हार जिंकणाऱ्या युद्धाची
हार जिंकणाऱ्या युद्धाची
कुठेतरी जोरात आवाज आला. त्या आवाजाने दचकून तिला जाग आली. बाहेर अजून अंधार होता. पण आवाज कशाचा हे तिच्या अर्ध्या झोपेत असलेल्या मेंदूला ही अगदी क्षणात लक्षात आलं! उठल्या उठल्या तिनी आधी स्वतःला शेजारी झोपलेल्या मुलांवर झोकून दिलं . शेजाऱ्या पाजार्यांचे किंचाळण्याचे आवाज ऐकू यायला लागले, तशी ती भानावर आली. तिनी पटकन मोठ्या मुलाला उठवलं, तान्ह्या बाळाला उचलून घेतलं आणि बाहेरच्या अंगणात पळाली. नवऱ्याने सीमेवर जाण्या आधीच तळघरात 'बंकर' बनवून ठेवले होते . जसे बॉम्ब फुटल्याचे आवाज ऐकू आले, तसे ती दोन्ही लेकरांना घेऊन या बंकर मध्ये जाऊन लपून राहिली. ३ वर्ष राहता येईल एवढी सामग्री तिथे भरून ठेवली होती. स्वतःचा आणि मुलांचा जीव मुठीत घेऊन ती या बंकर मध्ये लपून राहिली. वरच्या युद्धाचे आवाज स्पष्ट ऐकू यायचे. कधी अगदी जवळून तर कधी दूर कुठेतरी युद्धाची सतत चाहूल होती.
आज अकरा महिने झाले, गेले २ दिवस आवाज कमी कमी होत, गेल्या १० तासात तिला बाहेरची शांतता जाणवली . थोडा वेळ वाट पाहून, तिने धीर गोळा करत हळूच बंकर चे गोल झाकण बाजूला सारले. हळू हळू बाहेर डोकावत, अंदाज घेत, ती शेवटी बाहेर आली. बाहेर रस्त्यावर तुरळक गर्दी होती . काहीजण नाचत होते, काही गात होते, कोणी झेंडा फडकावत होते, तेवढ्यात कोणीतरी तिला पहिले आणि म्हणले "ताई आपण जिंकलो...आपण युद्ध जिंकलो. ती स्तब्ध उभी राहिली. नजर मात्र आजू बाजूला भिरभिरत होती . सगळीकडे घरांच्या जागी माती विटांचे ढिगारे दिसत होते, कुठे रक्ताचे डाग अजूनही वाळले नव्हते. शरीरं आणि अवयवांचे ढीग रचलेले. ते पाहून तिचे डोळे पाणावले. त्या पाणावलेल्या डोळ्यांना, धूसर अस कोणीतरी तिच्या जवळ लंगडत येताना दिसलं . एक पाय नसलेला आणि एका डोळ्यावर काळी पट्टी लावलेला माणूस तिच्या अगदी जवळ आला. तो तिचा नवरा होता. युद्ध जिंकून आलेला शूर शिपाई. पण त्याच्या एका डोळ्यात तिला कुठेच जिंकल्याचा समाधान दिसलं नाही. दिसलं ते फक्त दुःख आणि नैराश्य. त्या क्षणी तिला कळली ती युद्धाची किंमत. युद्धात जिंकत कोणीच नाही. हरणारे तर हारतातच, पण जिंकणारी बाजू ही बरंच काही हारते!