने तिथं लपवून ठेवले होते ."


"मग , तू आधीच का नाही सांगितले ." गण्या


"मामाने लपवून ठेवले होते , हे मी बघितलं होतं,

पण मग विसरून गेलो . आता आठवल , अन्

पटकन आणल ." सोहम



. आता सर्वांसमोर सम्याचा चेहरा उतरला .


शेवटी सम्याला कबूल करावेच लागले की ,

त्याचा रुपावर जीव जडलाय . त्यासाठी त्याने

हे सर्व केले आहे. हे ऐकून सर्वजण हसायला

लागले . माय म्हणाली,


"आत्याच्या घरून , रूपा नावाच्या भूताने झपाटले

होते म्हणायचे . मला वाटल दुसरे कोणते भूत 

होते _ _ _ ?"



   सम्या लाजला . 


त्याच अंगठी आणि साडीवर सम्याचा आणि

रूपाचे कुंकू लागले .


आता सम्याच्या भावासाठी मुलगी शोधणे सुरू

आहे . मुलगी पसंत पडताच , दोन्ही भावांचे

एकाच मांडवात लग्न लागणार आहे _ _ _ 



Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy