संस्कार
संस्कार
विराज आणि मनुच लग्न झालं आणि ती सासरी आली...मोठं एकत्र कुटुंब होतं विराजच ...सगळे सणवार , व्रतवैकल्ये अगदी साग्रसंगीत पणे केले जात होते...
विराज परदेशी नोकरी करत होता त्यामुळे मनुची लगेच नवऱ्याबरोबर परदेशी जायची तयारी सुद्धा सुरू झाली...
मनूच्या सासूबाई गीताबाई घरची मोठी सून या नात्याने घरचे सगळे कुळाचार, व्रतवैकल्य नियमाने करणाऱ्या होत्या...अजूनही सासूच्या आज्ञेत राहून सगळं करावं लागायचं त्यांना.साहजिकच त्यांना मनुचा हेवा वाटू लागला...' ही आता परदेशात एकटी , हवी तशी वागणार , हवं ते करणार आपण मात्र इतकी वर्षे सासूच्या आज्ञेत राहिलो, अजूनही घरचं सगळं करतो.अगदी इच्छा असो वा नसो . ही मात्र तिकडे अगदी स्वतंत्र राहणार...आपल्या वाट्याला मात्र अजूनही तेच...ती तिकडे काही करणार नाही म्हणजे पुढच्या पिढीला असे संस्कार मिळणारच नाहीत...घरचे कुळाचार , पूजा हे तर मनू काही करणार नाही तिकडे...' त्यांनी तिला टोमणा मारला ,
"आता श्रावण सुरू झाला म्हणजे काम करून माझी कंबर मोडणार , तुला बरं बाई तिथे काही मिळणार नाही आणि म्हणून तुला काही करावं लागणार नाही "
"नाही आई मी सगळं करीन जमेल तसं , माझ्या आज्जीने शिकवलंय की देव भक्तीचा भुकेला असतो म्हणून. मी भक्ती भावाने अगदी मनातून पूजा करेन आई..तुम्ही सगळे कुळाचार समजावून सांगा मला.जे शक्य होईल ते मी नक्की करेन ...देवाचं , पूजेचं सगळं बरोबर द्या तुम्ही मला ...मी कसूर होऊन देणार नाही आणि काही अडले तर तुम्ही आहातच की सांगायला..अहो पुढच्या पिढीत हे संस्कार जायला हवेतच ना..." सुनेचे बोल ऐकून सासूबाईंना भरून आलं...योग्य संस्कार आता पुढील पिढीत नक्कीच रुजतील अशी त्यांची खात्री पटली!