माझा सोन्याचा संसार
माझा सोन्याचा संसार
रमा आणि माधव अगदी स्वाभावाने वेगळे पण एकमेकांच्या प्रेमात कधी पडले ते कळलंच नाही.रमा श्रीमंत घरातली आणि माधव साधारण परिस्थीती असणाऱ्या कुटुंबातला..माधव ची साधीशी नोकरी आणि जेमतेम परिस्थिती बघून रमाच्या वडिलांनी लग्नाला साफ नकार दिला... माधवच्या घरच्यांचा सपोर्ट होता म्हणून दोघांचं साधेपणाने लग्न झालं. रमाच्या घरचे कोणीच लग्नाला हजर नव्हते...सगळ्यांनी तिच्याशी संबंध तोडून टाकले...
नवी नवरी घरात आली सगळ्यांनी तिचं हसून स्वागत केलं , प्रेमाने तिला आपलंसं करू पाहिलं ...पण रमा श्रीमंतीत वाढलेली , तिला या छोट्या घराचा , इथल्या लोकांचा खूप त्रास होऊ लागला ... रमाची चीड चीड वाढतच होती...माधव च्या घरच्यांनी माधवला स्वतंत्र घर घेऊन वेगळा संसार थाटण्याची गळ घातली...
सगळ्यांच मन मोडू नये म्हणून माधवने नवीन घर घेण्याचं ठरवलं...रमाला खूप आनंद झाला ...आता तिचं स्वतंत्र घर असणार होतं , तिथे तिला वाट्टेल ते करता येणार होतं...पण माधवच्या तूटपुंज्या पगारात खर्च भागवण्यासाठी तिला तारेवरची कसरत करावी लागणार हे तिच्या लक्षात आलं नव्हतं...
' आपलं पहिलं घर स्वतःच कसं असेल , किती मोठं , सुंदर , बाहेर मोठी बाग , झोपाळा बांधू तिथे आणि मस्त दोघेच प्रेमात हरवून जाऊ...फक्त सुखाची बरसात असेल...' रमा घराचं स्वप्न बघू लागली...
माधवने त्याच्या बजेट मधलं एक घर फायनल केलं आणि मग तो रमाला घर दाखवण्यासाठी घेऊन गेला...छोट्या छोट्या दोन खोल्या , एकात बैठं किचन आणि दुसरी एक खोली... चाळीतल् ते घर , ना फारसा उजेड ना मोकळी हवा आणि बाग , झोपाळा हे तर फक्त स्वप्नातच शक्य होतं...
रमाला ते घर आजिबात आवडलं नव्हतं पण माधवच्या बजेट मध्ये यापेक्षा चागलं घर येणं शक्य नव्हतं आणि रमाला तर तिचं स्वतःच घर हवं होतं त्यामुळे नाईलाजाने तिने होकार दिला ! थोड्याच दिवसात माधव या जागेला कंटाळेल आणि मग नवीन मोठं घर घेईल याची तीला खात्री होती ...
रमाचा पुन्हा एकदा गृह प्रवेश झाला... दोघा राजा राणीचा नवलाईचा संसार सुरू झाला...दोनच दिवसात रमा वैतागली...कसलं हे घर सुरू होताच संपतं...ना हवा ना उजेड ना कुठलं फर्निचर ?
माधव ने त्याचा पूर्ण पगार रमाच्या हातात दिला , तो दोनच दिवसात संपला.पैशात लोळणाऱ्या रमाला काटकसर कष्याशी खातात हे माहिती नव्हतं आणि माहिती करूनही घ्यायचं नव्हतं...आता काय करायचं ?
माधव तीच्यावर खूप चिडला...इतकी साधी अक्कल तिला का असू नये असं त्याचं मत होतं... रमाही त्याला खूप बोलली...माधव तिला एकटीला सोडून आपल्या आई बाबांच्या घरी निघून आला...
रमा एकटीच रडत राहिली...' किती स्वप्न बघितली होती मी आपल्या पहिल्या घराची ...पण दोनच दिवसात पार धुळीला मिळाली...काय करायचं आता ? मम्मी पप्पा तर बोलतही नाहीत आपल्याशी . आई बाबा किती छान आहेत , किती प्रेम करायचे आपल्यावर आणि आपण त्यांना सोडून आलो त्याचीच शिक्षा मिळाली आपल्याला...' रमा ताबडतोब माधवच्या घरी गेली...
तिकडे माधवच्या घरच्यांनी त्याला रमाला एकटी सोडून आल्याबद्दल चागलं खडसावल होतं...रमाला दरात पाहून सगळ्यांनाच बरं वाटलं...
रमाने सगळ्यांची माफी मागितली...आईंनी तिला जवळ घेतलं रमाचा बांध फुटला...आईच्या कुशीत रडून तिचं मन मोकळं झालं...
रमाने माधवकडून वचन घेतलं ..
" आता हेच आपल्या दोघांचं पाहिलं घर आणि शेवटच सुद्धा...इथून कधीच कुठे जायचं नाही " !!