गुंतता हृदय हे!! (भाग १२)
गुंतता हृदय हे!! (भाग १२)


"गौरी तुझं लक्ष कुठंय, मी आपली उगाचंच एकटी बडबडतेय... माझ्या लक्षातच नाही आलं की, तू प्रवासाने दमली असशील.. पहिलं हे खाऊन घे आणि तू आराम कर.. मग आपण निवांत बोलू," सुमती काकू म्हणाल्या.
समीरबद्दल सगळं कळूनही मुद्दाम गौरीने त्याचा विषय काढला व ती काकूंना म्हणाली, "आई तो मला एअरपोर्टवर न्यायला आलेला मुलगा..." असं बोलत ती मध्येच थांबली. तेव्हा सुमती काकू म्हणाल्या, "अगं, तो समीर, आपल्या शेजारीच राहतो. तुझ्या बाबांच्याच कंपनीमध्ये कामाला आहे.. खूप गुणी मुलगा आहे हो!! कालच तुझे बाबा सांगत होते, फार कमी वेळात त्याने ऑफिसमध्ये सर्वांची मने जिंकली म्हणून!! त्याचे आई-वडील मुंबईमध्ये असतात.. तो एक वेळेला आपल्याकडेच जेवतो.. तसे तर पहिलं पहिलं मी त्याला जेवणाचा डबा पाठवायची.. मग हेच म्हणाले, समीरला घरीच बोलवत जा जेवायला.. एक वेळचं जेवण तरी व्यवस्थित जेवेल.. मग काय रोज रात्री तो इथेच जेवायला लागला.. माझ्यासाठी जसा वेदांत तसा तो.."
असं बोलून सुमती काकू त्यांच्या कामात गुंतल्या आणि गौरी बेडरूममध्ये झोपायला गेली.. प्रवासाने ती इतकी दमली होती की, पडल्या पडल्या तिला झोप लागली..
जेव्हा सुमती काकूंनी तिला चहासाठी उठवलं तेव्हा तिला जाग आली.. चहापाणी झाल्यावर गौरीने तिची बॅग खाली करायला घेतली.. सगळी आवराआवर करता करता जेवणाचीसुद्धा वेळ झाली.. सुमती काकूंनी सगळ्यांना जेवायला बोलविले.. पण समीरला अचानक काही काम आल्यामुळे त्याला तातडीने दिल्लीला जावं लागलं.. त्यामुळे २ दिवस तरी समीरचं येणं काही शक्य नव्हतं.. त्याने फोन करून संध्याकाळीच काकूंना याची सूचना दिली होती..
सगळे जेवायला बसले.. पण समीर अजून आला नव्हता.. गौरी त्याचीच वाट बघत होती म्हणून भूक लागूनही जेवायला टंगळमंगळ करत होती.. तिला कुठे माहीत होतं की, समीर २ दिवसांसाठी दिल्लीला गेलाय म्हणून.. न राहवून मग तिने समीरचा विषय काढलाच..
"तो समीर नाही आला जेवायला," गौरी म्हणाली.
तेवढ्यात तिचे बाबा म्हणाले, "अगं, तो कसा येईल आज जेवायला, तो तर ऑफिसच्या कामासाठी दिल्लीला गेलाय.. २ दिवसांनी परतेल." हे ऐकून गौरी थोडी उदास झाली..
समीरला बघताक्षणी ती त्याच्या प्रेमात पडली होती आणि समीर होता पण तसा की, कोणीही त्याच्या प्रेमात पडेल..
बघता बघता २ दिवस निघून गेले.. गौरीने एका IT कंपनीत जॉबसाठी विचारणा केली होती.. त्यासंबंधी तिची आज मुलाखत होती. सकाळपासून तिची नुसती लगबग चालली होती.. ती मुलाखतीसाठी पूर्व तयारी करत असताना अचानक समीर घरी आला.. त्याला पाहून गौरीला कोण आनंद झाला, विचारूच नका..
सुमती काकुंकडून त्याला कळलं की, गौरीची आज एका IT कंपनीत मुलाखत आहे.. तेव्हा गौरीने समीरला त्याची पूर्वतयारी करून घेण्यास मदत मागितली.. मग काय समीरनेच तिची पूर्वतयारी करून घेतली.. खरं म्हणजे गौरी मुलाखतीला एकदम तयार होती. तिला खरं तर समीरच्या मदतीची काहीच गरज नव्हती पण तो तर समीरशी बोलण्याचा एक बहाणा होता..
बोलता बोलता समीरला तिने मुलाखतीच्या ठिकाणी सोडण्यासाठीसुद्धा मनवले.. समीरचे ऑफिस पण बाजूच्या बिल्डिंगमध्ये असल्यामुळे तोसुद्धा तिला त्या ठिकाणी सोडायला तयार झाला.. काही वेळातच सुमती काकूंचा निरोप घेऊन दोघेही निघाले..
गौरीला गाण्यांची फार हौस होती.. तिला हिंदी-मराठी गाणी जास्त आवडत.. ती २ वर्ष परदेशात राहूनही तिचा भारतीय संगीताबद्दलचा आदर यत्किंचितही कमी झाला नव्हता.. तिला एकांतात रोमॅंटिक गाणी ऐकायला फार आवडत असे.. आणि आता तर ती गाणी ऐकायला समीर नावाचं कारणही मिळालं होतं..
दोघेही गाडीत बसले.. समीरशी आता काय बोलावं हे गौरीला सुचत नव्हतं आणि समीरलाही.. म्हणून समीरने गाडीतला म्युझिक प्लेअर चालू केला.. आणि एक रँडम गाणं लावलं..
कहते हैं ख़ुदा ने इस जहाँ में
सभी के लिए किसी ना किसी को है बनाया
हर किसी के लिए
तेरा मिलना है उस रब का इशारा
मानो मुझको बनाया तेरे जैसे ही किसी के लिए
कुछ तो है तुझ से राबता
असं वाटत होतं की, जणू गौरी तिच्या मनातील भावना समीरला सांगत होती.. पण समीर पुन्हा आर्याच्या आठवणींमध्ये हरवून गेला..
क्रमश: