ही दोस्ती तुटायची नाय...
ही दोस्ती तुटायची नाय...
मैत्री म्हणजे नात्यांची सुंदर गुंफण ...
मैत्री असते ही जीवाला जपणारी ,
आयुष्याच्या अवघड प्रसंगी ,
ओयासिस बनून देते पुन्हा आनंदाची उभारी!!
खरंच मैत्री म्हणजे एक सुंदर अनुभूती , मनातले हितगुज सांगायला लागत ते हक्काचं स्थान ...तश्याच होत्या त्या दोघी सीता आणि लक्ष्मी , अगदी लहानपणापासून त्यांची मैत्री , सकाळी उठल्यापासून सोबत असायच्या , शाळेत सोबत जाणे,सोबत खेळणे , अभ्यास सगळं काही सोबतच... एकमेकींशीवाय पानही हलत नसे दोघींचं...पण अचानक सिताच्या बाबांची बदली झाली आणि ते शहर सोडून दूर गावाला निघून गेले...दोघी खूप रडल्या , एकमेकींना पत्र लिहू (गोष्ट जुनी आहे...त्या काळात फोन नव्हते... ) सुट्टीत भेटू असं कितीतरी वचने दिली गेली...आणि पाळली ही गेली...दोघी नेहेमी एकमेकींना पत्र लिहीत असत ते हे अगदी मोठी मोठी , प्रत्येक गोष्ट एकमेकींना सांगायची सवय पुढेही टिकली...
सीताच्या बाबांचं आकस्मिक निधन झालं आणि बारावी पास होताच तिचं लग्नही झालं...
काय योगायोग , सीता लग्न करून पुन्हा माहेरच्या गावी आली आणि ते सुद्धा लक्ष्मीच्या घराजवळ ! दोघींना खूप आनंद झाला... सिताने पुढे शिकावे असे तिच्या सासरच्या मंडळींना वाटले आणि मग ती पुन्हा लक्ष्मी सोबत कॉलेज ला जाऊ लागली...दोघींची मैत्री पुन्हा एकदा फुलली...
सिताच्या सासरची मंडळी कजाग होती, तिला खूप त्रास द्यायचे , तिची आर्थिक परिस्थीती सुद्धा फारशी बरी नव्हती...बिचारी सीता नेहेमीच दुःखात राहू लागली...लक्ष्मी मात्र नेहेमी तिला मदत करायची.लक्ष्मी ची आईसुद्धा सितावर मुलीवत प्रेम करायची...
अश्यातच सीता ला दिवस गेले आणि ती कॉलेज ला येईनाशी झाली...लक्ष्मी तिच्या घरी गेली तरी सीता च्या सासरचे लोक तिला जास्त भेटू देत नसत , मोकळे पणाने बोलायची सोयही नव्हती...दोघींना खूप वाईट वाटायचं...सीता बाळंतपणासाठी माहेरी गेली आणि तेव्हाच लक्ष्मीच लग्न झालं आणि ती दुरच्या शहरात गेली ...दोघी मैत्रिणीची पुन्हा एकदा ताटातूट झाली...
लक्ष्मी माहेरी आली की सीता ला आवर्जून भेटायला जायची... सीताने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता आणि त्याच्या पायगुनाने तिची परिस्थिति सुधारत होती...दोघी मैत्रिणी आनंदात होत्या...लक्ष्मीला एक गोड मुलगी झाली ...दरवर्षी लक्ष्मी माहेरी आली की दोघी मनसोक्त बागडायाच्या, दोघींची मुलं सुद्धा खुप छान रमायची... विहान आणि विभा...विभा विहानला राखी बांधायची त्यामुळे दोघांचे बंध अजुनच छान बांधले गेले होते...
आणि काही वर्षांनी लक्ष्मी पुन्हा एकदा माहेरच्या गावात राहायला आली, अगदी कायमची...दोघी मैत्रिणींना खूप आनंद झाला...वरचेवर भेटणे व्हायचे आता दोघींचे...मुलं तर एकमेकांकडे राहायला सुद्धा जायचे.
मुलंही मोठी झाली, विभाचं लग्न झालं .तिचं माहेरपण आता दोन्ही ठिकाणी होत होतं. वीहांनच सुद्धा लग्न झालं . रीमाच्या रूपाने छान सून घरात आली...सीता आणि लक्ष्मी नातवंडाबरोबर रमून गेल्या. छान आयुष्य चाललं होतं दोघींचं.
काळाने घाव घातला आणि छोट्याश्या आजाराचे निम्मित होऊन लक्ष्मी कायमची निघून गेली...सीताला हे सहन होणारं नव्हतं...तिला खूप त्रास झाला...काळाने पुन्हा एकदा दोघींना वेगळं केलं होतं.
सीता ने विहान आणि रीमाला खूप सावरलं...लक्ष्मी ला जाऊन दोन वर्ष होत आली होती आणि ध्यानी मनी नसताना हार्ट अटॅक येऊन सितासुद्धा लक्ष्मी कडे निघून गेली... दोघींचा मृत्यु एकाच तारखेला झाला हा योगायोग सगळ्यांनाच खूप दुःख देऊन गेला...