माझा देव
माझा देव
"आता मी काही म्हणणार नाही पण पुढच्या वर्षी तरी तुम्ही मला वारीला नेलंच पाहिजे.अहो हात पाय थकले माझे , चालणं तर व्हायला पाहिजे.सगळ्या गावाला नेता वारीला फक्त मीच तेवढी नको असते तुम्हाला...त्या पांडुरंगाशी एकांतात काय बोलायचं असतं काय माहिती ? मी आजिबात नाही यायची हो तुमच्या दोघांच्या मध्ये पण पुढच्या वर्षी मात्र मला नेले पाहीजे..आता वचन द्या तरच मी जाऊ देईन तुम्हाला..."
लक्ष्मी फुरंगटून नामदेवाला म्हणाली.कारणही तसेच होते.दरवर्षी नामदेव गावातल्या सगळ्या लोकांना वारी घडवायचा.खेड्यातले गरीब लोक ते , मनात असूनही वारीला जाणे शक्य नसल्यामुळे ते दुःखी असतं.यावर नामदेवाने एक उपाय काढला...वर्षभर सगळ्यांसाठी पैसे साठवायचे आणि त्यांना वारी घडवायची !
पुण्यवान होता नामदेव.देवाच्या कृपेने धरणी आई सोनं पिकवत होती आणि त्यांच्या कष्टामुळे कशाचीही ददात नव्हती.वर्षभर जे उत्पन्न मिळेल ते मात्र सगळं वारीसाठी खर्च होई.त्याच्या या दिलदार वृत्तीचा लक्ष्मीला खूप अभिमान आणि आनंद होता वाईट मात्र एकच गोष्टीचं , लक्ष्मीला तो कधीच वारीला आपल्या बरोबर नेत नसे...
" आपल्या शेताकडे तू बघ , आणि वारीला जाणाऱ्या , येणाऱ्या प्रत्येकाला आपल्या परीने पाहुणचार कर बरोबर चार पदार्थ बांधून दे ...तू हे पुण्य गाठीला जोडून ठेव आपल्या पुढील आयुष्यासाठी पुंजी जमा कर. माझं काय सांगावं, हीच शेवटची वारी असायची..माझ्या वागण्यामुळे आपला एकुलता एक आपल्याला दुरावला हे पाप माझ्या माथी आहेच..." भरल्या डोळ्यांनी नामदेव लक्ष्मीला सांगायचा.
बाहेर धुंवाधार पाऊस सुरू होता.पण बापाच्या मनातला पाऊस मात्र यापेक्षा कितीतरी पटीने मोठा होता.
त्यांचा मुलगा सोपान बापाच्या ह्या दिलदार वागणुकीमुळे चिडायचा... घरचं सगळं दुसऱ्यांना देऊन टाकणं योग्य नाही असं त्याला वाटायचं.दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम होत पण त्यालाही त्याच आयुष्य होतच ...एक दिवस असह्य होऊन तो घर सोडून गेला ! मुलगा दूर गेल्याचं आतोनात दुःख दोघांना झालं पण तरीही आपलं कर्म म्हणून नामदेव आणि लक्ष्मी आपलं काम करत राहिले .
लक्ष्मीला वारीला न नेण्याचे अजून एक मुख्य कारण म्हणजे नामदेव वारीला गेला की सोपान त्याच्या मुलाबाळासह लक्ष्मी सोबत येऊन राहायचा...लक्ष्मीपासून हे सुख हिरावून घ्यायचं धाडस नामदेवाकडे नव्हतं...आपल्याला नाही निदान तिला तरी पुत्र प्रेम मिळावे म्हणून त्याचा हा आटापिटा होता...
यावर्षीही सोपान आला . त्याच्या मुलाबाळात लक्ष्मी रमून गेली..भरल्या डोळ्यांनी ती आता नामदेवाची वाट पाहू लागली...
घरच्या सामानात पुडी बांधून आलेला एक जुना पेपर तिला सापडला..
' डॉक्टर सोपान कुलकर्णी यांचे दुःखद निधन '
पाच वर्षांपूर्वीची बातमी होती ती...खाली तिच्या सोपनाचा फोटो ही होता...लक्ष्मी मटकन खाली बसली...
मग मागच्या पाच वर्षांपासून सोपान घरी येतो , तो कोण ? माझी इतकी सेवा करतो भरपूर सामान आणतो , वर्षभराच सगळं धान्य भरून जातो तो कोण...? आल्या गेल्या वारकऱ्यांची मन लावून सेवा करणारा तो कोण...?
घरच्या विठ्ठलाच्या मूर्तीकडे बघून तिला तिच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे मिळाली...आपल्या अश्रूंचा अभिषेक तिने देवाला घातला...
माणसातल्या देवाचे दर्शन तीला मागच्या पाच वर्षांपासून होत होते ....!